तुमच्या कर्माचा कारखाना बंद करा - भाग १
सद्गुरू सांगतात, की जर आपण आपल्या विचारांनी आणि हेतूंनी कर्म वाढवत नसलो तर, जीवनाची प्रक्रिया स्वतःहूनच कर्म नष्ट करते,

सद्गुरू: तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणी, तुम्ही काहीही करा किंवा करू नका, तुमचे कर्म विलीन होत असते. जीवनाची प्रक्रियाच कर्म संपवणारी आहे. तुम्हाला एका ठराविक प्रमाणात कर्म मिळालेले आहे, ज्याला आपण प्रारब्ध म्हणतो. प्रारब्ध स्वतःहूनच स्वतःला संपवत असते. पण समस्या अशी आहे, की उत्पादन कारखाना अतिरिक्त वेळ काम करत आहे - नवीन कर्म खूप वेगाने जमा होत आहे. विलीन होणे एका ठराविक गतीनेच होऊ शकते, पण लोक उत्पादनात खूप कार्यक्षम असू शकतात! उदाहरणार्थ, एका सामान्य दिवशी, तुम्ही जागे झाल्यापासून झोपेपर्यंत, जर प्रत्यक्षात फक्त काम करून किती संपवू शकता आणि किती विचार करता याची तुलना केली, तर तुम्ही विचार करता ते, तुम्ही काम करता त्यापेक्षा पन्नास पट जास्त असू शकते. मी अगदी कमीत कमी पन्नास म्हणत आहे. तुम्ही संपवू शकता त्यापेक्षा पन्नास पट जास्त कर्म निर्माण करत आहात. हे अगदी कॅलरीसारखे आहे. तुम्ही ६०० कॅलरीज नष्ट करत आहात, पण ६००० कॅलरीज तयार करत आहात - याचा साठा कुठेतरी होणारच.
तुमचा कर्माचा कारखाना बंद करा
समजा तुम्ही कोणतेही कर्म करत नाही - निष्कर्म - तुम्ही केवळ बसला आहात. याचा अर्थ कर्म अजूनही त्याच गतीने कार्यरत आहे, पण तुम्ही काहीही तयार करत नाही. याच कारणासाठी आध्यात्मिक वातावरण अशा प्रकारे तयार केले जाते, की केव्हा जेवायचे हे तुम्ही ठरवत नाही. घंटा वाजते, आणि तुम्ही जेवायला जाता. काय खायचे हे तुम्ही ठरवत नाही. जे वाढले जाते ते आनंदाने खाता. तुम्ही निवड करत नाही. आम्ही अन्नाचा आनंद घेण्याच्या विरोधात नाही, परंतु फक्त ‘जेवण्याची ईच्छा’ या साध्या कृतीमुळे, विचारामुळे आणि अशा सर्व गोष्टी वाढवून तुम्ही खूप कर्म निर्माण करता. इतके करूनही तुम्ही खूप सारे खाऊ शकता. जर अन्न चांगले असेल आणि तुम्हाला ते खूप आवडले असेल तर कदाचित तुम्ही ५% जास्त खाल. जर तुम्ही १०% च्या पुढे गेलात तर अडचणीत याल. जेवण्याच्या या साध्या कृतीसाठी, लोकांच्या डोक्यात किती विचार चालतात! मी इतर कोणाइतकाच अन्नाचा आनंद घेतो, पण तुम्ही अन्न तुमच्या जिभेवर किंवा पोटात ठेवायला हवे. किंवा तुम्हाला स्वयंपाक करायला आवडत असेल, तर तुम्ही तो भांड्यात करायला हवा. मला स्वयंपाक करायला आवडतो, म्हणून मी तो भांड्यात करतो. जर मला अन्न आवडले, तर मी ते जिभेवर किंवा पोटात ठेवतो. पण तुम्ही ते डोक्यात नेत आहात - ती जागा अन्नासाठी नाही. डोके आणि अन्न कधीही एकत्रितपणे व्यवस्थित काम करत नाहीत - तुम्ही कर्म निर्माण करत आहात.
कृपया तुमच्या जीवनातील प्रत्येक पैलूकडे अशा प्रकारेच पहा. तुम्ही दररोज विलीन करत असलेल्या कर्मापेक्षा पन्नास किंवा शंभर पट जास्त कर्म निर्माण करत आहात. जेव्हा तुम्ही अन्न शिजवता, किंवा जेव्हा तुम्ही आनंदाने खाता, पचवता आणि त्याला स्वतःचा भाग बनवता, तेव्हा तुम्ही कर्म संपवत आहात. जीवनाची साधी प्रक्रिया स्वतःहूनच कर्म विलीन करेल.
आध्यात्मिक मार्ग म्हणजे आम्हाला तुमची कर्म प्रक्रिया जलदगतीवर टाकायची आहे. दिलेल्या भारापेक्षा मोठा कर्माचा भार आम्ही घेऊ इच्छितो, कारण आम्हाला पुन्हा पुन्हा तेच तेच करण्यासाठी परत यायचे नाही. आपल्याला ते आत्ताच संपवायचे आहे. ही एक जाणीवपूर्वक निवड आहे जी एखाद्याने करायला हवी - तुम्हाला ते हळूहळू संपवायचे आहे, की सगळा मूर्खपणा शक्य तितक्या लवकर संपवायचा आहे?
जर तुम्ही सक्रिय आध्यात्मिक प्रक्रियेत प्रवेश केला, तर अचानक तुम्हाला सर्व काही गोंधळून टाकणाऱ्या वेगाने चालल्याचे दिसेल. तुम्हाला दिसेल, की तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त अडचणीत आहात. आधी, अडचणी तुमच्याकडे सहा महिन्यांतून एकदा येत होत्या. आता, दर सहा तासांनी तुम्ही मोठ्या अडचणीत आहात, कारण तुमची कार्मिक प्रक्रिया जलद गतीवर आहे. ज्या मूर्ख लोकांनी जीवनापासून फारकत घेतली आहे, फक्त तेच असे मानतात, की आध्यात्मिकता म्हणजे शांत असणे. नाही. आध्यात्मिक असणे म्हणजे ज्वलंत असणे - आतून, बाहेरून, सगळीकडून. शांतता तेव्हा असेल जेव्हा तुम्ही मृत्यूशय्येवर कायमचे शांत झोपाल. हा उत्साही जीवनाचा काळ आहे! जर तुम्ही आनंदी किंवा खूप खूष आणि सुखी असाल, तर तुम्ही शांत असण्याचा विचार कराल का? असा विचार तुमच्या मनात सुद्धा येणार नाही.
कर्माची गुंडाळी
दुर्दैवाने, आजकाल, मानवता जीवन तीव्र कसे करावे याकडे पाहत नाही, आपण नेहमी जीवन कसे लांबवता येईल याकडे पाहत आहोत. यामुळे, एका ठराविक वेळेनंतर बऱ्याच लोकांच्या स्मरणशक्ती आणि मानसिक क्षमता नष्ट होतात, आणि या व्याधी होण्यामागे कर्म घटक खूप महत्त्वाचा आहे.
कर्म म्हणजे एक विशिष्ट प्रकारचे सॉफ्टवेअर, जे तुम्ही अजाणतेपणी तयार केले आहे. तुमच्या जन्मापूर्वी, गर्भधारणेनंतर ४० ते ४८ दिवसांच्या दरम्यान, हा कार्मिक धागा स्वतःला स्प्रिंग कॉईलसारखा गुंडाळत होता. पूर्वीच्या माहितीनुसार, तुमच्या शरीराची ताकद, तुमच्या पालकांचे स्वभाव, गर्भधारणेचा प्रकार आणि विविध घटकांनुसार स्प्रिंगमध्ये ठराविक प्रमाणात माहिती गुंडाळण्यात येते. हे वळलेल्या स्प्रिंगसारखे आहे. जर तुम्ही फक्त बसून राहिलात, तर ती स्वतःहूनच हळूहळू सैल होईल. तुम्ही जितके स्थिर बसाल, तितक्या लवकर ते स्वतःहूनच सैल होईल, पण तुम्ही सतत क्रियाशील असल्यामुळे आणि नवीन गोष्टी जमा करत असल्यामुळे, ते एका ठराविक गतीने सैल होत असते. जर मी कोणी जन्माला येताना त्यांच्या कार्मिक धाग्यातील ताण पाहिला, तर मी तुम्हाला सहजपणे सांगू शकतो की ते मूल अंदाजे किती वर्षे जगेल - जर कोणी मद्यपी चालक त्या मुलाला धडक देत नसेल, किंवा तो कोणत्याही आध्यात्मिक गुरूच्या संपर्कात येत नसेल तर! जर तो केवळ एक प्रमाणित जीवन जगत असेल, तर आम्ही सांगू शकतो की तो किती काळ जगेल. आम्हाला माहित आहे, की कॉईल एका विशिष्ट गतीने स्वतःहूनच संपून जाईल.
भारतात जेव्हा एखादे मूल जन्माला येत असे, तेव्हा ही एक सामान्य गोष्ट होती: कुटुंब पहिल्यांदा घरी एखाद्या योगी किंवा साधूला आमंत्रित करत असे, किंवा ते मुलाला त्याच्याकडे घेऊन जात असत, कारण त्यांनी त्या मुलाला जाणून घ्यायला हवे असायचे. हे आज देखील आहे, पण सामान्यतः वाढदिवसाच्या पार्ट्यांनी या गोष्टींची जागा घेतली आहे. नाहीतर, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट होती. तुम्हाला तुमचे मूल अशा व्यक्तीकडे न्यायचे असते जो स्प्रिंगचा कसल्याही प्रकारचा अति-घट्टपणा पाहू शकतो, आणि मुलाच्या कल्याणासाठी त्यात सुधारणा व्हावी म्हणून काहीतरी करू शकतो. तरीही, एखादा मद्यधुंद चालक त्याला धडक देऊ शकतो. किंवा एखादा गुरू येऊन त्याला खूप जलद गतीने मुक्त करू शकतो किंवा त्याच्या वर्तमान ओझ्यावर अनेक जन्मांचे कर्म लादू शकतो. तर, काहीतरी वेगळे घडले नाही, तर कर्म एका ठराविक प्रकारे संपत जाते, आणि ते पुन्हा एकदा गुंडाळले जाते किंवा खूप जलद मुक्त होते. अशा गोष्टी काही विशिष्ट कारणांमुळे घडू शकतात.
आज, कार्मिक धाग्यांची काळजी न घेता आपण फक्त मानवी जीवन लांबवण्याचा प्रयत्न करत आहोत, कारण आपल्याकडे जैवरसायनशास्त्रावर काही प्रमाणात प्रभुत्व आहे. आपण औषधे आणि शस्त्रक्रियेद्वारे जीवन लांबवण्याचा प्रयत्न करत आहोत. एका विशिष्ट बिंदूनंतर बऱ्याच लोकांची स्मरणशक्ती आणि मानसिक क्षमता गमावण्या मागे हे एक प्रमुख कारण असू शकते, कारण हे एक "मूक संगणक" आहे - तुम्ही काहीही करा, ते फक्त तुमच्याकडे बघत राहते कारण सॉफ्टवेअर संपला असला तरी, बदललेले हृदय किंवा मूत्रपिंड यांच्यासह हार्डवेअर चालू ठेवले जाते.
जर त्यांनी त्यांच्या जीवनाच्या इतर पैलूंच्या विकासाचा प्रयत्न केला असता आणि थोडे आध्यात्मिक कार्य केले असते - भौतिकतेपलीकडे काहीतरी - मग जरी तुम्ही हजार वर्षे जगलात, तरी आवश्यक ते सॉफ्टवेअर तयार करू शकता, कारण बऱ्याच गोष्टी इतरत्र साठून राहिल्या आहेत. कर्माचे एक कोठार आहे, जे अजून उघडलेले नाही, ज्याला संचित म्हणतात. किंवा, तुम्ही स्वतःला अशा प्रकारे प्रोग्राम केले आहे, की जेव्हा तुमचे सॉफ्टवेअर संपत येते, तेव्हा तुमचे हार्डवेअर टाकून देण्याचेही स्वातंत्र्य असते.