प्रश्नाकर्ता : जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कौटुंबिक आयुष्यात - उदा. पालकांसोबत, भावंडांसोबत - कोण्या कारणाने वाद किंवा मतभेद होतात, अशावेळेस एकोपा कसा निर्माण करायचा?

सद्गुरू : आता तुम्ही पालक किंवा भावंडे म्हणालात म्हणून तुम्हाला एक पळवाट आहे, - हे लोकं तुम्ही निवडले नाहीत. जर तेच पती किंवा पत्नीसंदर्भात असते, तर तिथे निवडण्याची संधी होती, - मग तुम्ही त्याचा आरोप इतर कोणावरही लावू शकले नसते.

तुमच्या मर्यादा समजून घेण्यासाठी कुटुंब हे चांगलं सराव-मैदान आहे. तुम्ही काही लोकांबरोबर एक कोश तयार करता, याचा अर्थ दररोज तुम्ही जे काही करता, तुम्ही कळत-नकळत एकमेकांच्या पायावर पाय द्याल. ते लोकं काही गोष्टी करतात ज्या तुम्हाला आवडत नाहीत, पण तरी तुम्हाला त्यांच्यासोबत राहावे लागते. हे काही तुमच्या फेसबुक १०००० लोकांच्या कुटुंबासारखं नाहीये की जर तुम्हाला कोणी आवडत नसेल तर तुम्ही त्याला काढून टाकू शकता.

तुमच्या मर्यादा समजून घेण्यासाठी कुटुंब हे चांगलं सराव-मैदान आहे.

कुटुंब हे तुमच्या आवाडीनिवडींच्या पल्याड विकसित होण्यासाठी खूप सुंदर स्थळ आहे. तुमच्या आवाडीनिवडी याच तुमच्यातल्या सक्तीपूर्ण प्रवृत्तीचं मूळ आहे. जेव्हा तुम्ही आवाडीनिवडींमधेच अडकून पडलेले असाल तेव्हा जागरूकतेचा प्रश्नच उद्भवत नाही. ज्या क्षणी तुम्हाला एखादी गोष्ट आवडते अथवा नावडते, त्यावेळेस तुम्ही आपोआपच सक्तीपूर्ण प्रवृत्तींमधून वागाल - आवडीच्या गोष्टीशी अनुकूलतेने आणि नावाडीच्या गोष्टीला सक्तीपूर्ण प्रतिक्रिया देऊन.

जागरूक होताना

तुम्हाला आवडो वा न आवडो, कुटुंब हा एक कोष आहे; काही विशिष्ट काळासाठी तुम्हाला या लोकांसोबतच राहायचे आहे. एकतर तुम्ही हा एक वाईट अनुभव बनवू शकता किंवा तुम्ही तुमच्या आवाडीनिवडींच्या पलीकडे जायला शिकू शकता. समजा तुमच्या पतीविषयी काही गोष्टी आहेत ज्याचा तुम्हाला तिटकारा वाटतो. जर कालांतराने तुम्ही म्हणले, "हा असा असा आहे - ठीक आहे", तर तो काही बदलणार नाही, पण एखाद्या विशिष्ट प्रकारच्या स्वभावाबद्दल किंवा ते जे काही तुम्हाला त्याच्याबद्दल खटकत होते त्याबद्दल, तुम्ही तुमच्या नावडीच्या गोष्टींपल्याड जाता. जर तुम्ही कटू बनलात किंवा टाकून देत -"मला त्यांचा संबंध सोडून दिला पाहिजे," तर लोकांसमवेत राहण्याचे सर्व कष्ट आणि संघर्ष वाया जातील. पण तुम्ही जर म्हणालात,"हो, हे आहेत ते असे आहेत, पण माझ्यासाठी ठीक आहे, चला, मी आनंदाने त्यांच्यासोबत राहतो," तुम्ही जागरूकतेने तरून जाताल.

तुम्ही जर म्हणालात,"हो, हे आहेत ते असे आहेत, पण माझ्यासाठी ठीक आहे, चला, मी आनंदाने त्यांच्यासोबत राहतो," तुम्ही जागरूकतेने तरून जाताल.

जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीनिवडीच्या पलीकडे जाता, तेव्हा नकळत तुम्ही जागरूक होता. नकळत तुम्ही अध्यात्मिक बनता, जो की अध्यात्मिक बनण्याचा एक उत्तम मार्ग आहे. "मी आता अध्यात्मिक मार्ग स्वीकारीन" असं नुसतं म्हणण्याने नव्हे, पण एक जीवनाचा अंश म्हणून तुम्ही तुमच्या मर्यादा ओलांडण्यासाठी, तुमच्या आवडीनिवडींच्या पलीकडे जाण्यासाठी जागरूक होता, ते ही 'अध्यात्म' या शब्दाचा कुठेही उल्लेख न करता. अध्यात्मिक होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे जाणीवपूर्वक अशा एका पातळीपर्यंत उत्क्रांत होणे की जिथे तुम्ही सक्तीपूर्ण प्रवृत्तींमधून प्रतिक्रिया देत नाही. याचा सराव करण्यासाठी कुटुंब हे एक उत्तम मैदान आहे . तुम्ही त्यात सर्वकाळ बंदिस्त नसता. ज्या कोणत्या प्रकारच्या कुटुंबात तुम्ही आहात, ते सारं काही एक विशिष्ट काळासाठी मर्यादित आहे. तुम्ही या काळाचा उपयोग तरून जाण्यासाठी करायला हवा.

जर अवतीभोवतीचे लोकं तुमच्याशी सहमत नसतील, तर तुम्ही अत्यंत योग्य ठिकाणी आहात. आश्रमातील लोकांना मी नेहमी सांगत असतो,"असा एखादा व्यक्ती निवडा ज्यसोबत तुम्ही उभेसुद्धा राहू शकत नाहीत, आणि त्याच्यासोबत आनंदाने काम करायला शिका. हे तुमच्यासोबत चमत्कार घडवून आणेल." जर तुम्हाला जो आवडतो त्यासोबत तुम्ही काम करायचं निवडलं, तर त्या प्रकारच्या लोकांसोबतच काम करण्याची प्रवृत्ती स्वतः आत निर्माण कराल. कुटुंब हा काही प्रश्न नाहीये. तुम्हाला जे आवडते त्याचसोबत राहण्याची आकांक्षा ही समस्या आहे. तुमच्या आवडी निवडू नकात. जे आहे ते आणखी सुंदर कसं करता येईल याचा विचार करा. जे तुमच्यासोबत घडते तो तुमचा प्रश्न नाहीये, तर तुम्ही त्यातून काय घडविता हे तुमचं काम आहे.

जर अवतीभोवतीचे लोकं तुमच्याशी सहमत नसतील, तर तुम्ही अत्यंत योग्य ठिकाणी आहात.

वातावरणावर अवलंबून लोकं अशा गोष्टी म्हणतात,"अरे वा, आज किती छान दिवस आहे" किंवा "अरेरे, आज काय वाईट दिवस आहे." निव्वळ ढग आल्याने हा काही वाईट दिवस होत नाही. वातावरणाची फिकीर निसर्गावर सोडून द्या. एखाद्या दिवशी सूर्य, दुसऱ्या दिवशी ढग, एखाद्या दिवशी पाऊस, दुसऱ्या दिवशी बर्फ - सारं ठीक आहे. जर ऊन असेल, तुम्ही उघड्या छातीने जाता, जर पाऊस असेल, तुम्ही रेनकोट घालून जाता, जर बर्फ पडत असेल, तुम्ही 'स्नोबोर्ड' घेऊन जात. काहीही असो, त्यातून एक उत्तम दिवस घडविणे हे तुमच्या हातात आहे.

अगदी त्याचप्रमाणे, आता तुमच्यासोबत कोण बसलाय याचा अजिबात विचार करू नका. त्या व्यक्तीसोबत बसण्याची एक सुंदर क्रिया तुम्ही घडवू शकता. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला त्याच्यासोबत नेहेमीच बसायचं आहे. प्रत्येकजण येतो आणि जातो. एकतर ते येतात आणि जातात, किंवा तुम्ही येता आणि जाता. जे काही म्हणून इथे आहे, जे जे इथे आहे - सध्यासाठी त्यातून काहीतरी उत्तम बनवा. जर तुमच्याकडे इतर पर्याय असतील, तर तुम्ही बदलू शकता, पण महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ते आनंदाने बदलायला हवे. ते जाणीवपूर्वक निवड केलेले असावे; तुम्ही इथे राहू शकत नाही म्हणून दुसरीकडे उडी मारून बघणे अशी विवशता नव्हे. जर तुम्ही अशा स्थितीत स्वतःला झोकून द्याल, तर जिथेकुठे तुम्ही जाल, तुम्ही तसेच असाल. जर इथे या ठिकाणी हे कसं घडवायचं हे तुम्हाला कळत नसेल, तर ते इतर कुठेही कसं घडवायचं हेही कळणार नाही.

फळाचे मूल्यमापन

तुम्हाला कसे समजेल की अध्यात्मिक क्रिया तुमच्यासाठी काम करतेय किंवा नाही? त्याचे फळ मिळल्यावरच! त्याच लोकांबरोबर जर तुम्ही थोडेसे अधिक आनंदी झालात, अधिक खेळकर झालात, तर ते आधी द्यायचे तसे तुम्हाला त्रास देणार नाहीत - याचा अर्थ तुम्ही प्रगतीपथावर आहात. कुठल्याही ठिकाणी प्रगती ही फळांच्या मूल्यमापनावरून ठरविली जाते, अगदी इथेसुद्धा.

एके दिवशी असं झालं - स्वर्गाच्या द्वारापाशी रांग होती. आत सोडण्यापूर्वी  चित्रगुप्त सगळ्यांचे हिशेब तपासात होता. तेथे चमकदार पोल्का डॉट शर्ट आणि एव्हिएटर चष्मा घातलेला, गळ्याभोवती सिगरेट लटकत असलेला वेगासचा एक इटालियन टॅक्सी चालक होता. त्याच्या बरोबर मागे एक धर्मोद्देशक उभा होता.  त्याने त्या माणसाकडे तुच्छतेने पाहिले. "सगळ्यात आधी, हा असला माणूस स्वर्गाच्या प्रवेशद्वाराच्या रंगेततरी कसाकाय असू शकतो?" पण तुम्हाला माहितीये, देवाची लीला अनाकलनीय असते. जेव्हा टॅक्सी ड्राइवरची वेळ आली, त्याच्या नशिबाला उद्देशून तो म्हणाला,"ठीक आहे, जिथे कुठे तुला मला पाठवायचं आहे, काय हरकत आहे”. टॅक्सी ड्रायव्हरच्या नात्याने तो याला सरावलेला होता - जिथे कुठे गिर्हाईकाला जायचं असतं, तिथे तो जातो, त्याचं गंतव्य स्थान तो स्वतः कधीच निवडत नाही. त्याचे सगळे हिशेब तपासले गेले. मग चित्रगुप्ताने मोठ्या आनंदाने त्याचं स्वागत केलं आणि त्याला एक रेशमी कुर्ता दिला. मग दोन अत्यंत सुंदर देवदूत आले आणि त्याला स्वर्गात घेऊन गेले.

त्याच लोकांबरोबर जर तुम्ही थोडेसे अधिक आनंदी झालात, अधिक खेळकर झालात, तर ते आधी द्यायचे तसे तुम्हाला त्रास देणार नाहीत - याचा अर्थ तुम्ही प्रगतीपथावर आहात.

धर्मोपदेशक या गोष्टीकडे मोठ्या आश्चर्याने पाहत होता. जेव्हा त्याची पाळी आली, त्याचा हिशेब तपासला गेला, त्याचं स्वागत झालं, त्याला झाडू आणि कामगारांचे साहित्य दिले, आणि सांगितले,"तू जा आणि खोली क्रमांक १२७ स्वच्छ कर." धर्मोपदेशक वैतागला,"हे काय चालवलंय? तो इटालियन टॅक्सी ड्रायव्हर एक पापी शहरातून येतो - मला ते नावसुद्धा घ्यायचं नाहीये - आणि तुम्ही त्याला रेशमी कुर्ता आणि देवदूत दिलेत, आणि तो स्वर्गात गेला. आणि मी, मी एक धर्मोपदेशक आहे - मी देवाच्या सेवेत असतो. आणि मझ्यासाठी काय तर कामगाराची वस्त्र-साहित्य झाडू आणि खोली क्रमांक १२७. मला माहितीये हे किती काळ असणार आहे - पण का?" चित्रगुप्ताने त्याकडे पाहिले आणि म्हणाला,"हे पहा, हे काही मंदिरासारखं नाहीये, हा स्वर्ग आहे. इथे आम्ही परिणामांप्रमाणे जातो. जेव्हा तुम्ही उपदेश दिलेत, तेव्हा लोकं झोपायची. पण जेव्हा त्या माणसाने टॅक्सी चालविली, प्रत्येकजण म्हणाला - "अरे देवा! अरे देवा!"

तुम्हीसुद्धा परिणामांप्रमाणे जायला हवे. तुमची अध्यात्मिक क्रिया प्रगती करतीये का नाही हे पाहण्यासाठी फक्त तपासा, की बाहेरचे वातावरण कसेही असो, तुम्ही तुमच्या आत गडबडलेले असता की नाही? जर तुमच्या आत गडबड गोंधळ असेल तर तुम्हाला काहीतरी केलं पाहिजे. तुम्हाला शारीरिक मारहाण झाली नाही, जे काही ते करतात ते शाब्दिक. जे काही त्यांना उत्तम येतं, ते ते बोलतात. जर तुम्हाला उत्तम काय आहे ते माहिती असेल, तर तुम्ही स्वतःला उत्तम ठेवाल. जेव्हा तुम्ही स्वतःला उत्तम ठेवाल, तुम्ही त्यांनासुद्धा तारून नेऊ शकता, पण मी सध्यातरी तितक्या लांबपर्यंत जाणार नाही. जर कोणी तुमच्यावर ओरडत असेल किंवा तुच्छ लेखत असेल, तर त्याने काही फरक पडत नाही. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्यासाठी नवा शब्दकोश लिहू शकता. सर्व तुच्छ गोष्टी तुम्ही गोड, मधुर बनवू शकता. कोणत्याही परिस्थितीत, तुम्हाला हे कळलं पाहिजे की ते जे काही करत आहेत ते उत्तम करत आहेत. दुर्दैवाने, त्यांचं 'उत्तम' हे निव्वळ कचरा असू शकतो - काय करणार. त्याच्यासाठी तुमच्याकडे फक्त करुणा असू शकते.

दुर्गंध ते सुगंध

सध्यातरी, तुम्हाला तिथे असायला हवे. पण बहुतेक वेळेस, फक्त तुम्हीच नाही, आपल्यापैकी सगळेच नको असलेल्या व्यक्ती आणि घटनांमध्ये अडकून पडलेलो असतो. आपण जिथे असतो ती काही सर्वस्वी आपली निवड नसते. पण त्यातून आपण काय निर्माण करतो ही सर्वस्वी आपली निवड असते. त्याचा उपयोग करा. जर तुम्ही ते वापरले तर बाह्यजगसुद्धा तुमच्या निवडीप्रमाणेच बनेल. कालांतराने, तुम्हाला लक्षात येईल की नैसर्गिकरित्या आसपासच्या घटना अतिशय सुंदर रीतीने साधल्या जातील.

प्रथमतः तुम्ही स्वतःला एक सुंदर व्यक्ती म्हणून घडवा. बाकीचे तुम्हाला कसं बघतात हा त्यांचा प्रश्न.

माझा विश्वाबद्दलचा अनुभव अत्यंत विलक्षण आहे. मी जिथेकुठे जातो, लोकं प्रेम आणि आनंदाश्रू भरून असतात. आणखी मला काय हवंय? मला माहितीये की ही काही जगाची वास्तविकता नाहीये. पण सारं जग माझ्याभोवती तसंच आयोजिलं जातं. ते ह्यामुळे की मी पुरेसा वेळ घेऊन स्वतःला घडविताना अशाप्रकारे घडविले आहे की मी कुठेही असो, मी असाच असतो. हळूहळू, जग त्याचं अनुकरण करायला लागलं. तुम्हीसुद्धा ते करा. जग एक विशिष्ट प्रकारे योजिले जाते किंवा नाही याची काळजी करत बसू नका - असंही ते कालांतराने होईलच. प्रथमतः तुम्ही स्वतःला एक सुंदर व्यक्ती म्हणून घडवा. बाकीचे तुम्हाला कसं बघतात हा त्यांचा प्रश्न.

आता इथे, त्यांना गटारीतून चालायचे आहे, काही काळ त्यांना चालू द्या, जोपर्यंत ते थकून जात नाहीत. तुम्ही अशाप्रकारे जगा की जेव्हा ते तुम्हाला पाहतील, गटारीतून चालणारे लोकसुद्धा म्हणतील की हे खरं आयुष्य आहे आणि असंच जगलं पाहिजे. हे त्यांना टळणार नाही. ते कटू आहेत कारण त्यांचा आयुष्याचा अनुभव कटू आणि अतृप्त आहे, आणि हा कटूभाव वादाच्या रूपाने बाहेर पडतो. त्यांच्यासमोर आयुष्य एका वेगळ्या प्रकारे जागण्याचं उदाहरण ठेवा. योगामध्ये, एक चिरंतन चिन्ह म्हणजे कमळाचे, कारण जिथे जिथे चिखल भरगच्च असतो तिथे तिथे कमळ खुलून फुलतं. जितका गलिच्छ चिखल तितकं उत्तम. असली घाण दिव्य सौंदर्यात आणि सुगंधात रूपांतरित होते. हीच आहे अध्यात्मिक प्रक्रिया. गचाळ चिखलाचे सुगंधात रूपांतर करणे म्हणजेच अध्यात्मिक प्रवास.