प्रश्न: सद्गुरू, त्या दिवशी आपण कर्माबद्दल बोलताना म्हणालात, की जीवनात एका व्यक्तीमध्ये कर्म नोंदवण्याच्या अनेक प्रक्रिया आहेत - मन, शरीर आणि ऊर्जासुद्धा. जरी मन नाहीसे झाले तरी ते शरीर आणि ऊर्जेत कोरलेले असते. नेहमी दुःखात अडकवून ठेवणारा हा एक विस्तृत दुष्ट सापळा असल्यासारखा वाटतो. हे असे का?

सद्गुरु: पहा, जेव्हा मी काही बोलतो, तेव्हा माझे कर्म नोंदवण्यासाठी तुमच्याकडे तीन रेकॉर्डर्स असतात. एक दुष्ट सापळा, जेणेकरून मला माझे शब्द कधीच मागे घेता येणार नाही, ह्याची खात्री करण्यासाठी. एखाद्या बेसावध क्षणी जर मी तुम्हाला काही वचन दिले, तर तुमच्याकडे तीन रेकॉर्डिंग्स असतील, ज्यामुळे मला त्यापासून माघार घेता येणार नाही.

 कर्म हे तुम्ही समजता तसे नसते. त्यात काहीही दुष्ट नसते. तुम्ही जे काही आहात, ते केवळ तुमच्या कर्मामुळेच आहात. तुम्ही जन्मापासून आतापर्यंत जे काही केले आहे, विचार केला आहे, जाणवले आहे आणि अनुभवले आहे ते तुमचे कर्म आहे. तुम्ही आता जे काही आहात ते या कर्मामुळेच आहात. तेच तुम्हाला आजच्या स्थितीत घेऊन आले आहे. तर, कर्म हा काही दुष्ट सापळा नाही. हो, ते एक बंधन आहे, ते रक्षक देखील आहे.  या क्षणी कर्मच तुमच्या भौतिक अस्तित्वाचा आधार देखील आहे. जर कोणतीही कार्मिक गोष्ट नसेल, तर तुम्ही या शरीराला बांधून ठेवू शकणार नाही. कर्म हे सिमेंट आहे, जे तुम्हाला या शरीराशी बांधून ठेवते. जर आम्ही तुमचे सगळे कर्म काढून घेतले, तर या क्षणी तुम्ही स्वतःचे शरीर सोडून जाल, आणि आम्हाला असे नको आहे, की ते आमच्याकडून घडावे. म्हणून, नोंदी होत आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी की तुमच्या शरीराच्या, मनाच्या, संवेदनेच्या आणि ऊर्जेच्या पातळीवर तुमचे काहीही कधीच नष्ट होणार नाही.

तुमच्यातील सर्वात मूलभूत प्रवृत्ती म्हणजे स्व-संरक्षण. स्वतःच्या संरक्षणासाठी तुम्ही स्वतःभोवती एक भिंत उभारता, काही काळापर्यंत त्या भिंतीचा आणि भिंतीमुळे मिळणाऱ्या सुरक्षेचा तुम्ही आनंद घेता.  पण तुमच्या आत असणारा दुसरा भाग नेहमी असीम विस्तारासाठी धडपडत असतो. आता, तुमचा हा आयाम अचानक तुम्हाला सांगतो, की ही भिंत एक तुरुंग आहे. तो भिंत मोडून बाहेर पडू इच्छितो. पण तुमच्यामध्ये आणखी एक भाग आहे, जो स्वसंरक्षणासाठी संघर्ष करत आहे आणि भिंत अधिकच मजबूत करू इच्छितो. तो भिंतीला अधिक रुंद करू इच्छितो. जर तुम्ही मानवाकडे पाहिले, तर चार्ल्स डार्विनच्या मते तुमचा इतिहास हा पशू स्वरूपाचा आहे; पण तुमच्यामध्ये एक असा घटक आहे, जो सतत विस्तार करण्याची इच्छा बाळगत असतो. या इच्छेकडे पाहिल्यास, तुम्हाला असे दिसेल, की ती कधीही संपणारी नाही. जोपर्यंत ती अनिर्बंध होत नाही, तोपर्यंत ती समाधानी होणार नाही.

कर्माचा महाल

पशूत्व तुमचा इतिहास आहे. दैवत्व तुमचे भविष्य आहे. आता तुम्ही एका लंबकाप्रमाणे या मध्ये झुलत आहात. तुमच्या स्वभावाचा एक पैलू, तुमची सर्वात तीव्र प्रवृत्ती, ही स्वसंरक्षणाची आहे. स्वभावाचा दुसरा पैलू सर्व मर्यादा मोडून काढण्याची इच्छा करत आहे. कर्म हा स्वसंरक्षणाच्या भिंती आहेत. तुम्ही एके काळी त्याला फार काळजी घेऊन बांधले, पण आता तुम्हाला स्वतःलाच त्यात कैद झाल्यासारखे वाटत आहे. कर्म हा स्वतःच्या कैदेचा महाल आहे. तुम्ही त्याच्याशिवाय राहू शकत नाही; आणि त्याच्यासोबतही राहू शकत नाही. हीच समस्या आहे. म्हणून आता तुम्ही तुमच्या तुरुंगाचा आकार वाढवण्याचा प्रयत्न करता, पण असे समजा आम्ही तुम्हाला एका ५ x ५ फुटाच्या लहान खोलीत कैद केले. आम्ही तुम्हाला तुमच्या इच्छेविरुद्ध पूर्णपणे कैद केले - तर तुम्ही स्वातंत्र्यासाठी तडफडाल. तुमची स्वातंत्र्याची कल्पना आश्रमाच्या भिंती, म्हणजे कुंपण असेल, जे तुम्हाला माहीत आहे. जर आम्ही तुम्हाला त्यातून बाहेर काढले, तर ते एक विशाल स्वातंत्र्य वाटेल, पण तीन दिवसांतच  तुम्ही डोंगर, आकाश आणि दरवाजा पहाल, आणि तुमची स्वातंत्र्याची कल्पना आश्रमाच्या दरवाजा पलीकडे दूरवर विस्तार करेल. आम्ही म्हणू, ठीक आहे, तुम्ही दानीकंडी गावापर्यंत जाऊ शकता. हे काही काळासाठी विलक्षण स्वातंत्र्य वाटेल, पण मग तुम्हाला कोईंबतूरला जाण्याची इच्छा होईल. जर तुम्ही कोईंबतूरला बऱ्याच फेऱ्या मारल्यात, तर तुम्हाला वाटेल की कोईंबतूर पुरेसे नाही. तुमच्यातील काही लोक जे पारंपरिक आध्यात्मिकतेने खूप प्रभावित झाले आहेत, ते हिमालयात जाऊ इच्छितील. अन्यथा, तुम्हाला  एखाद्या मोठ्या शहरात किंवा इतरत्र  जाण्याची इच्छा होईल. म्हणून तुमची कैदेची कल्पना सतत बदलत असते. तुमची स्वातंत्र्याची कल्पनाही सतत विकसित होत असते.

जीवन टप्प्याटप्प्याने समजून घेण्यासाठी आयुष्य का घालवावे आणि शेवटी मूर्ख असल्यासारखे का मरावे? हीच वेळ आहे याकडे पाहण्याची. तुमची स्वातंत्र्याची कल्पना ही असीमित अमर्याद आहे. तुम्हाला अमर्याद स्वातंत्र्यापेक्षा किंचितही कमी स्वीकारार्ह नसेल. तुम्ही स्वतःकडे पाहिलेत तर हे स्पष्ट होईल. जर तुम्हाला असीमित व्हायचे असेल, तर भौतिक अडथळे मोडून काढणे तुम्हाला असीमित बनवणार नाही, कारण भौतिक कधीही असीमित होऊ शकत नाही. जर तुम्ही भौतिक वास्तवाच्या मर्यादा ओलांडल्यात, भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे गेलात, तरच असीमिततेची शक्यता असते.

निवडीने जगणे

कर्म हे तुम्हाला भौतिक गोष्टींशी जोडते. त्याशिवाय, तुम्हाला जखडून ठेवण्याचा दुसरा मार्ग नाही. म्हणून निसर्ग किंवा निर्माता हे सुनिश्चित करत आहे, की तुमच्याकडे काम करण्यासाठी एक पाया असावा. शरीराशी संलग्न असल्याशिवाय कोणत्याही प्रकारची साधना किंवा शोध शक्य नाही. एक देहविरहित अस्तित्व स्वतःच्या निवडीने शोध घेऊ शकत नाही. तो केवळ प्रवृत्तीनुसार शोध घेऊ शकतो, कधीही निवडीने नाही, जोपर्यंत तो एखाद्या निश्चित पातळीपर्यन्त विकसित झालेला नसेल. खरतर, एका देहधारी अस्तित्वासाठी, प्रत्येक क्षण ही निवड असते. जर तुम्ही स्वतःच्या जीवनात सजग असाल, तर प्रत्येक क्षण हा निवडीनुसार असतो.

याने काहीही फरक पडत नाही - या क्षणीचे कर्म नेहमीच तुमच्या हाती असते

 

ब्रह्मचर्य किंवा संन्यास म्हणजे तुम्ही स्वेच्छेने जीवन जगत आहात. या निवडीच्या प्रक्रियेला एक जीवंत वास्तविकता देण्यासाठी, योगामध्ये आम्ही अनेक गोष्टींची आखणी केली आहे. सकाळी, तुम्हाला अंथरूणात लोळत राहायचे असते. हा शरीराचा स्वाभाविक कल आहे, पण आता तुम्ही सकाळी आसने करता. तुम्ही अंथरूणात जागरुकतेशिवाय लोळू शकता, पण सकाळी आसने जागरुकतेशिवाय करू शकत नाही. स्वाभाविकपणे शरीराच्या हालचालींची पूर्ण प्रक्रिया सजग होते. तुम्ही जीवनात जागरूक कृतीचा हा पैलू आणू  इच्छिता - जागरूक विचार, जागरूक भावना, येथे अस्तित्व राहण्याचा जागरूक मार्ग. संपूर्ण जीवन ऊर्जाच जागरूक होते, कारण जेव्हा तुम्ही जागरूक होता, तेव्हाच तुमचे जीवन तुमच्या निवडीनुसार घडेल. अन्यथा तुमचे जीवन आसक्तींच्या आहारी जाईल. सध्या स्वातंत्र्य आणि बंधनातील फरक हा आहे, तुम्ही एकतर स्वतःच्या निवडीने काम करत आहात किंवा आसक्त होऊन.

माणसाकरिता विविध प्रकारची कर्मे येथे असतात. त्याचे फळही नेहमीच असते, पण त्यातून तुम्ही वेळोवेळी त्याचे काय करता हा निर्णय तुमचा असतो - ते सर्वस्वी तुमच्या हाती असते. तुमचे कर्म कोणत्या प्रकारचे आहे, याने काहीही फरक पडत नाही - या क्षणीचे कर्म नेहमीच तुमच्या हाती असते. जर तुम्ही जागरूक होण्यास तयार असाल, तर या क्षणी, आनंदी किंवा दुःखी होणे हे शंभर टक्के तुमच्या निवडीवर आहे. म्हणून, कर्म नोंदवले जात आहे, किंवा तुम्ही मला काय सांगत आहात ते नोंदवण्यासाठी तीन यंत्रणा वापरत आहात, यात मला काहीही समस्या नाही, कारण मी कधीही माझा शब्दावरून मागे फिरणार नाही. तर यात मला काय अडचण असणार आहे? तुम्हाला आवडेल तेवढे, अगदी तीनशे रेकॉर्डर वापरा. तीच गोष्ट तुम्ही नोंदवाल. निसर्ग लाखो मार्गांनी नोंद करत आहे. तुम्हाला काय समस्या आहे? तुम्ही केवळ पुढे जाऊ शकता. तुम्ही ते मागे घेऊ शकत नाही. म्हणून त्यांना नोंद करू द्या. देवदूतांना, राक्षसांना आणि सर्वांना नोंद करू द्या. झाडे, प्राणी आणि कीटकांना तुमचे कर्म नोंदवू द्या. तुम्हाला काय समस्या आहे?

Editor’s Note: Find more of Sadhguru’s insights in the book “Of Mystics and Mistakes.” Download the preview chapter or purchase the ebook at Isha Downloads.