सद्‌गुरु: दुर्योधन त्याच्या वडिलांकडे म्हणजेच धृतराष्ट्राकडे गेला आणि तक्रार करू लागला की, “आजपर्यंत भीमाच्या खुनाचे मी बरेच प्रयत्न केले, पण तरीही तो कायमच माझ्या हातून निसटूत आलाय.” धृतराष्ट्र क्षणभर दचकलेच - राजवाड्यातच त्यांचा मुलगा त्याच्या चुलतभावाला ठार मारण्याचा प्रयत्न करत होता. दोघेही वयाने अवघ्या सोळा वर्षांचे होते. एके दिवशी शकुनीने दुर्योधनाला सल्ला दिला, “हे असे करून चालणार नाही. जर आपण भीमाला राजवाड्याबाहेर मारण्याचा प्रयत्न केला तर ते जास्त सोपं होईल कारण तिथे आपल्याला हवं ते करता येईल. राजवाड्यात हे काम अतिशय सांभाळून आणि बेमालूमपणे करावं लागेल आणि भीम तसा सहजासहजी मरणार नाहीये." शकुनी अजून त्याचे कान भरत राहिला, “बोलणे म्हणजे आपल्या भावना व्यक्त करणे नव्हे - बोलण्याचा उपयोग आपल्या मनात जे आहे ते लपवण्यासाठी केला पाहिजे." "भीमाला मित्रासारखं वागवं, त्याला वरवरचं प्रेम दाखव. त्याच्याशी भांडू नकोस – त्याच्याशी मैत्री कर. त्याच्याकडे द्वेषाने पाहू नकोस - त्याला पाहून स्मितहास्य कर. तो मूर्ख आहे, या गोष्टीने तो सहज फसेल."

पण त्या सर्वांमध्ये जास्त विवेकी असणारा सहदेव एकटाच असा होता, जो या नाटकाने फसला नाही आणि तो दुर्योधनापासून दोन हात लांबच राहिला.

अशाप्रकारे निडर, निर्भय, आणि एक-घाव दोन तुकडे करणारा दुर्योधन, एक कपटी माणूस बनला. तो आधी ईर्ष्या, द्वेष आणि क्रोधाने भरलेला होताच, पण शकुनीने त्याला कपटाची कला शिकवली. अशाप्रकारे दुर्योधनने त्या पाच भावांशी, विशेषत: भीमाशी मैत्री केली. पांडवांना सुद्धा खरंच वाटलं की दुर्योधन आता बदललाय. पण त्या सर्वांमध्ये जास्त विवेकी असणारा सहदेव एकटाच असा होता, जो या नाटकाने फसला नाही आणि तो दुर्योधनापासून दोन हात लांबच राहिला.

सहदेवाला त्याचा विवेक आणि ज्ञान कशा प्रकारे मिळाला त्याची कथा अशी:  एके दिवशी, जंगलात शेकोटीभोवती बसलेले असताना त्याचे वडील पांडू मुलांना म्हणाले, “ही सोळा वर्षे मी फक्त तुमच्या मातांपासून दूर राहिलो नाही, तर मी ब्रह्मचर्याची साधनासुद्धा केली आहे, त्यामुळे मला प्रचंड आंतरिक शक्ती, अंतर्दृष्टी, द्रष्टेपण आणि जबरदस्त विवेकसुद्धा मिळालाय.  पण मी काही गुरु नाही. या सर्व गोष्टी तुम्हाला कशा द्यायच्या हे काही मला माहीत नाही. पण ज्या दिवशी मी मरेन, त्या दिवशी तुम्ही माझ्या शरीराचा एक एक तुकडा घ्या आणि खा. माझं मांस जर तुमच्या मांसात मिसळलं गेलं तर माझं हे सगळं ज्ञान कुठलेही कष्ट न करता तुम्हाला मिळेल. 

सहदेवाचा विवेक 

पांडू मरण पावल्यावर त्याचे अंत्यसंस्कार चालू असतांना भावना अनावर झाल्यामुळे जवळजवळ सर्वजण ही गोष्ट विसरून गेले. पण त्याचवेळी समोरून पांडुच्या मांसाचा बारीक तुकडा घेऊन जाणाऱ्या एका मुंगीला बघून, पांडवांमद्धे सर्वात लहान असणार्‍या पण अतिशय विचारशील असलेल्या सहदेवाला वडिलांनी सांगितलेली गोष्ट अचानक आठवली. त्याने मांसाचा तो छोटा तुकडा उचलला आणि खाऊन टाकला. त्यानंतर त्याचा विवेक आणि सामर्थ्य कैक पटीने वाढलं. तो राजांमध्ये ऋषी होऊ शकला असता, पण कृष्णाच्या लक्षात आलं की हा विवेक भविष्यात विधिलिखित घटनांचा प्रवाह थांबवेल. म्हणूनच कृष्णाने हस्तक्षेप करून सहदेवला सांगितलं की “ही माझी आज्ञा आहे: तुझा विवेक कधीही व्यक्त करु नकोस. जर कुणी तुला प्रश्न विचारला तर नेहमीच दुसर्‍या प्रश्नाने  त्याचे उत्तर दे.” 

तेव्हापासून सहदेव नेहमीच अशा प्रश्नांची उत्तरे प्रतीप्रश्नांनी देऊ लागला. फारच थोड्या लोकांजवळ त्याचे प्रश्न समजून घेण्याचे शहाणपण होते. ज्यांना ते समजलं, फक्त तेच सहदेवाचं ज्ञान ओळखू शकले. ज्यांना ते समजलं नाही, त्यांना असं वाटायचं की तो सर्व गोष्टींबद्दल निव्वळ गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. "सहदेवविवेक" नावाचं एक संपूर्ण शास्त्र त्यापासूनच बनलंय. आजही दक्षिण भारतात, जर कोणी आपल्या हुशारीच प्रदर्शन करत असेल तर ते, "हा तर सहदेवासारखं वागतोय!" असं म्हणतात; कारण लोकांन असंच वाटायचं की विचारलेल्या प्रश्नाला प्रतिप्रश्न करून सहदेव विवेकवान दिसण्याचा प्रयत्न करतो. परंतु प्रत्यक्षात तो आपला विवेक कधीही प्रकट न करण्याची आणि नेहमी प्रश्नांची उत्तरे प्रतीप्रश्नांच्या स्वरूपात देण्याची कृष्णाने दिलेली आज्ञा पाळत होता; जेणेकरून ज्या लोकांकडे त्याचं उत्तर समजण्याएवढा विवेक आहे फक्त त्यांनाच ते उत्तर समजेल; इतरांना तो त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतोय हे कळणार सुद्धा नाही.

एक विषारी चूक

एक सहदेवच असा होता जो दुर्योधनाच्या हृदयात खोलवर पाहू शकत होता आणी तिथे त्याला फक्त विषच दिसत होतं. बाकी चार भाऊ त्याच्या अगदी प्रेमात होते. दुर्योधने त्यांच्यावर भेटवस्तूंचा अगदी पाऊस पाडला. भीमासाठी सर्वात आवडती भेटवस्तू म्हणजे खाद्यपदार्थ. साहजिकच दुर्योधन त्याला हवे तेवढे खायला द्यायचा. भीमाचा खादाडपणा एवढा होता की जेव्हा त्याला भोजन वाढण्यात येई तेव्हा तो इतर सर्व गोष्टी विसरायचा. जो कोणी त्याला अन्न देई तो लगेच त्याचा मित्र होई. तो कायमचा भुकेला होता. म्हणूनच खाऊन खाऊन नुसता वाढत चालला होता.

एक दिवस दुर्योधनाने सहलीची कल्पना मांडली. शकुनीने काळजीपूर्वक योजना आखलेली होती. प्रमाणकोटी नावाच्या ठिकाणी नदीकाठावर त्यांनी एका मंडपाची व्यवस्था केली. ठरल्याप्रमाणे ते सर्व तिथे गेले आणि गरजेपेक्षा जास्त जेवणाची सोय तिथे करण्यात आली होती. दुर्योधनाने यजमान म्हणून पांडवांची भरपूर आओभगत केली. प्रत्येक पांडवाला त्याने अगदी स्वतःच्या हाताने भरवले. इतर सर्वानी मिळून जेवढं अन्न खाल्लं, तेव्हडं भीमाला एकट्याला वाढण्यात आलं. सगळे अगदी भारावून गेले होते. एकटा सहदेव शांतपणे कोपऱ्यात बसून हे सगळं पाहत होता.

कपटीपणाचा हा अपाय आहे. यात गरजेपेक्षा जास्त प्रयत्न केला जातो.

मिठाईची वेळ झाली तेव्हा मिठाईची अक्खी एक थाळी भीमाला देण्यात आली. हळूहळू प्रभाव करेल असं विशिष्ट प्रकारचं विष त्या मिठाईत कालवण्यात आलं होतं. ती पूर्ण थाळी भीमाने फस्त केली. मग ते सगळे नदीवर पोहायला गेले. काही वेळात भीम पाण्यातून बाहेर आला आणि नदीकाठावर विश्रांती घेत पडला. मौजमजेसाठी आणि गप्पागोष्टी करायला बाकीचे सर्व मंडपात परत निघून गेले. जेव्हा दुर्योधन थोड्या वेळाने पुन्हा नदीकडे गेला तेव्हा तिथे भीम त्याला अर्धवट बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. ते पाहून त्याने भीमाचे हात पाय बांधले आणि त्याला नदीत ढकलून दिलं. त्यातच भीम नदीत अशा ठिकाणी बुडाला जिथे विषारी सापा खचून भरलेले होते. 

तिथे त्याला शेकडो वेळा साप चावले आणि त्यांच्या विषाने त्याने आधी खाल्लेल्या विषावर तोड म्हणून काम केले. विषाचा उपचार विषाने केला जातो ही गोष्ट दक्षिण भारतीय सिद्ध वैद्यामध्ये अगदी सर्वज्ञात आहे, आणि आधुनिक वैद्यकस्त्रातील लसीकरण सुद्धा अशाच प्रकारे काम करते. या विषाच्या उताऱ्याने जस-जसं काम करायला सुरुवात केली तसा तो शुद्धीवर येऊ लागला. जेव्हा सापांनी हे पाहिलं तेव्हा त्यांनी आपल्यापैकी एक म्हणून त्याचा स्वीकार केला. वायूपुत्र भीमाला नागराज बाजूला घेऊन गेला आणि त्याला संगितलं की “तुला विषबाधा झाली होती. सुदैवाने, त्यांनी तुला नदीत ढकलले. जर त्यांनी तुला नदीकाठावर सोडलं असतं तर आत्तापर्यंत तू नक्कीच मेला असतास."

कपटीपणाचा हा अपाय आहे. यात गरजेपेक्षा जास्त प्रयत्न केला जातो. ते त्याला मरण्यासाठी नदीकाठच्या बाजूला सोडू शकले असते परंतु त्यांना त्याला जगण्याची थोडीसुद्धा संधी द्यायची नव्हती, म्हणून दुर्योधनने त्याला नदीत ढकलून दिलं आणि त्याच्या  हेतूच्या अगदीच उलट साध्य झालं. नागांनी भीमाला सांगितले, “आम्ही तुला एक अमृत देऊ जे जगात इतर कोणालाही माहिती नाही.” मग त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची विषं, पारा आणि काही विशिष्ट प्रकारच्या वनस्पतींचे मिश्रण तयार केले. दक्षिण भारतात हे मिश्रण आजही नवपाषाण किंवा नऊ प्राणघातक विषं म्हणून ओळखलं जातं आणि औषध म्हणून वापरलं जातं.

नवपाषाण तयार करताना विलक्षण काळजी घ्यावी लागते - एखाद्या घटकाचा अगदी एक थेंब जास्त झाला किंवा दुसर्‍या एखाद्या घटकाचा एक थेंब कमी झाल्यास माणूस मारला जाऊ शकतो. त्यांनी काळजीपूर्वक ते अमृत तयार करून भीमाला दिले. ते प्राशन करून तो महाशक्तिशाली बनला. त्यादरम्यान, इतर चार भावांना भीम बेपत्ता असल्याचे समजले आणि ते घाबरून गेले. त्यांना समजले की त्यांना फसवलं गेलंय, पण ते उघडपणे व्यक्त करू शकत नव्हते, कारण दुर्योधन अगदी मनापासून दुःखी झाल्याचा आव आणत होता. तो भीमाचा शोध घेण्याचे नाटक करीत इकडे तिकडे पळत होता, आणि ओरडत होता “माझा प्रिय भाऊ, माझा एकुलता एक साथीदार कुठे गेला?” सहदेवाने त्यांना स्पष्ट सांगितलं की "त्यांनी त्याला ठार मारलंय." भेटवस्तू आणि खाण्यापिण्याच्या नादात आपला भाऊ गमावला या जाणीवेमुळे हे चार भाऊ पूर्णपणे लाजिरवाणे होऊन घरी परतले. त्यांनी माता कुंतीला घडलेला प्रकार सांगितला.

जेव्हा भीम परतला 

कुंती पुढचे तीन दिवस ध्यानस्थ होऊन बसली. मग ती म्हणाली, “माझा मुलगा भीम मेलेला नाही. त्याचा शोध घ्या.” त्या चार भावांनी आणि त्यांच्या मित्रांनी जंगलात, नदीत आणि सर्वत्र त्याचा कसून शोध घेतला पण त्यांना तो कुठेच सापडला नाही. अखेरीस, त्यांनी हार मानली. ध्यानात झालेल्या दृष्टांताबद्दल कुंतीच्या मनात शंका येऊ लागली आणि शेवटी त्यांनी भीमाच्या चौदाव्या दिवसाच्या श्राद्ध विधीची तयारी केली. भीमाच्या स्मरणार्थ दुर्योधनने मोठ्या श्राद्ध कार्यक्रमाची व्यवस्था केली. परंपरेप्रमाणे, चौदाव्या दिवशी शोक भंग करण्यासाठी त्यांनी आचारी मागवून मोठ्या भोजनाची व्यवस्था केली. मनातून, तो आनंद साजरा करत होता - आणी बाहेरून मात्र शोक करून दाखवत होता. 

हे पाच भाऊ आता सतर्क झाले होते आणि त्यांनी स्वत:च्या माणसांना राजवाड्यात आणून स्वतःचे संरक्षण करण्यास सुरुवात केली.

तेवढ्यात अचानक भीम राजवाड्यात आला. त्याच्या भावांच्या आणि आईच्या आनंदाला पारावार उरला नाही. दुर्योधन आणि त्याच्या भावांचा स्वतःच्या डोळयांवर विश्वास बसेना, आणि शकुनी तर फार घाबरला. त्याला समजेचना की भीम जिवंत आहे की त्याचं भूत आलंय. भीम तर आता हाहा:कार उडवणार होता पण तेवढ्यात विदुर तिथे आले आणि त्यांनी पांडवांना हळूच सल्ला दिला "आत्ता काहीच करू नका, अजून कौरव तुमच्याशी चांगलं वागण्याचं नाटक करत आहेत लपून-छपून तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करत आहेत. आत्ता तुम्ही शत्रुत्व दाखवायला जाल तर ते राजरोसपणे  तुमची हत्या करतील. लक्षात असुदे की तुम्ही फक्त पाच आहात आणि ते शंभर आणि त्यांच्याकडे भलंमोठं सैन्य देखील आहे."

तेवढ्यात अचानक भीम राजवाड्यात आला. त्याच्या भावांच्या आणि आईच्या आनंदाला पारावार उरला नाही. दुर्योधन आणि त्याच्या भावांचा स्वतःच्या डोळयांवर विश्वास बसेना, आणि शकुनी तर फार घाबरला. त्याला समजेचना की भीम जिवंत आहे की त्याचं भूत आलंय. भीम तर आता हाहा:कार उडवणार होता पण तेवढ्यात विदुर तिथे आले आणि त्यांनी पांडवांना हळूच सल्ला दिला "आत्ता काहीच करू नका, अजून कौरव तुमच्याशी चांगलं वागण्याचं नाटक करत आहेत लपून-छपून तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करत आहेत. आत्ता तुम्ही शत्रुत्व दाखवायला जाल तर ते राजरोसपणे  तुमची हत्या करतील. लक्षात असुदे की तुम्ही फक्त पाच आहात आणि ते शंभर आणि त्यांच्याकडे भलंमोठं सैन्य देखील आहे."

भीम आणि त्याच्या भावांनी त्यावेळेपुरता राग आवरला. चौदा दिवसांच्या नागलोकवात त्यांनी दिलेलं अमृत पिऊन भीम महाशक्तिशाली बनला होता, पण  त्यामुळे त्याची भूकही प्रचंड वाढली होती. अशा अवस्थेत जेव्हा त्याने पाहिले की भीम मेलाय असे समजून एक मोठी मेजवानी तयार करणं सुरू आहे पण आता मृत भीम जिवंत होऊन परत आल्यामुळे चोदाव्याचा स्वैपाक बंद झालाय, तेव्हा त्याने तिथे ठेवलेल्या सर्व कापलेल्या भाज्या एका भांड्यात घेतल्या आणि एक नवीन भाजी बनविली. आर्य संस्कृतीत अशी प्रथा आहे की काही विशिष्ट भाज्या एकसाथ मिसळल्या जात नाहीत, परंतु त्याने सर्व काही एकत्र केले आणि त्यातून एक नवीन भाजी बनविली, जी आजही दक्षिण भारतातील काही भागात प्रसिद्ध आहे, त्याला अवियल म्हणतात. अवियल म्हणजे एक प्रकारची मिसळ.

इथून पुढे दोन्ही पक्षांमधील वैर वाढत गेले. हे पाच भाऊ आता सतर्क झाले होते आणि त्यांनी स्वत:च्या माणसांना राजवाड्यात आणून स्वतःचे संरक्षण करण्यास सुरुवात केली. तोपर्यंत त्यांना राजवाड्यातील कट-कारस्थानं आणि गुपितं समजलेले नव्हते - ते लहान मुलांसारखे वागत होते. पण, आता त्यांनी एका साम्राज्यासाठीच्या लढाईची तयारी करण्यास सुरुवात केली.