प्रश्न: सद्गुरू, मला तासंतास शांत बसून राहवासं वाटतं, पण मला माझं शरीर थोडा वेळ सुद्धा स्थिर ठेवता येत नाही.ही मर्यादा मला कशी ओलांडता येईल?

सद्गुरू: स्थिर बसण्यासाठी शरीराला वळण लावणं आवश्यक आहे – हट-योग त्यासाठीच आहे. पण तुमचं शरीर जरी सुदृढ असलं तरी इतर काही पैलू स्थिरावल्याशिवाय तुम्हाला स्थिर बसता येणार नाही.

योगाचे आठ अंग आहेत – यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. त्या पायर्‍या नाहीत, ते योगाचे अंग आहेत. तुम्हाला आठ अंग (अवयव) असतील तर आधी कुठल्या अंगानं हालचाल करायची हे तुमच्या गरजेनुसार ठरवण्याची निवड तुमच्या हाती असेल. कुठल्या अंगानं आधी हालचाल करायची असा काही नियम आहे का? तुम्ही भारतीय आहात म्हणून उजवा पाय आधी टाकायचा, असं समजू नका. जीवनातल्या काही बाबतीत उजवा पाय आधी टाकणे जास्त चांगले आहे तर काही बाबतीत डावा पाय आधी टाकणे जास्त चांगले आहे. कोणता पाय आधी टाकायचा हे तुम्हाला कोणतं काम करायचं आहे त्यानुसार ठरेल. त्याचप्रमाणे योगाचं कुठलं अंग आधी वापरायचं हे तुमच्या सध्याच्या स्थितीनुसार ठरेल.

मानवतेच्या इतिहासात फार पूर्वीपासून शरीर हा फार प्रबळ पैलू आणि त्याचबरोबर एक मोठा अडथळा मानला गेला. म्हणून लोकांकडून आधी हट-योग करून घेतला जात असे. काही शतकांपूर्वी पर्यंत फक्त ५ ते १० % लोकांना मानसिक आजार होते.

बाकी लोकांना फक्त शारीरिक व्याधीच होत्या. आजही ग्रामीण भागातल्या लोकांमध्ये बहुधा शारीरीक व्याधीच आढळतात, मानसीक नाही. पण मागच्या काही पिढ्यांत लोकांमध्ये शारीरिक व्याधींपेक्षा मानसिक समस्याच अधिक दिसून येत आहेत कारण ते आपल्या मनाचा वापर त्यांच्या शरीरापेक्षा जास्त करत आहेत. मानवासाठी हा फार मोठा बदल आहे. १००-२०० वर्षांपूर्वी मनुष्य आपल्या मनापेक्षा आपल्या शरीराचा वापर कितीतरी जास्त प्रमाणात करत होता.

मी या काळातला असल्यामुळे मी आता इथे असलेल्या लोकांबद्दल बोलतोय. आणि त्यांच्या समस्या शारीरिक स्वरूपापेक्षा मानसिक स्वरुपाच्या अधिक असल्यामुळे आम्ही ऊर्जा आणि मनाच्या पातळीवर काम करणार्‍या क्रिया आणि ध्यानापासून सुरुवात करतो आणि त्यानंतर हट-योगाकडे वळतो.

तुम्हाला जर स्थिर बसायचं असेल तर केवळ तुमच्या शरीरावर काम करून चालणार नाही – तुम्हाला तुमच्या मनावर सुद्धा काम करावे लागेल. विशेषत: आजच्या पिढीला संपूर्ण यंत्रणेला – मन, भावना, शरीर आणि ऊर्जा – शांत करणं गरजेचं आहे. आजकालचे लोक पूर्वीच्या लोकांपेक्षा जास्त बुद्धिवान आहेत हा समज चुकीचा आहे. अव्यवस्थित वापरामुळे आज लोकांची मनं पूर्वीपेक्षा जास्त नियंत्रणाबाहेर झाली आहेत, इतकंच!

आपल्या शिक्षण व्यवस्थेची रचनाच अशी आहे की त्यामुळे साहजिकच लोकांची मनं अस्वस्थ आणि अशांत होतात. मुलं कविता वाचून मग गणितं सोडवायला लागतात – ते दोन्ही एकमेकांशी संबंधित आहेत, पण त्यांच्यातला संबंध दाखवून देणारा कोणीच नाही. संगीताकडून ते रसायनशास्त्राकडे वळतात – ते देखील एकमेकांशी संबंधित आहेत, पण त्यांच्यातला संबंध दाखवून देणारा कोणीच नाही; कारण संगीत विभाग आणि रसायनशास्त्र विभागाचं एकमेकांशी पटत नाही.

सगळ्या गोष्टी विभक्तपणे शिकवल्या जात आहेत कारण निव्वळ जाणून घेण्याच्या उत्कट इच्छेमुळे कोणीच शिकत नाहीये. सगळेजण परीक्षा पास करून नोकरी मिळवण्यासाठी शिकत आहेत. हा शिक्षण घेण्याचा विनाशकारी मार्ग आहे आणि जगण्याचा एक क्षुल्लक आणि केविलवाणा मार्ग आहे. तो कितीही मूर्खपणाचा असला तरी जगातल्या बहुतांश लोकांनी त्याच पद्धतीने जगण्याची निवड केलीये.

अलीकडेच मी उच्च वर्गीय लोकांच्या एका कार्यक्रमात गेलो होतो. संध्याकाळची वेळ होती, एका कोपर्‍यात दारू दिली जात होती. कार्यक्रमाचे यजमान म्हणाले “सद्गुरू इथे आहेत, आपण मद्य नको घेऊ.” पण काही लोक स्वत:ला रोखू शकले नाहीत. तिथे एक मंत्री होते ते म्हणाले “सद्गुरू आजच्या जगाचे लोकाभिमुख व्यक्ति आहेत – ते काही हरकत घेणार नाहीत.” मी म्हणालो “संपूर्ण जग कधीपासून दारू प्यायला लागलं?”, आज अशी मान्यता बनवली गेली आहे की तुम्ही लोकाभिमुख असणं म्हणजे तुम्ही दारू प्यायलाच हवी; नाही तर तुम्हाला या जगात काही स्थान नाही.

अलीकडेच मी उच्च वर्गीय लोकांच्या एका कार्यक्रमात गेलो होतो. संध्याकाळची वेळ होती, एका कोपर्‍यात दारू दिली जात होती. कार्यक्रमाचे यजमान म्हणाले “सद्गुरू इथे आहेत, आपण मद्य नको घेऊ.” पण काही लोक स्वत:ला रोखू शकले नाहीत. तिथे एक मंत्री होते ते म्हणाले “सद्गुरू आजच्या जगाचे लोकाभिमुख व्यक्ति आहेत – ते काही हरकत घेणार नाहीत.” मी म्हणालो “संपूर्ण जग कधीपासून दारू प्यायला लागलं?”, आज अशी मान्यता बनवली गेली आहे की तुम्ही लोकाभिमुख असणं म्हणजे तुम्ही दारू प्यायलाच हवी; नाही तर तुम्हाला या जगात काही स्थान नाही.

मानवी मनावर आपण अगदी चुकीचे संस्कार करत आहोत. असं असतांना त्यांनी शांत आणि आनंदी असण्याची अपेक्षा तरी कशी करायची? तश्यानं जमणार नाही. तुम्ही योग्य गोष्टी केल्याशिवाय तुमच्यासोबत योग्य गोष्टी घडणार नाहीत. तुम्ही इथे नुसते बसलेले असतांना तुमच्या शरीरात सहजता नसेल तर तुमच्याकडे धडधाकट असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र असले तरीही तुमच्या शरीरात नक्कीच काहीतरी बरोबर नाहीये. अमेरिकेतल्या वैद्यकीय पाठ्यपुस्ताकांनुसार आठवड्यातून दोन वेळा टॉयलेटला जाणं ही सामान्य गोष्ट मानली गेलीये, हे मला कळलं तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला! योग संस्कृती नुसार योग्यांनी दिवसातून दोन वेळ शौचाला गेलच पाहिजे कारण विष्ठा पोटात राहायला नको. जी गोष्ट बाहेर पडायला पाहिजे ती लवकरात लवकर बाहेर पडलीच पाहिजे. सकाळी उठल्यावर आधी हेच काम करायला हवं. आठवड्यातून दोन वेळा म्हणजे सरासरी दोन दिवस ती तुम्ही तुमच्या पोटात ठेवता, असं असतांना तुमचं मन ठीक राहण्याची अपेक्षा तरी तुम्ही कशी करू शकता? ते ठीक राहाणार नाही कारण तुमचे मोठे आतडे आणि तुमचं मन यांचा थेट संबंध आहे.

मोठ्या आतड्यांचा शेवटचा भाग (कोलोन) मूलाधाराजवळ आहे जो तुमच्या ऊर्जा-प्रणालीचा मूलभूत पाया आहे. मूलाधारमध्ये जे घडतं तेच कुठल्या न कुठल्या मार्गाने तुमच्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये सुद्धा घडतं – विशेषत: मनामधे. आजकालचे वैज्ञानिक असले निष्कर्ष काढत आहेत कारण ते सूक्ष्मदर्शकयंत्राखाली मानवी शरीराच्या एकेका भागाचा विलगपणे अभ्यास करतात; म्हणून प्रत्येक भागासाठी ते एका वेगळ्या निष्कर्षावर पोचतात. या पूर्ण व्यवस्थेचं एकाच वेळी संपूर्ण आकलन बाहेरून करता येणं शक्य नाही ते फक्त आपल्या आतूनच करता येऊ शकतं.

साधना करा, नैसर्गिक पदार्थ जास्त घेता येतील या दृष्टीने तुमचा आहार बदला आणि मग बघा– फक्त दोन-तीन महिन्यातच तुम्ही शांत आणि स्थिर बसाल.