प्रश्न: सद्गुरू, तुम्ही आम्हाला अनेकदा सांगितले आहे, की जर आमच्या जीवनात कटु अनुभव येत असतील, तर ते आमच्या मागील कृतींमुळे आहे. भविष्यातील कटुता टाळण्यासाठी आज आम्ही कोणत्या प्रकारच्या कृती कराव्यात?

सद्गुरू: कोणत्याही अनुभवाची कटुता काय घडले यात नसते, तर तुम्ही त्याला कसे स्वीकारले आहे यात असते. जे एका व्यक्तीसाठी फार कटु असते, ते दुसऱ्या व्यक्तीसाठी चांगले ठरू शकते. एकदा, एक शोकाकुल माणूस एका थडग्यावर पडून रडत होता, स्वतःचे डोके त्यावर आपटत होता, "माझे जीवन! अरेरे! किती मूर्खपणाचे आहे! तू गेल्यामुळे माझा हा देह किती निरर्थक आहे. जर तू अजून जगला असता तर! तुला या जगातून नेण्यासाठी दैव इतके निर्दयी झाले नसते तर! तर सगळे काही किती वेगळे असते!" जवळ उभ्या असलेल्या एका पाद्रीने त्याचे बोलणे ऐकले आणि म्हणाला, "मी असे मानतो की ही व्यक्ती जी या मातीच्या ढिगाऱ्याखाली पडून आहे, ती तुमच्यासाठी खूप महत्वाची होती." "महत्वाची? हो, खरंच," तो अजून मोठ्याने रडत आक्रोश करू लागला, "हा माझ्या पत्नीचा पहिला पती होता!" जे घडत आहे, त्यात कटुता नाही. तर तुम्ही ते स्वतःला कसे अनुभवू देता यावर अवलंबून असते. त्याचप्रमाणे, भूतकाळातील कृती किंवा कर्म हे तुम्ही काय केले यावर अवलंबून नसते, तर ते ज्या हेतूने केले गेले त्यावर आधारलेले असते.

कर्म हे फक्त तुमची काहीतरी करण्याची गरज या संदर्भात असते. जेव्हा तुम्हाला काहीही करण्याची गरज नसते आणि जे तुम्ही आवश्यक आहे फक्त तेच करता, तेव्हा कर्माचे कोणतेही बंधन रहात नाही.

जर तुम्ही स्वतःला माझ्याबाबतीत किंवा माझ्या शिकवणीबाबतीत थोडे खुले ठेवले, तर तुमच्याकडून हेतू काढून घेतला जातो, मग तुम्ही फक्त जे आवश्यक आहे तेच करता. जागरूकता म्हणजे हेच आहे; कोणताही हेतू  नाही. जिथे कोणताही हेतू नसतो, तिथे कर्म नसते. स्वीकृती म्हणजे तुम्ही फक्त आवश्यक आहे तेच करता. अमर्याद जबाबदारी म्हणजे तुम्हाला कोणत्याही गोष्टीबद्दल हेतू नाही. प्रत्येक परिस्थितीत तुमच्या जागरूकतेनुसार जे काही आवश्यक वाटते, ते तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार करता. तुमच्या हेतूचे सामर्थ्यच कर्म तयार करते; मग याने काही फरक पडत नाही, की ते चांगले आहे की वाईट.

लोक मला पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारतात, "तुमचे मिशन काय आहे?" जेव्हा मी त्यांना सांगतो, "माझे कोणतेही मिशन नाही, मी फक्त मजा करत आहे," त्यांना वाटते की मी उथळपणे बोलत आहे. त्यांना हे समजत नाही की या जगात जगण्याच्या बाबतीत, मी करू शकत असलेले हे सर्वात गंभीर विधान आहे, कारण इथे कोणताही विशेष हेतू नाही - फक्त आवश्यक असलेले कार्य करणे, इतकेच. असे केल्याने, तुम्ही ज्या परिस्थितीतून जाता, त्यात कर्म नसते. तुम्ही जे काही करत आहात ते फक्त आवश्यकतेनुसार घडत आहे. कर्म हे फक्त तुमची काहीतरी करण्याची गरज या संदर्भात असते. जेव्हा तुम्हाला काहीही करण्याची गरज नसते आणि जे तुम्ही आवश्यक आहे फक्त तेच करता, तेव्हा कर्माचे कोणतेही बंधन रहात नाही. ते चांगलेही नाही किंवा वाईटही नाही.