कर्मापासून मोक्षापर्यंत
सद्गुरू कर्माचे स्वरूप आणि त्याचा मोक्ष किंवा परममुक्तीशी असलेला संबंध समजावून सांगतात.

प्रश्न: सद्गुरू, कर्माच्या सिद्धांताबद्दल थोडक्यात सांगता का आणि मोक्ष कसा मिळवावा आणि जन्म-पुनर्जन्माच्या चक्रातून कसे मुक्त व्हावे?
सद्गुरू: कर्म म्हणजे कृती. इथे बसलेले असताना, तुम्ही चार प्रकारच्या कृती करत आहात. तुमचे शरीर काहीतर करत आहे - नाहीतर तुम्ही जिवंत राहिला नसता. त्याचप्रमाणे तुमचे मन, भावना आणि जीवन ऊर्जा देखील काहीतरी कृती करत आहेत. या चारही तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणी घडत आहेत - जागे असताना आणि झोपेत. तुमचे ९९% पेक्षा अधिक कर्म, कृती, अजाणतेपणी असतात. परंतु या कृतींच्या अवशेष स्मृती तुमच्या आत साठत जातात.
उदाहरणार्थ, तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालत जाताना, कदाचित १० वेगवेगळ्या प्रकारचे वास असतील, पण त्यात काहीतरी तीव्र असल्याशिवाय तुमच्या ते लक्षात सुद्धा येणार नाही. पण तुमच्या नाकपुडीत गेलेल्या त्या सर्व १० वेगवेगळ्या गंधांची तुमच्या आत नोंद होते. मानवी यंत्रणा अफाट आहे. ती काहीही चुकवत नाही. तुम्हाला त्याबद्दल जाणीव असो किंवा नसो, ती नेहमी सर्वकाही ग्रहण करत असते आणि नोंदवत असते, संपूर्ण वेळ. या आठवणींच्या आधारावर, तुमच्या आत काही प्रवृत्ती विकसित होतात. या प्रवृत्तींना पारंपरिक शब्दात वासना म्हणतात.
कर्म म्हणजे जीवन संपूर्णपणे तुमची निर्मिती आहे. मग तुम्ही ते जाणीवपूर्वक करता का अजाणतेपणी हाच एकमेव प्रश्न आहे. तुमचे जीवन वर स्वर्गातून कोणीही नियंत्रित करत नाही. कर्म म्हणजे तुमचे जीवन तुम्ही घडवता. एकदा का तुम्हाला समजले, की तुम्ही स्वतःचे बहुतांश जीवन हे अजाणतेपणातून घडवत आहात, तर हे स्वाभाविक नाही का की तुमच्या बुद्धीने शक्य तितके जागरूक होण्याचा प्रयत्न करावा? जागरूकता ही एका बल्बच्या व्होल्टेजसारखी आहे. जर तुम्ही व्होल्टेज वाढवले, तर ते सर्वकाही दाखवते. जर व्होल्टेज कमी केली, तर फक्त थोडेसे दाखवते. जागरूक बनण्याचा प्रयत्न करण्यात काही अर्थ नाही. जर तुम्ही तुमच्या जीवन ऊर्जेला तीव्र केलेत, तर जागरूकता तुमच्या आत तेवत राहील. जर तीव्रता नसेल, तर फक्त जागरूकतेबद्दल बोलून आणि वाचून ती शक्य होणार नाही.
कर्म पुसून टाकणे
आपण समजून घेतले पाहिजे, की भारतीय संस्कृतीत देव आपले ध्येय नाही. देव हे फक्त एक साधन आहे. आपला परम उद्देश आणि सर्वोच्च मूल्य म्हणजे मुक्ती, स्वातंत्र्य, मोक्ष. सध्या स्वर्ग ही चांगली जागा वाटत असेल, पण तुम्ही जर तिथे गेलात, तर काही काळानंतर कंटाळून जाल. पण तरीही, तुमच्याकडे पुरावा आहे का, की तुम्ही आधीच स्वर्गात नाहीत याचा? तुम्ही आधीच स्वर्गात आहात आणि ते खराब करत आहात! जर तुम्ही इच्छुक असाल, तर दिव्यत्वाची उपस्थिती इथेही तितकीच आहे, जितकी इतरत्र आहे.
मुक्ती म्हणजे चक्र मोडणे. तुम्हाला चक्र मोडायची गरज का वाटावी? लोक असा विचार करतात, की जर तुम्ही दुःखी असाल, तर तुम्हाला चक्र मोडायची गरज वाटेल. अजिबात नाही. दुःखी माणूस परत येताना अधिक श्रीमंत, चांगला, निरोगी, उंच, अधिक सुंदर, अधिक काहीही असायची इच्छा करेल. पण असा माणूस, ज्याने जीवनाचे सर्व पैलू पाहिले आहेत, तोच याच्या पलीकडे जाण्याची इच्छा करेल. मुक्ती म्हणजे आम्ही आपण साठवलेल्या कर्माच्या अशा माहितीला संपवून टाकू इच्छितो, जी जीवनाला अडकवून ठेवते आणि स्वतःभोवती एक आवरण तयार करते. जर तुम्ही या कर्माच्या माहितीला विघटित केले, तर जीवन म्हणजे तुम्ही किंवा मी नसेल - तर ते फक्त जीवन असेल. हे एक जिवंत ब्रह्मांड आहे. उपमा द्यायची झाली तर - जर तुम्ही साबणाचा एक बुडबुडा बनवला, तर तो बुडबुडा खरा असतो. पण जर तो फुटला, तर फक्त एक थेंब पाणी खाली पडेल. बाकीचा बुडबुडा नाहीसा होईल. बुडबुड्यात असलेली हवा भोवतालच्या हवेत मिसळून जाईल.
जीवन फक्त तुमच्या आतच नसते, तर तुमच्या बाहेर सुद्धा आहे. म्हणूनच तुम्ही श्वास घेता आणि सोडता. तुम्ही त्याशिवाय अस्तित्वात राहू शकत नाहीत. तुम्ही त्याला ऑक्सिजन म्हणा किंवा आणखी काही, त्याने काही फरक पडत नाही. मुळात, ज्याला तुम्ही जीवन म्हणता ते सर्वव्यापी आहे. ते त्या माहितीनुसार वागते, ज्यात ते अडकलेले असते. यालाच आपण कर्म म्हणतो. कर्म हे एका सॉफ्टवेअरसारखे आहे. सगळी एकच जीवन ऊर्जा आहे, पण वेगवेगळ्या सॉफ्टवेअरसह. म्हणूनच ती पूर्णपणे वेगळ्या प्रकारे वागते. जर तुम्ही कर्माच्या सॉफ्टवेअरला पूर्णपणे विघटित केले, तर जीवन कुठे जाईल? कुठेही नाही - ते तिथेच आहे. फक्त व्यक्तिगत ओळख हरवून जाईल. खरंतर, तुमच्यातील जीवनाला कधीच व्यक्तिगत ओळख नसते. फक्त तुमचा सॉफ्टवेअर व्यक्तिगत असतो. जर तुम्ही त्याला अजाणतेपणी घडवले आहे, तर तो विविध रूप धारण करेल - काही तुम्हाला आवडतील, काही आवडणार नाहीत. जर तुम्ही कर्माच्या सॉफ्टवेअरला जाणीवपूर्वक घडवले, तर तुम्ही हवे ते निर्माण कराल.
संपादकीय टीप:
या लेखाची एक आवृत्ती मूळत: जानेवारी २०१६ च्या ईशा फॉरेस्ट फ्लॉवर मध्ये प्रकाशित केली गेली होती. "आपली किंमत ठरवा, कोणतीही किमान नाही" या आधारावर पीडीएफ डाउनलोड करा किंवा छापील आवृत्तीचे सदस्यत्व घ्या.
