भारतीय संस्कृतीत झोपलेल्या किंवा बसलेल्या व्यक्तीच्या अंगावरून ओलांडून जाऊ नये, असे मानले जाते. ही केवळ एक प्रथा आहे की यामागे काही विज्ञान आहे? त्याबद्दल सद्गुरू उत्तर देत आहेत.

सद्गुरू: हे केवळ माणसांनाच नव्हे, तर सर्व प्राणिमात्रांना लागू होते. भारतात लोक झोपलेल्या कुत्र्यावरूनही ओलांडून जात नाहीत.

जेव्हा तुमच्या जीवनाचा अनुभव भौतिकतेपर्यंत मर्यादित असतो, तेव्हा तुम्हाला वाटते की मानवाची सीमारेषा म्हणजे त्याची त्वचा. जर तुम्ही जीवनाचा अनुभव थोडा जरी वाढवला, तर तुम्हाला दिसेल की माणसाची सीमारेषा त्वचेच्या पलीकडे जाते – ती किती दूर जाते हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते. तुम्ही जितके डोळे मिटून बसाल, तितके तुम्ही 'जाड' व्हाल – चरबीच्या दृष्टीने नाही – तुम्ही मोठे व्हाल. तुम्ही जितका कमी विचार कराल, तितके तुमचे अस्तित्व मोठे होईल.

तुम्ही जितके डोळे मिटून बसाल, तितके तुम्ही 'जाड' व्हाल – चरबीच्या दृष्टीने नाही – तुम्ही मोठे व्हाल.

बहुतेक लोकांना झोपेतच थोडीफार शांती आणि संतुलन अनुभवायला मिळते. झोप ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात गहन अवस्था असते. असे जीवन अत्यंत दुर्दैवी आहे. जेव्हा ते गाढ झोपेत असतात, तेव्हा ते बऱ्यापैकी शांत आणि संतुलित असतात. जेव्हा ते जागे असतात, तेव्हा ते सैरभैर असतात.

म्हणून, जेव्हा ते झोपतात तेव्हा ते थोडे मोठे होतात. विशेषत: जर तुम्ही एखाद्या कठीण पृष्ठभागावर झोपला असाल तर, कारण तुमच्या शरीराच्या ज्या बाजूवर झोपला आहात, त्या भागाला व्यक्त होण्यासाठी कोणतीही जागा मिळत नाही, त्यामुळे ती ऊर्जा नैसर्गिकरित्या वरच्या दिशेने जाते, जिथे जागा आहे. तुमची ऊर्जा तुमच्या भोवती असण्याऐवजी, ती तुमच्या वर सुमारे ५०% ते १००% जास्त असेल.

विस्तारित ऊर्जा शरीर

समजा, उदाहरणार्थ, तुमचे ऊर्जाशरीर तुमच्या त्वचेच्या एक फूट पुढे आहे. जर तुम्ही झोपलात, तर ते अंदाजे दीड ते दोन फूट असू शकते. तुम्हाला माहीत नसताना, तुमच्या ऊर्जाशरीराची काही प्रमाणात स्वच्छता किंवा विस्तार नैसर्गिकरित्या होतो. त्या वेळी, लोक तुमच्यापासून अधिक अंतर ठेवतात – आदराने नव्हे, तर त्या क्षणी तुमच्या ऊर्जाशरीराच्या आकारामुळे. हे असेच असले पाहिजे – त्या क्षणासाठी ते आवश्यक असते. जर तुमच्यात थोडी संवेदनशीलता असेल, तर तुम्हाला या गोष्टी स्वाभाविकपणे कळतील. तुम्ही म्हणू शकता, की ही काहीतरी खास देणगी आहे – मी ते पूर्णपणे नाकारत नाही. पण त्याच वेळी, लोकांमध्ये या प्रकारची संवेदनशीलता मोठ्या प्रमाणात नसते, कारण ते कशावरही लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. लोक त्यांच्या आजूबाजूच्या जीवनाबद्दल बेपर्वा असल्यामुळे, ते कशावरही लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. 

तुमचे ऊर्जाशरीर तुमच्या त्वचेच्या एक फूट पुढे आहे. जर तुम्ही झोपलात, तर ते अंदाजे दीड ते दोन फूट असू शकते..

जेव्हा मी पाच-सहा वर्षांचा होतो, तेव्हा मी घरात बसून एखाद्या गोष्टीकडे किंवा कधीकधी शून्यात बघत असे. खूप वर्षांनंतर, मला योगामध्ये समजले, की ती एक मुद्रा आहे जिथे तुम्ही फक्त शून्यात बघत राहता. काहीही उच्च नाही, काहीही नीच नाही. तुमच्यासाठी काहीतरी आणि शून्य हे सारखेच आहे – तुम्ही फक्त पाहत आहात. अचानक, माझी आई तिथून जायची. सुरुवातीला, मला ती दिसायची, पण पुढच्या वेळी ती तिथून गेली, तेव्हा ती धूसर आणि थोडी मोठी दिसायची. जेव्हा ती पुन्हा तिथून जायची, तेव्हा ती जवळजवळ पारदर्शक आणि आणखी मोठी दिसायची.

मग माझे वडील यायचे. मी त्यांच्याकडे रिकाम्या नजरेने बघायचो. ते माझ्या डोळ्यासमोर हातवारे करायचे. बहुतेक, ते म्हणायचे, "तू अभ्यास का करत नाहीस?" किंवा काहीतरी. मला त्यांचे शब्द ऐकू येत नसत, मी फक्त बघायचो आणि मला सर्व प्रकारच्या गोष्टी दिसायच्या. मला कोणत्या प्रकारचे आकार दिसतात यावर अवलंबून, ते काय बोलत आहेत हे मला कळायचे. ते ज्या प्रकारे बघत होते, त्यांना काळजी वाटायची, की हा मुलगा स्वतःचे मानसिक संतुलन गमावत आहे. जर तुम्ही पुरेसे लक्ष दिले, तर तुम्हालाही याचा अनुभव येईल.

तुमच्या आजूबाजूला काय आहे?

योगिक शरीरविज्ञानामध्ये, तुमच्या अस्तित्वाचे तीन भौतिक आयाम आहेत – भौतिक शरीर, मानसिक शरीर आणि ऊर्जा शरीर – अन्नमय कोष, मनोमय कोष, प्राणमय कोष. भौतिक शरीर हे भौतिक वस्तूंनी बनलेले आहे, जे आपण अन्न म्हणून पृथ्वीकडून घेतो. मानसिक शरीर देखील तुमच्या सभोवतालच्या जगातल्या वस्तूंनी बनलेले आहे, परंतु हा प्रकार अधिक सूक्ष्म आहे. आपण आपले मानसिक शरीर हे माहिती, प्रतिध्वनी, आवाज आणि प्रभावांनी बनवतो.

जे लोक जागरूक आहेत ते दुसऱ्याच्या कर्मात अडकू इच्छित नाहीत. कोणावरून ओलांडून जाण्याचा अर्थ आहे, जणू तुम्ही त्यांच्या कर्मात प्रवेश करत आहात..

भौतिक शरीर भौतिक वस्तूंनी बनलेले असल्यामुळे, त्याला योग्य आकार असतो. बहुतेक लोकांच्या मानसिक शरीराला स्पष्ट आकार नसतो. त्यांनी काय गोळा केले आहे, याची त्यांना जाणीव सुद्धा नसते. बहुतेक मानवांसाठी, मनाची १% सामग्रीसुद्धा जाणीवपूर्वक नसते. ९९% गोष्टी नकळतपणे गोळा केल्यामुळे, मानसिक रचना विखुरलेली असते. ती खूप गोंधळलेली असते. जर तुम्ही तुमच्या मानसिक स्वरूपाला जाणीवपूर्वक रचना देऊ शकत असाल, आणि तुम्ही परिस्थितीनुसार ती रचना बदलू शकत असाल, तर तुमचे मन एक जादुई साधन बनेल.

तुमच्या ऊर्जा शरीरात देखील माहिती ठेवलेली असते. ती कोणते रूप घेते, हे तुमच्या आत कोणत्या प्रकारची माहिती आहे यावर अवलंबून असते. शारीरिक स्तरावरील माहितीला आनुवंशिकता म्हणतात. त्याचप्रमाणे, मानसिक संरचनेवर माहिती असते आणि ऊर्जा संरचनेवरही माहिती असते.

जे लोक जागरूक आहेत, ते तुमच्या मानसिक शरीराला किंवा ऊर्जा शरीराला ओलांडू इच्छित नाहीत. कोणाचे कर्म कसे आहे हे आपल्याला माहीत नसते, पण जेव्हा ते झोपलेले असतात किंवा झोपण्याच्या बेतात असतात, तेव्हा त्यांच्या कर्मिक संरचनेची अजागरूक हालचाल सर्वोच्च असते. कारण तुम्ही कोणतीही जाणीवपूर्वक क्रिया करत नाही, त्यामुळे अजागरूक क्रिया पूर्णपणे सक्रिय असते. जे लोक जागरूक आहेत ते दुसऱ्याच्या कर्मात अडकू इच्छित नाहीत. कोणावरून ओलांडून जाण्याचा अर्थ आहे, जणू तुम्ही त्यांच्या कर्मात प्रवेश करत आहात.

तुमच्या 'सामग्री'ची हाताळणी

दुसऱ्या लोकांचे 'सामान' उचलणे योग्य नाही, कारण स्वतःचे 'सामान' हाताळणे पुरेसे कठीण आहे. म्हणूनच, एकदा का तुम्ही आध्यात्मिक साधनेत आलात की, ब्रह्मचारी म्हणून तुम्ही कोणालाही मिठी मारत नाही – फक्त 'नमस्कार' करणे पुरेसे आहे. आम्हाला तुमच्या कर्मात अडकायचे नाही. ते चांगले असो वा वाईट, आम्हाला ते तुमच्यापासून दूर न्यायचे नाही. जेव्हा तुमच्या गुरूने तुमच्या विशिष्ट कर्मासाठी एखादी रणनीती विकसित केली असेल, तेव्हा तुम्ही ती सर्व प्रकारच्या लोकांमध्ये मिसळू नये. अन्यथा, ते अनावश्यकपणे गुंतागुंतीचे होते.

तुम्ही जर सर्व ठिकाणांवरून खूप जास्त गोष्टी घेतल्या, तर कर्मिक प्रक्रिया खूप गुंतागुंतीची होते. आणि जर तुम्ही ती सतत दुसऱ्या कोणाच्यातरी कर्मात मिसळत राहिलात, तर तुमच्या कर्मासाठी विकसित केलेली रणनीती काम करणार नाही. काही तीव्र साधक एकांतात गुहेत किंवा तत्सम ठिकाणी का जातात, याचे कारण त्यांना गोष्टी गुंतागुंतीच्या करायच्या नसतात. त्यांना त्यांच्या स्वतःच्या कर्माची गुंतागुंत समजली आहे आणि त्यांना ती आणखी गुंतागुंतीची करायची नाही.

म्हणूनच

तुम्ही कोणावरूनही ओलांडून जाऊ नये. तुम्ही त्यांच्या बाजूने जाऊ शकता. हे आदराचे लक्षण आहे.
 

आणि त्याशिवाय, जर तुम्ही त्यांच्यावरून ओलांडून गेलात, तर त्या व्यक्तीला त्रास होईल. जर तुम्ही त्यांच्या ऊर्जा शरीरात व्यत्यय आणला, तर ते त्वरित जागे होणार नाहीत, पण आंतरिकरित्या त्यांना त्रास होईल.

हे सर्व जीवनाच्या मूलभूत जाणिवेतून येते. तुम्ही काहीही करत असलात – व्यवसाय करत असाल, विवाहित असाल, मुले जन्माला घालत असाल आणि त्यांचे संगोपन करत असाल, युद्ध लढत असाल – या भूमीत जन्मलेल्या प्रत्येकासाठी फक्त एकच ध्येय होते –  अंतिम मुक्ती. मुक्ती हेच एकमेव ध्येय होते. संपूर्ण संस्कृती याच भोवती फिरत होती. अनेक युक्त्या विकसित केल्या गेल्या, जेणेकरून तुम्ही दुसऱ्याच्या कर्मात अडकू नये. तुम्हाला काही नवीन मिळवायचे नाही, कारण तुम्हाला आधीपासूनच असलेल्या गोष्टीची गुंतागुंत माहीत आहे. जर तुम्ही स्वतःची कोंडी सोडवलीत, तर ते पुरेसे आहे. तुम्हाला ते गुंतागुंतीचे करायचे नाही.