स्वप्न आणि कर्म - भाग १
दोनपैकी पहिल्या भागात सद्गुरू स्वप्नाच्या स्वरूपाकडे पाहतात आणि त्याचा कर्माच्या उलगडण्याशी कसा संबंध आहे हे सांगतात.

दोनपैकी पहिल्या भागात सद्गुरू स्वप्नाच्या स्वरूपाकडे पाहतात आणि त्याचा कर्माच्या उलगडण्याशी कसा संबंध आहे हे सांगतात.
सद्गुरू: जेव्हा एखादी व्यक्ती स्वप्न पाहते, त्याला स्वप्नरंजन म्हणतात. जेव्हा लोकांचा एक गट स्वप्न पाहतो, तेव्हा समाज बनतो. जेव्हा स्वप्न वैश्विक असते, तेव्हा सामान्यतः ते वास्तव म्हणून पाहिले जाते. स्वप्न एक ठराविक वास्तविकता आहे, आणि वास्तव एक ठराविक स्वप्न आहे. स्वप्नाची सर्वोत्तम गोष्ट म्हणजे, जेव्हा जाग येते, तेव्हा ते संपते. वास्तवाबद्दलही तसेच म्हणता येईल - जेव्हा तुम्ही जागे होता, तेव्हा ते संपते. वैद्यकीयदृष्ट्या, जेव्हा तुम्ही झोपेत असता, तुमच्या शरीराचे मापदंड थोडे तरल स्थितीत असतात - तुम्ही ध्यान करत असल्यासारखे. म्हणजेच झोप ही जागरणाची अधिक आरामदायी अवस्था आहे, किंवा जागरण हे झोपेची अधिक व्यग्र अवस्था आहे.
हे शब्दांचे काही खेळ आतहे का, एक मनोरंजन, ज्याबाबत आपण म्हणू शकतो की "ठीक आहे, स्वप्न आणि जागृती सारखेच आहेत, वास्तव आणि स्वप्न सारखेच आहेत?" असे नाही. वास्तवाला केवळ त्याप्रमाणेच ओळखले जाते, ज्याप्रमाणे इंद्रिये त्याचे अर्थ दाखवतात. तुम्हाला ते जसे आहे तसे माहीत नाही. म्हणून तुम्ही ज्याला "वास्तव" म्हणता ती तुमच्या मनाची व्याख्या आहे, ज्याला तुम्ही "स्वप्न" म्हणता, ती तुमच्या मनाची व्याख्या आहे. तुमच्या मनामध्ये जे काही घडते तो वास्तवाचा एक प्रकार आहे. आपण त्याला "मानसिक वास्तव" म्हणू शकतो. बऱ्याच जणांसाठी सप्नावस्था ही विचार प्रक्रियेपेक्षा अधिक प्रभावी असते. दुर्दैवाने त्यांना त्यातले फारसे काही आठवत नाही.
कर्माचे उलगडणे
आपण म्हणू शकतो की, जीवन प्रक्रिया म्हणजे आधीच केलेल्या गोष्टींना उलगडणे. जेव्हा आपण म्हणतो, "तुमचे जीवन असे आहे - कारण तुमचे कर्म तसे आहे," याचा अर्थ असा आहे की, तुमचे जीवन म्हणजे आधी केलेल्या गोष्टींचा उलगडा करणे. पण अशी शक्यता असू शकते की, जीवन परिस्थिती कदाचित तुमच्या कर्माशी चांगल्या प्रकारे सहकार्य करणार नाही. जर तुम्ही उघड्या डोळ्यांनी एखादे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असाल आणि जगाकडून त्या स्वप्नाला सहकार्य मिळवू पाहत असाल, तर हा जगण्याचा एक निराशाजनक मार्ग आहे, कारण जग तुमच्या स्वप्नाला सहकार्य करणार नाही. त्यांच्याकडे स्वतःच्या गोष्टी आहेत. तुम्ही तुमच्या स्वप्नात विशिष्ट प्रकारच्या कर्माच्या प्रवाहासाठी अनुकूल वातावरण तयार करू शकता. जीवन जर अचेतन कर्म उलगडण्याच्या पलीकडे गेलेले असेल आणि एक जागरूक प्रक्रिया बनले असेल, फक्त तेव्हाच जागृत अवस्था अधिक अर्थपूर्ण असते. जर जीवन आधीच केलेल्या गोष्टींचा उलगडा करण्यापुरते मर्यादित ठरत असेल, तर तसे करण्यासाठी स्वप्न ही एक निश्चितच चांगली जागा आहे.
योगिक संस्कृतीत शिवाला म्हणजे महादेवाचे वर्णन एकतर संपूर्ण निद्रावस्था किंवा संपूर्ण जागृतावस्था म्हणून केले जाते. ही संपूर्णपणे जागरूक अवस्था आहे: एकतर तो अस्तित्वात नाही, किंवा तो पूर्णपणे सुरु आहे. त्याच्यासाठी कोणतीही मधली वास्तविकता नाही - कारण जर काहीही उलगडण्यासारखे नसते, तेव्हा केवळ निश्चलता आणि जागृती असेल. कोणतीही स्वप्नावस्था असणार नाही. जेव्हा मी "स्वप्न" म्हणतो, तेव्हा मी फक्त झोपेत दिसणाऱ्या दृश्याबद्दल बोलत नाही, जरी तुमचे डोळे उघडे असले तरी तुम्ही स्वप्नावस्थेत असता. या क्षणी, तुम्ही निर्मितीला पूर्णपणे स्वप्नासारखे अनुभवत आहात. हे जसे आहे तसे नाही.
स्वप्नाची शक्ती आणि क्षीणता एकाचवेळी उपस्थित असते. ज्या व्यक्तीने स्वप्नात हरवून जाणे स्वीकारले असेल, त्याच्यासाठी ती एक शक्तिशाली गोष्ट असते. परंतु जो थोडे अंतर ठेवून त्याकडे पाहतो, त्याच्यासाठी ती एक अत्यंत क्षुद्र गोष्ट असते. हे तुम्ही स्वप्नाच्या संदर्भात स्वतःला कसे ठेवता यावर अवलंबून असते.
तुम्ही स्वप्नात कर्म गोळा करू शकता का? कर्माचा साठा हा तुम्ही करत असलेल्या कृतीत नसतो. तो तुमच्या कृतीच्या संकल्पनेत किंवा हेतूत असतो. तुम्ही स्वप्नामध्ये एखादा हेतू ठरवन्यासाठी सक्षम आहात का? तुम्ही असे ठरवू शकता का, की "आज मी असे स्वप्न पाहणार आहे"? नाही. स्वप्नात कोणताही संकल्प नसतो. म्हणून स्वप्न हे केवळ एक उलगडण्याची प्रक्रिया असते. दिवसाही, बहुतेक वेळा तुम्ही फक्त आधीच केलेल्या गोष्टींचा उलगडा करत असता. तुमचा राग, तुमची महत्वाकांक्षा, तुमची निराशा, तुमचे प्रेम, तुमचा उत्साह, तुमचा द्वेष - यातल्या बहुतेक गोष्टी केवळ कर्माचे विसर्जन असते, तुमची कृती नसते. हे फक्त तेव्हाच समजेल, जेव्हा तुम्ही त्याला थांबवण्याचा प्रयत्न कराल. उदाहरणार्थ, काल तुम्ही एखाद्या व्यक्तीवर खूप रागावलात, आणि आज तुम्ही ठरवले, "मला या व्यक्तीवर राग धरायचा नाही." पण जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला भेटाल, तुम्हाला पुन्हा राग येईल. म्हणजे हे तुमचे काम नाही हे स्पष्ट आहे. बहुतेक वेळा, तुम्ही फक्त आधीच केलेल्या गोष्टींच्या उलट करत असता. जेव्हा स्वतःला रूपांतरित करण्याचा प्रयत्न कराल, तेव्हाच तुम्हाला हे कळून येईल. कर्म प्रक्रियेचे हे उलगडणे खूप खरे वाटते, असे वाटते की, ते तुम्ही करत आहात. जेव्हा आपण "कर्म" म्हणतो, तेव्हा आपण म्हणतो की, हे तुमचे काम आहे. जेव्हा एखाद्याला विश्वास असतो की, तो जे काही करत आहे तो ते स्वतःच्या हेतुनुसार करत आहे, ही अज्ञानाची एक मूलभूत अवस्था आहे.
स्वार्थाचा त्याग
एक मंत्र आहे की, "सर्व काही तूच आहेस, महादेवा, सर्व काही तूच आहेस. माझा वाईटपणा, माझ्या मनाची करणी आहे, माझी कृती ही माझ्या शरीराची आहे – यात मी कुठे आहे? मी अस्तित्वातच नाही. सर्व काही तुझेच आहे." जेव्हा एखादा खरा भक्त असे म्हणतो, तेव्हा ही एक अत्यंत सुंदर जाणीव आहे. पण जर मन असे म्हणत असेल, तर ती एक खोटारडेपणाची उच्च पातळी आहे. बहुतेक माणसे जेव्हा गोष्टी त्यांच्या आवडीप्रमाणे नसतात, तेव्हा दोष दुसऱ्यावर किंवा कोणत्यातरी अन्य गोष्टींवर टाकायला शिकलेली असतात. हे केवळ तेव्हाच ठीक असेल - जेव्हा तुम्ही जे आवडते आणि जे नको असते, जे अपयश आहे आणि जे यश आहे, या सगळ्यांचे श्रेय सरसकट कुणाला तरी द्यायला तयार असाल तर. जेव्हा तुमचे कल्याण आणि तुमचे दुःख दोन्ही कुणाला दिले जात असेल, तर ते ठीक आहे. पण जर तुम्ही फक्त तुमच्या दुःखाचे श्रेय देत असाल, तुमच्या कल्याणाचे नाही - तर तुम्ही हा एक चुकीचा व्यवहार करत आहात. एखादा ठार वेडा असल्याशिवाय असा व्यवहार करणार नाही.
अत्यंत मंद बुद्धीचा माणूस स्वतःच्या स्वार्थाबाबत खूप हुशार असतो. जेव्हा माणूस अधिक आणि अधिक बुद्धिमान होतो, फक्त तेव्हाच तो स्वतःच्या स्वार्थाकडे कमी लक्ष देतो. जितकी माणसे अज्ञानी असतात, तितकीच ती स्वतःच्या स्वार्थाबद्दल चतुर असतात. तुम्ही हे पाहिले आहे का? स्वतःच्या मर्यादित स्वरूपात रस घेणे म्हणजे एक मूर्खपणाची गोष्ट आहे. व्यक्तीला आणि मानवजातीला त्यामुळे भयंकर नुकसान होत आहे. जिथे तो ब्रह्मांडासारख्या व्यापक गोष्टीत रस घेऊ शकतो, तिथे तो एका छोट्याशा व्यक्तीत रस घेत आहे, जी क्षुल्लक आहे. जेव्हा बुद्धी विकसित होते आणि ती विविध गोष्टींकडे पाहू लागते, तेव्हा मनुष्य स्वतःच्या स्वार्थाकडे इतके लक्ष देत नाही. जेव्हा बुद्धी खरोखर फुलते, तेव्हा कोणताही स्वार्थ नसतो.