प्रश्न: असे म्हणतात की सवयी सुटणे कठीण असते. बालपणात विकसित केलेले गुण केवळ तुमच्या मृत्यूनंतरच संपतात का?

सद्गुरू: या गोष्टीकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहूया. एखादी सवय मुख्यतः यामुळे लागते की ती तुमच्या जीवनात काहीशी सहजता आणते - ती तुमच्या जीवनाचे काही भाग स्वयंचलित करते. तुम्हाला त्याबद्दल विचार करावा लागत नाही किंवा काहीही समजून घ्यावे लागत नाही. तुम्ही ते सहज करू शकता.

नैसर्गिकरित्या, मानवी संरक्षण यंत्रणेचा एक भाग म्हणून, मानव काही सवयी निर्माण करतो, कारण इतर प्राण्यांच्या उलट, आपण जन्माला येताना आपले बरेच गुण निश्चित नसतात. इतर प्राण्यांमध्ये त्यांचे बरेच गुण निश्चित असतात. तुमच्या पाहिले असेल की एका कुत्र्यात आणि दुसऱ्या कुत्र्यात, एका मांजरात आणि दुसऱ्या मांजरात फक्त थोडासा फरक असतो. त्यांना त्याचे वेगवेगळे व्यक्तित्व असते, पण बहुतेक गुण निश्चित असतात, आपल्यासाठी अगदी अल्पप्रमाणात निश्चित असते. मानवासाठी जवळजवळ सर्वकाही खुले असते. या कारणामुळे, एक बालक म्हणून, तुम्ही तुमच्यामध्ये संरक्षक यंत्रणा तयार करण्याचा प्रयत्न करता, जिथे तुम्ही स्वतःच्या सवयी तयार करण्याचा प्रयत्न करता.

सवयी झटकून टाकणे

प्रत्येक मूल जगण्यासाठी काही सवयी तयार करते. ही जगण्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. या सवयींमुळे, तो थोड्या सहजतेने वावरू शकतो. एका मुलासाठी हे खूप गरजेचे आहे. परंतु सामान्यतः, मुले वाढत असताना, त्यांच्याभोवती आपण निर्माण केलेल्या जागरूकता आणि अनुभवांच्या पातळीनुसार या सवयी ते झटकून टाकतात. एकतर अनुभवाने किंवा शिक्षणाने, लोक बदलतात. लोक इतके नाटकीयरित्या बदलतात - ते तीन वर्षांसाठी बाहेर जातात आणि परत येतात, तेव्हा पालकांना त्यांची मुले ओळखूही येत नाहीत. वेगळ्या पातळीच्या अनुभवामुळे त्यांच्याबाबतीत सर्व काही बदललेले असते.

जर एखादी व्यक्ती आध्यात्मिक मार्ग स्वीकारते, तर तिच्या सर्व सवयी गळून पडतील, कारण चांगली आणि वाईट सवय असे काही नसते.

जे भयभीत आहेत आणि सतत स्वःताचा बचाव करण्यात व्यस्त आहेत, ते त्यांच्या जुन्या सवयी सहजासहजी सोडू शकत नाहीत. जे उत्साह, जीवन, साहस शोधत आहेत - ते त्यांच्या सवयी खूप सहजपणे सोडतील, कारण ते नेहमीच सध्या ज्या परिस्थितीत राहत आहेत त्यानुसार त्यांच्या जीवनाची पुनर्रचना करत असतात.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जर एखादी व्यक्ती आध्यात्मिक मार्ग स्वीकारते, तर तिच्या सर्व सवयी गळून पडतील, कारण चांगली आणि वाईट सवय असे काही नसते. सगळ्याच सवयी चुकीच्या आहेत. सवयी या तुमच्या जीवनातील एका ठराविक टप्प्यावर जगण्यासाठी गरजेची साधने असू शकतात, परंतु एकदा तुम्ही मोठे झाल्यावर कोणतीही सवय, चांगली किंवा वाईट, नसावी, कारण सवय म्हणजे तुम्ही तुमचे जीवन अजाणतेने जगायला शिकत आहात. तसे करणे सुरक्षित वाटू शकते, परंतु त्यामुळे तुम्हाला अनेक वेगवेगळ्या मार्गांनी जीवन नाकारले जाते.

सवयी आणि कर्म

आध्यात्मिकता हे आपल्या आतील सर्व अजाणतेपणाने निर्माण झालेल्या पुनरावृत्तीच्या रचना तोडण्याचे मूलभूत साधन आहे. ज्याला आपण कर्म म्हणतो ते देखील हेच आहे. कर्म म्हणजे तुम्ही अजाणतेपणाने स्वतःसाठी पुनरावृत्तीच्या रचना तयार करत आहात, हे केवळ तुमच्या वर्तनाबद्दल नाही, तर जीवन कसे घडते आहे याबद्दल आहे. जर लोकांनी त्यांचे जीवन तपासून बघितले, तर अगदी गोष्टी ज्या प्रमाणे घडतात, संधी जशा येतात, ते लोकांना जसे भेटतात, हे सर्व ठराविक प्रकारच्या पुनरावृत्तीच्या रचनेमुळे असते. हे केवळ तुम्ही निर्माण केलेल्या कार्मिक रचनेमुळे आहे

सवय ही कार्मिक रचनेची एक लहान अभिव्यक्ती आहे. तुम्ही एक ठराविक गोष्ट तुमच्या आत घेता आणि त्यातून एक पुनरावृत्तीची रचना तयार करता. ती तुमची सवय बनते. आध्यात्मिक प्रक्रिया म्हणजे तुम्हाला तुमच्यामध्ये काहीही अजाणतेपणाने घडू नये असे वाटते. जीवन अजाणतेपणाने जगणे हा जगण्याचा बुद्धिमान मार्ग नाही. तुम्ही ती सवय तुमच्या पाळण्यात किंवा आईच्या गर्भात किंवा त्या आधीही तयार केली असेल, त्याला महत्त्व नाही. जर तुम्हाला विकसित व्हायचे असेल, जर तुम्ही मुक्ती शोधत असाल, तर तुम्हाला तुमच्या सर्व पुनरावृत्तीची रचना तोडाव्या लागतील - फक्त चांगल्या नाही, फक्त वाईट नाही, तर सर्वच. तुम्ही मरून पडण्यापर्यंत वाट पाहू नये. मृत्यू सुद्धा या सर्व रचना तोडत नाही.

तुम्ही स्मशानभूमीत गेलात तरीही, तुमचे शरीर जळले तरीही, तुमच्या या रचना तुटणार नाहीत. कर्म म्हणजे हेच. ते त्यापलीकडेही जाते, कारण तुम्ही तुमचे शरीर गमावही रचना तोडू शकत नाही. म्हणून हे अत्यंत महत्त्वाचे आहे, की जेव्हा तुम्ही जिवंत आणि जागृत असता, तेव्हाच तुम्ही या रचनेच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा

पुनरावृत्तीच्या या रचना नष्ट करा आणि तुमचे जीवन जाणीवपूर्वक हाताळा. उदाहरणार्थ, मी आता बोलत आहे - मी एकतर सवयीने किंवा जाणीवपूर्वक बोलू शकतो. हाच मोठा फरक आहे. मी जरी केवळ बसून गप्पा मारल्या, तरीही दहा हजार लोक ऐकू इच्छितात, कारण प्रत्येक शब्द जाणीवपूर्वक उच्चारला जातो, सवयीने नाही. यात सवयीचे काहीही नाही. मी काय सांगत आहे त्याचा आशय काहीही असो, लोक अजूनही ऐकू इच्छितात, कारण प्रत्येक शब्द जाणीवपूर्वक येतो, आणि त्यात शक्ती आहे. तुम्ही प्रत्येक श्वास जाणीवपूर्वक घेतला आणि सोडला, तर अचानक तुमच्या श्वासाला वेगळ्याच प्रकारची शक्ती येते. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक हालचाल, जर तुम्ही ती जाणीवपूर्वक केली, तर प्रत्येक हालचालीत प्रचंड शक्ती असते. जर तुम्हाला जीवनाची शक्ती जाणून घ्यायची असेल, तर तुम्हाला त्याबद्दल जागरूक असावे लागेल, अन्यथा ते तुमच्यासाठी अस्तित्वातच नसते..