कर्म - जीवनाची स्मृती
सद्गुरू म्हणतात, कर्म म्हणजे तुम्ही काही चांगले किंवा वाईट केलेले काम नाही. कर्म म्हणजे जीवनाची स्मृती.

सद्गुरू: कर्म या शब्दाने लोकांच्या मनात वेगवेगळ्या प्रकारचा समज निर्माण होतो. कर्म म्हणजे कृती. कृती अनेक पातळ्यांवर असते. शारीरिक, मानसिक, भावनिक आणि ऊर्जेची कृती यांना आपण कर्म म्हणू शकतो. जर ही कृती या चार पैलूंपेक्षा खोल असेल, तर त्याला क्रिया म्हणतात. तर, कर्म आणि क्रिया या दोन्हींचा अर्थ कृती, पण कर्म अशा प्रकारची कृती आहे, जी आपल्या प्रणालीवर एक ठसा किंवा प्रभाव मागे ठेवते. याचा अर्थ त्या कृतीची स्मृती आणि रसायने शरीरात राहतात. क्रिया एक असा प्रकार आहे जो स्वत:हून एका वेगळ्याच पातळीच्या पैलूवर उमटतो आणि शरीरात साठलेल्या कर्माच्या अवशेषांना विघटित करायला सुरुवात करतो.
कर्म अनेक प्रकारची, अनेक वेगवेगळ्या स्तरांची आणि अनेक वेगवेगळ्या आयामांची असतात. तुमच्या वडिलांनी केलेल्या कृती तुमच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या मार्गांनी काम करत आहेत आणि प्रभाव पाडत आहेत, फक्त तुमच्या परिस्थितीतवरच नव्हे, तर तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये. बऱ्याच जणांनी हे पहिले असेल की, जेव्हा तुम्ही अठरा किंवा वीस वर्षांचे होतात, तेव्हा तुम्ही तुमच्या वडिलांच्या किंवा आईच्या विरोधात पूर्णपणे बंड केले होते, परंतु जेव्हा तुम्ही चाळीस किंवा पंचेचाळीस वर्षांचे होता, तेव्हा तुम्ही त्यांच्यासारखेच वागू लागलात. तुम्ही त्यांच्यासारखेच बोलता आणि वागता. हा जगण्याचा एक निराशाजनक मार्ग आहे, कारण जर जीवन पुन्हा पुन्हा तसेच घडत आहे, जर सध्याची पिढी पूर्वीच्या पिढीप्रमाणेच वागू, बोलू, करू, जगू आणि जीवनाचा अनुभव घेऊ लागली, तर ही एक वाया गेलेली पिढी आहे.
या पिढीने जीवनाचा अनुभव अशा पद्धतीने घ्यावा ज्याची कल्पना मागील पिढीने कधी केली देखील नसेल. काही वेडेपणा करून नव्हे, तर तुम्ही जीवनाचा अनुभव कसा घेता त्याला पुढच्या पातळीवर नेले पाहिजे.
जीवनाची स्मृती
पण कर्म केवळ तुमचे किंवा तुमच्या पूर्वजांचे नसते. पहिला एकपेशीय लहान जीव, त्या बॅक्टेरिया किंवा व्हायरसचे कर्मही आज तुमच्यामध्ये कार्यरत आहे. एका सामान्य आकाराच्या शरीरात तुमच्याकडे अंदाजे १० लाख कोटी मानवी पेशी असतात. पण तुमच्या शरीरात, शंभर लाख कोटीहून अधिक बॅक्टेरिया आहेत - तुम्ही दहास एक अशा प्रमाणात कमी आहात! तुमच्या फक्त चेहऱ्याच्या त्वचेवरच १८ अब्ज बॅक्टेरिया आहेत. तुम्हाला ते दिसत नाहीत याचा तुम्हाला आनंद वाटत नाही का?
वास्तविकपणे तुमच्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग बॅक्टेरिया आहेत. आणि ज्या प्रकारचे बॅक्टेरिया तुमच्याकडे आहेत त्यांच्या वर्तणूकीची पद्धत तुमच्या पूर्वजांकडील बॅक्टेरियांवर अवलंबून असते. बॅक्टेरियांची तुमच्या शरीरात आणि इतरांच्या शरीरात वागण्याची पद्धत अत्यंत वेगवेगळी असते आणि ती या स्मृतीवर अवलंबून असते.
तर तुम्ही विशिष्ट गुणवत्तेचे बॅक्टेरियाही वारसा हक्काने मिळवता. त्यांच्याकडेही एक निश्चित कर्माची सामग्री असते आणि ते एका विशिष्ट पद्धतीने वागतात आणि तुमच्या जीवनाची गुणवत्ता ठरवतात. म्हणून कर्म म्हणजे तुम्ही केलेले काही चांगले किंवा वाईट काम नसते. कर्म म्हणजे जीवनाची स्मृती. या एकपेशीय प्राण्यापासून ते इतर सर्व स्वरूपांपर्यंंतच्या जीवनाच्या स्मृतीमुळेच शरीराची जडणघडण झालेली असते. हे एक वैद्यकीय तथ्य आहे की, तुमच्या मेंदूमध्ये एक सरपटणाऱ्या प्राण्याचा मेंदू असतो, जो जवळजवळ एका मगरीच्या मेंदूइतकाच असतो. आता तुम्हाला कळेल, की तुम्ही सगळ्यांचे शाब्दिक चावे का घेता?
तुमच्या स्वतःबद्दल असलेल्या सर्व महान कल्पना खूपच खोट्या आहेत. म्हणूनच आम्ही तुम्हाला म्हणालो होतो, "हे सर्व माया आहे," कारण तुमच्या आत घडणाऱ्या गोष्टीं अशा आहेत की, तुम्ही जे काही करता ते जवळजवळ सर्वच पूर्वीच्या माहितीद्वारे नियंत्रित केले जाते.
"म्हणजे मी अगतिकपणे गुंतून गेलोय असे म्हणायचे का?" गुंतलेले जरूर आहात, पण अगतिकपणे नाही. पशुपतापासून - प्राणी स्वभावाचे एक संमिश्र अभिव्यक्ती - त्या एकपेशीय प्राण्यापासून ते सर्वोच्च प्राण्यापर्यंत - पशुपती होण्याची शक्यता आहे - कोणीही हे सर्व मागे टाकू शकतो आणि त्याच्या सीमा ओलांडून पुढे जाऊ शकतो. मानवी प्रणालीमध्ये, प्रणालीच्या मूलभूत सांगाड्यामध्ये - अस्थींचा सांगाडा नव्हे, तर ऊर्जेचा सांगाडा - किंवा ऊर्जेच्या मूलभूत रचनेत ११२ चक्र किंवा मिलन बिंदू आहेत, ज्याद्वारे तो सांगाडा एकसंघ ठेवला जातो,.
या सर्व चक्रांचे कार्य, प्रणालीमध्ये असलेल्या कर्माचे अवशेष किंवा गत स्मृतीच्या प्रभावानुसार होते, जे या जीवन प्रक्रियेला घडवते. परंतु शारीरिक रचनेच्या बाहेर दोन अन्य चक्रे असतात, जी बहुतेक लोकांमध्ये अत्यंत कमी सक्रिय किंवा जवळजवळ निष्क्रिय असतात. परंतु जर तुम्ही पुरेशी साधना करत असाल, तर ती सक्रिय होतात
११४वे चक्र एका विशिष्ट पद्धतीने स्पंदित होत असते, ज्याचे वर्णन प्राचीन काळापासून औरोबोरोस म्हणून केले गेले आहे - स्वतःची शेपूट खाणाऱ्या सापाचे चिन्ह. तुम्ही हे चिन्ह जवळजवळ प्रत्येक प्राचीन संस्कृतीमध्ये पाहू शकता. भारतात तुम्ही हे सर्व मंदिरांवर पाहू शकता, ग्रीस, इजिप्त आणि मेसोपोटेमियन मंदिरांमध्ये सुद्धा - जवळजवळ सर्वत्र. तुम्ही सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये औरोबोरोस पाहू शकता, ज्या इहलोकापेक्षा पलीकडील गोष्टींवर अधिक केंद्रित होत्या.
आज, आधुनिक गणित औरोबोरोसला अनंत तत्वाचे चिन्ह म्हणून वापरते. म्हणून ११४वे चक्र अनंताच्या स्वरूपात स्पंदित होते. आणि जर तुमच्या ऊर्जा तुमच्या अंतरंगात या आयमाला स्पर्श करत असतील, तर प्रत्येक कृती, तुम्ही जे काही करता, ती मुक्तीची प्रक्रिया बनते, कारण ती कृती आता तुमची नसते, ती अनंताच्या स्वभावाची असते. जर तुमच्या ऊर्जा ११२ मध्ये असतील, तर तुम्ही जी काही कृती करता, त्यात एक अवशेष राहतो, म्हणून तुम्ही अशी कृती करणे योग्य असते जी तुमच्यावर एक सुखद अवशेष ठेवते.
आदिम किंकाळी
एखादी कृती तुम्हाला गुंतवते किंवा ती मुक्तीची प्रक्रिया बनते, हे मुळात एखाद्याच्या साधनेच्या पातळीवर अवलंबून असते आणि त्या कृतीबद्दलचा दृष्टिकोन आणि ती कोणत्या हेतूने केली जाते यावर अवलंबून असते. जर लोक स्वतःच्या जीवनात आवश्यक कृती केल्याशिवाय साधना करण्याचा प्रयत्न करतील, तर साधना एक मोठा संघर्ष बनेल.
जर तुम्ही दिवसाला बारा तास बसून ध्यान करण्याचा प्रयत्न कराल, तर सुरुवातीला हे एक मोठे सौभाग्य वाटेल, पण एका महिन्यात तुम्ही वेडे व्हाल. जर तुम्ही त्या वेडेपणाला पार केले, तर तुम्ही सर्व काही पार कराल, पण बहुतेक लोक, जेव्हा त्यांच्या आत वेडेपणा येतो, तेव्हा हार मानतात, कारण हे सोपे नाही. हा तुमच्या वडिलांची, आजोबांची, तुमच्या पूर्वजांची आणि त्या नालायक जीवाणूंची आदिम किंचाळी आहे. ते सर्व अभिव्यक्तीसाठी ओरडतील. ते शांत राहणार नाहीत. तुम्ही त्या सर्वांना नष्ट करू शकता, पण हा एक कठीण मार्ग आहे, ज्याला बरीच साधना लागते. किंवा तुम्ही स्वतःला त्यांच्यापासून दूर करू शकता - त्यांना ओरडू द्या, पण तुम्ही त्याची काळजी करत नाही, कारण तुम्हाला ते ऐकू येत नाही. हे दोन वेगवेगळे मार्ग आहेत, पण तुम्ही त्यांना दुर्लक्षित करू शकत नाही, कारण ते तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये स्पंदित होत असतात.
त्यापासून दूर राहण्यासाठी खूप मेहनत लागते, किंवा फक्त भक्ती लागते. जर तुम्हाला स्वत:हून हे करावे लागत असेल, तर त्यासाठी कष्ट लागतात. जर तुम्हाला कृपेचा प्रवास करायचा असेल, तर तिथे कष्ट नाहीत, पण तुम्ही चालक नसाल. म्हणून तुम्ही एक तर चालवणे शिका - ज्यामध्ये अनेक धोके असतात - किंवा एक तज्ञ चालक चालवेल आणि तुम्ही मागच्या सीटवर बसून डुलकी घेऊ शकता. आता तुम्हाला तिथे पोहोचणे हेच जर महत्वाचे आहे, तर मग कसे पोहोचता याने काही फरक पडतो का?