सद्गुरू कृपा, कर्म आणि आध्यात्मिक मार्गावरील जीवनाच्या स्वरूपाबद्दल बोलताना कृष्णाच्या जीवनातील एक प्रसंग सांगतात.

प्रश्नकर्ता: सद्गुरू, जर आपण मानले की कृष्ण देव होता, तर त्याच्या भक्तांना इतक्या अडचणी का सोसाव्या लागल्या? माझ्याबाबतीत, जोपर्यंत मी तुम्हाला पाहिले नाही, माझे जीवन असे होते की ज्याचा बहुतेक लोक मत्सर करत असत. आता देखील लोक माझ्या जीवनाचा मत्सर करतात, पण वेगळ्या प्रकारे. प्रत्यक्षात, माझे जीवन एक रोलरकोस्टरसारखे होते. जर कृपा ही जीवन सुरळीत करण्याबद्दल नसेल, तर ती कशाबद्दल आहे?

सद्गुरू:  तुम्हाला माहिती आहे का, बलरामाने देखील अगदी असाच प्रश्न विचारला होता, जेव्हा त्यांना मथुरेतून बाहेर पडावे लागले आणि जंगलातून चालत जाताना, पुरेसे अन्न किंवा आराम नसताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले: "या सर्व गोष्टी आपल्याबाबतीतच का घडत आहेत, आणि ते सुद्धा तू जवळ असताना?" कृष्णाचे उत्तर होते, "जेव्हा जीवन तुमच्याबाबतीत मोठ्या प्रमाणात घडत असते, तेव्हा तक्रार करू नका." तुम्ही काही परिस्थितींना चांगले आणि काही परिस्थितींना वाईट म्हणून पाहता, किंवा काही परिस्थिती आवडणाऱ्या आणि काही परिस्थितींना न आवडणाऱ्या म्हणून पाहता, यामुळे तुम्ही जीवनाकडे फक्त जीवन म्हणून पाहण्याऐवजी स्वत:ला विचारता की, या गोष्टी तुमच्यासोबत का घडत आहेत. ज्या क्षणी तुम्ही आध्यात्मिक प्रवाहात प्रवेश करता, तेव्हा तुमच्यासाठी जीवन मोठ्या प्रमाणात घडत असते, जणू सर्वकाही जलद गतीवर आहे. जर तुम्ही एखाद्या गोष्टीला चांगले किंवा दुसऱ्या गोष्टीला वाईट म्हणून ओळखत नसाल, तर तुम्हाला दिसेल की, जीवन मोठ्या तीव्रतेने घडत आहे - बस इतकेच. चांगले किंवा वाईट असे काही नसते. जीवन घडत असते. काही लोक त्याचा आनंद घेतात - काही लोक त्यामुळे दुःखी होतात.

जेव्हा तुम्ही आध्यात्मिक मार्गावर चालता, तुमची आंतरिक परिस्थिती जलदगतीमध्ये असते.

आपण फक्त एवढेच करू शकतो की, प्रत्येकजण त्याचा आनंद घेतोय याची खात्री करणे. मूलभूत पातळीवर, पृथ्वीवर घडणारे प्रसंग महत्वाचे नसतात. जर एखादी वीज कोसळून आपण सगळे जळून राख झालो तरी मला वाटत नाही की ती एक आपत्ती आहे - ती फक्त एक घटना आहे. "मग ईशा फाऊंडेशन बद्दल काय? माझे कुटुंब आणि माझी मुले यांच्याबद्दल काय?" त्या सर्वांसाठी, जीवन मोठ्या प्रमाणात घडेल, कारण आपण अचानक नाहीसे झालो आहे. माझी अशी इच्छा आहे की, तुम्ही याला चांगले किंवा वाईट म्हणून न पाहता त्यापलीकडे पहावे. जीवन प्रचंड तीव्रतेने घडत आहे - बस इतकेच.

जर तुम्ही आध्यात्मिक बनू इच्छिता, तर स्वाभाविकपणे तुम्ही जीवनाचा मोठा भाग मिळवण्याचा प्रयत्न करत आहात. प्रत्यक्षात, तुम्ही जीवनात जे काही करत आहात, ते जीवनाचा मोठा भाग मिळवण्यासाठीच आहे. तुम्ही जर फक्त जीवनाचा एक लहानसा भाग अनुभवत असाल, तर कदाचित त्यात गोडवा असेल, पण तरीही तो एक लहान तुकडाच असेल. जर तुम्ही केक घेतला असेल आणि फक्त त्याच्या वरच्या आयसिंगवर जगत असाल, तर काही काळानंतर तो गोडवा विष बनेल. तुम्ही म्हणालात, "माझे जीवन असे होते की, बहुतेक लोक त्याचा मत्सर करत  होते," पण तुम्हाला माहीत होते की, ते किती पोकळ होते. ज्यांच्याकडे कार नाही, असे लोक मानतात की, ज्यांच्याकडे कार आहे, ते खूप भाग्यवान आहेत. ते निश्चितच आरामदायी आणि सोयीस्कर आहे, पण ते मोठे सौभाग्य नाही. जर कार कधीच अस्तित्वात नसत्या, तर ती असावी अशी इच्छा कोणीही केली नसती. स्वत:ची तुलना इतरांशी करण्यामध्ये समस्या आहे, म्हंणजे "अरे, तिच्याकडे आहे - माझ्याकडे नाही." ज्यांच्याकडे कार नाही अशा लोकांनी कार असणाऱ्या लोकांशी स्वत:ची तुलना केली नाही, तर चालणे किंवा सायकल चालवणे अगदी छान आहे. जेव्हा तुम्ही म्हणाला, "माझे जीवन हे सर्वांनी मत्सर करावे असे होते," तर हे वाक्य जीवनाच्या मूलभूत जाणीवेबद्दल नसून, ते तुमच्या सामाजिक परिस्थितीबद्दल आहे.

मी जीवन अस्तित्वात असण्याच्या जाणीवेबद्दल बोलत आहे. सध्या, तुम्ही बऱ्याच गोष्टींना जीवन समजता ज्यांचा सखोलपणे जीवनाशी काहीही संबंध नाही. याचा वास्तविकतेशी संबंध नाही - ती एक मानसिक अवस्था आहे. सर्व दुःख त्या वेडेपणातून येते.

जेव्हा तुम्ही आध्यात्मिक मार्गावर चालता, तुमची आंतरिक परिस्थिती जलदगतीमध्ये असते. याला अनेक कारणे आहेत. एक मूलभूत कारण म्हणजे तुमचे प्रारब्ध - या जन्मासाठी निश्चित केलेले कर्म. निर्मिती खूप दयाळू आहे. जर तिने तुम्हाला तुमच्या सर्व कर्मांचा संपूर्ण भार एकदम दिला असता, ज्याला संचित म्हणतात, तर या जीवनात तुम्ही मरून जाल. बऱ्याच लोकांना सध्याच्या जन्माच्या स्मृती सुद्धा झटकून टाकता येत नाहीत. समजा मी जर तुम्हाला शंभर जन्मांच्या स्मृतींची आठवण मोठ्या तीव्रतेने करून दिली, तर त्या स्मृतींचा भार सोसू न शकल्याने बहुतेक लोक या क्षणी इथेच मरून पडतील. म्हणून, निसर्ग तुम्हाला तेवढाच भार देतो जेवढा तुम्ही सोसू शकता. जर तुम्ही निसर्गाच्या वाटणीनुसार जाल, आणि आपण असे समजू की, तुम्ही कोणतेही नवे कर्म निर्माण करणार नाही - जे खरे नाही - शंभर जन्मांचे कर्म विलीन करण्यासाठी, तुम्हाला किमान शंभर जन्म घ्यावे लागतील. पण या शंभर जन्मांच्या प्रक्रियेत, तुम्ही पुढील हजार जन्मांसाठी पुरेसे कर्म गोळा करू शकता.

जेव्हा तुम्ही आध्यात्मिक मार्गावर असता, तेव्हा तुम्ही अंतिम गंतव्याकडे जाण्यासाठी घाई करत असता. तुम्हाला शंभर किंवा हजार जन्म घ्यायचे नाहीत - तुम्हाला ते लवकर संपवायचे आहे. आध्यात्मिक प्रक्रियेत सामील होणे म्हणजे जीवनाला मोठ्या प्रमाणात अनुभवण्यास तयार असणे. एकदा का तुम्ही माझ्यासोबत बसलात, तर माझा आशीर्वाद हा सुद्धा आहे की - जीवनातल्या सर्व गोष्टी तुमच्यासोबत घडू द्या. “ मृत्यू झाला म्हणून काय?" तेही चांगले आहे. जर ७५ वर्षाऐवजी ३५ वर्षांत तुम्ही तेथे पोहोचू शकलात, तर ते चांगले नाही काय? हा केवळ तर्काचा प्रश्न नाही - ही जीवनाची वास्तविकता आहे. श्रीकृष्णाने गीतेत याच गोष्टीचा उल्लेख केला आहे: जर तुम्ही योग्य परिस्थिती निर्माण करू शकत असाल, तर त्यांना लवकर तिथे पोहोचू द्या. एका बालयोग्याच्या आणि एका महान भक्त असलेल्या मुलीच्या लग्नाबद्दल एक सुंदर तमिळ कविता आहे. त्यांनी ३००० पाहुण्यांना स्वतःच्या लग्नासाठी आमंत्रित केले. त्यांनी लग्न केले, आणि नंतर बालयोगी, जो एक महान कवी देखील होता, तो भक्तीपर कविता म्हणू लागला. सर्वांचे लक्ष त्याच्याकडे होते, आणि नेमके हेच त्याला हवे होते. त्याने या क्षणाचा उपयोग सर्वांना मुक्त करण्यासाठी केला - ते सर्व लग्नाच्या मंडपातच शरीर सोडून गेले. काही शतकांनंतर, दुसरा एक कवी त्याच्या कवितेत खेदाने म्हणतो: "अरेरे, त्यांनी मला त्या लग्नाला बोलावले असते, तर मला इतके संघर्ष करावे लागले नसते. मी देखील तिथे पोहोचलो असतो. मी काही शतके उशीरा आलो. अरेरे, माझ्यासाठी असे दुसरे लग्न कधी आयोजित होईल का?"

कृपा तुम्हाला तुम्ही सध्या ज्या मर्यादित कक्षात अडकला आहात त्यातून बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहे.

त्याने असा विचार केला नाही की, लग्न मंडपात ३००२ लोकांचा मृत्यू म्हणजे एक आपत्ती आहे. त्याने याकडे एक महान सौभाग्य म्हणून पाहिले, कारण बालयोग्याच्या उपस्थितीमुळे सर्वांनी एकाच वेळी मोक्ष प्राप्त केला. एक आध्यात्मिक व्यक्ती घटनांना चांगले किंवा वाईट म्हणून पाहत नाही - तुम्हाला फक्त जीवन किती तीव्रतेने घडत आहे याची काळजी असते. चांगले आणि वाईट या सामाजिक घटना आहेत - त्यांचा जीवनाशी काहीही संबंध नाही. एखाद्या विशिष्ट प्रकारे दीक्षा घेतल्यानंतर, तुम्ही तुमच्या प्रारब्धामुळे मर्यादित राहत नाही. जर तुम्हाला शंभर जन्मांचा भाग एकत्र घ्यायचा असेल, तर तुमचे जीवन खूप तीव्रतेने घडेल. जर तुम्ही एकसंघता राखली, तर तुम्हाला दिसेल की तुमच्या जीवनातील प्रत्येक घटना तुम्हाला पुढे नेईल. जर तुम्ही हे पाहिले नाही, जर तुम्ही सामाजिक परिस्थितींमुळे प्रभावित झालात, मग जीवन ज्या गतीने घडत आहे, त्यामुळे तुम्हाला असे वाटेल की, तुमच्या जीवनात काहीतरी चुकीचे घडत आहे, जे खरे नाही.

सकारात्मक शब्दांचा अर्थ नेहमीच हजारो मार्गांनी चुकीचा लावला जाऊ शकतो, कारण तुमचे मन त्यावर घुटमळत राहते. म्हणून मी जाणीवपूर्वक नकारात्मक शब्द वापरतो, कारण तुम्ही त्याचा चुकीचा अर्थ लावू नये. जर तुम्हाला आध्यात्मिक व्हायचे असेल, तर मुळात, याचा अर्थ असा की तुम्हाला स्वतःच्या सध्याच्या स्वरूपाला संपवायचे आहे. सकारात्मक पद्धतीने सांगायचे झाले तर, तुम्ही मोक्ष शोधत आहात; तुम्ही स्वतःचे परम स्वरूप शोधत आहात; तुम्ही देवाला शोधत आहात; तुम्हाला असीम व्हायचे आहे. जेव्हा तुम्हाला असीम व्हायचे असते, तेव्हा तुम्ही आता जसे आहात त्या प्रकारे राहायचे नसते. एकदा का तुम्ही ही इच्छा व्यक्त केली आणि त्यासाठी आवश्यक ऊर्जा तुमच्यामध्ये गुंतवली गेली, मग तुमच्याबाबतीत घटना अशा प्रकारे घडतील की, तुम्ही सध्या जे काही आहात ते संपून जाईल. याचा अर्थ असा नाही की, तुमच्यासोबत नकारात्मक गोष्टी घडतील. फक्त जीवन तीव्रतेने, खूप वेगाने चालेल.

मग कृपा म्हणजे काय? या अस्तित्वात, ऊर्जा विविध रूपांमध्ये कार्य करते. ती सूर्यप्रकाश, वारा, गुरुत्वाकर्षण म्हणून कार्य करते - त्याचप्रमाणे ती कृपा म्हणूनही कार्य करते. गुरुत्वाकर्षण तुम्हाला खाली ओढत आहे; वारा तुम्हाला उडवून लावू पाहत आहे; सूर्य तुम्हाला जाळून टाकू पाहत आहे - कृपा तुम्हाला पृथ्वीवरून काढून टाकू पाहत आहे. हे नकारात्मक परिभाषेत वापरले आहे. पृथ्वी तुम्हाला आलिंगन देऊ इच्छिते; वर तुम्हाला थंड करू पाहतो आहे; सूर्य तुम्हाला ऊब देण्याचा प्रयत्न करतोय; कृपा तुमचा विकास होण्यासाठी प्रयत्न करते आहे. आपण नकारात्मक परीभाषेने जाऊया जेणेकरून तुम्ही त्यात गुंताणार नाहीत. कृपा तुम्हाला तुम्ही सध्या ज्या मर्यादित कक्षात अडकला आहात त्यातून बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. मर्यादेमध्ये पृथ्वी, माणसे,शरीर, मन, भावना – अगदी सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव होतो. जर तुम्ही कृपेला आमंत्रित केले असेल आणि ती आपले काम करत असेल, जर ती तुम्हाला वर ओढत असेल, पण तुम्ही स्वतःचा नांगर सोडत नसाल, तर तुम्ही अनावश्यक संघर्ष निर्माण कराल. जर आध्यात्मिक प्रक्रियेमुळे जीवन घडत असेल, तर ते माझ्यासाठी ठीक आहे. जर संघर्ष होत असेल, तर तो केवळ यामुळे की, तुम्ही कृपेला तुम्हाला वर खेचून घेण्यासाठी आमंत्रित केले आहे, पण तुम्ही तुमचा नांगर टाकून ठेवला आहे - त्यामुळे, स्वाभाविकपणे, तुम्हाला संघर्ष करावा लागेल.