दिवाळीला नरकचतुर्दशी म्हणूनही ओळखले जाते कारण नरकाने आपली पुण्यतिथी साजरी केली जावी अशी विनंती केली. बर्‍याच लोकांना मृत्यूच्या क्षणी त्यांच्या मर्यादा लक्षात येतात. जर त्यांना आता लक्षात आले तर जीवन सुधारले  जाऊ शकते. परंतु बहुतेक लोक शेवटच्या क्षणापर्यंत थांबतात. नरक हा त्यापैकी एक आहे. मृत्यूच्या वेळी त्याला अचानक कळले की त्याने आपले आयुष्य कसे वाया घालवले आणि तो आयुष्यात काय करत होता. म्हणून त्याने  कृष्णाला विनंती केली की, “आज तू फक्त मला मारत नाहीयेस तर मी केलेल्या सर्व चुकांचा हा शेवट आहे - हे उत्साहात साजरं व्हायला हवं.” त्यामुळे, तुम्ही नरकाच्या चुकांचा शेवट झाला याचा उत्सव साजरा करू नका, तुम्ही तुमच्या सर्व चुकांच्या शेवट साजरा केला पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होते. अन्यथा, दिवाळी म्हणजे भरपूर खर्च, तेल आणि फटाके एवढीच आहे.

तुम्ही नरकाच्या चुकांचा शेवट झाला याचा उत्सव साजरा करू नका, तुम्ही तुमच्या सर्व चुकांच्या शेवट साजरा केला पाहिजे.

नरकाची पार्श्वभूमी चांगली होती. तो विष्णूचा मुलगा होता अशी आख्यायिका आहे. परंतु जेव्हा विष्णूने वराह अवतार  धारण केला तेव्हा हे घडले, म्हणून त्याच्याकडे विशिष्ट प्रवृत्ती आहेत. त्याहीपेक्षा, नरकची मुराशी मैत्री झाली, जो नंतर त्याचा सेनापती बनला. त्यांनी एकत्रितपणे बऱ्याच लढाया लढल्या आणि हजारो लोकांना ठार केले. जर दोघे एकत्र असतील तर नरकाशी वागण्याचा कोणताही मार्ग नसल्यामुळे कृष्णाने सर्वप्रथम मुराचा वध केला. पौराणिक कथेनुसार, मुराला युद्धात जादूची शक्ती असल्याचे म्हटले होते, ज्यामुळे कोणीही त्याच्याविरूद्ध उभे राहू शकत नव्हते. एकदा मुराला मारल्यानंतर नरकाच्या वध ही फक्त औपचारिकता होती.

नरकाचा वध  करण्यात आला  कारण कृष्णाने पाहिलं की आपण त्याला जिवंत राहू दिलं तर तो तसाच पुढे चालू ठेवेल. परंतु जर आपण त्याला मृत्यूच्या जवळ आणलं तर, तो जाणण्यास सक्षम आहे. अचानक त्याला समजलं  की त्याने अनावश्यकपणे खूप बेकार गोष्टी गोळा केल्या आहेत. तो म्हणाला, “तू मला मारत नाहीयेस, तर माझ्या जवळचं  सगळं वाईट घेऊन जात आहेस. तू माझ्यासाठी करत असलेली ही एक चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाला हे माहित असायला हवं. म्हणून मी जमवलेल्या सर्व नकारात्मकतेचा शेवट साजरा झालाच पाहिजे कारण यामुळेच माझ्या आयुष्यात नवीन प्रकाश आला आहे आणि सर्वांनाच असा प्रकाश मिळाला पाहिजे.” तर असा हा दिव्यांचा उत्सव बनला. या दिवशी संपूर्ण देश प्रकाशात उजळून निघतो, आणि तुम्ही तुमच्या गोळा केलेलं बिनकामाचं सामान यादिवशी जाळून टाकणं अपेक्षित आहे. हे आत्ताच करायला हवं. नरकाला कृष्णाने सांगितलं की, “मी तुला ठार मारणार आहे." पण तुमच्यासोबत - जरी कोणी सांगितलं नाही तरी - हे केव्हाही होऊ शकतं.

टेनेसीमध्ये असं घडलं की एक बाई शास्त्रांच्या दुकानात गेली. टेनेसीमध्ये लोकांनी  नियमितपणे नवीन बंदुका खरेदी करणं ही अगदी सामान्य गोष्ट आहे. म्हणून ती बंदुकीच्या दुकानात गेली आणि म्हणाली, “मला माझ्या पतीसाठी रिव्हॉल्व्हर आणि काही गोळ्या हव्या आहेत.” दुकानदाराने विचारलं, “त्याला कोणता ब्रँड आवडेल?” ती म्हणाली, “मी त्याला सांगितलं नाहीये की मी त्याला गोळ्या घालणार आहे.”

आपण सर्व एकाच गोष्टीपासून बनवलेले आहोत पण प्रत्येकजण किती वेगळा आहे हे पहा.

जेव्हा आयुष्य तुम्हाला धडा शिकवेल तेव्हा ते सांगून करणार नाही. म्हणूनच दिवाळी याची आठवण करून देते की एखाद्याने आपल्याला गोळ्या घालण्याची वाट बघत बसण्याऐवजी तुम्ही जागरूक राहून मृत्यूला कवटाळू शकता आणि जागरूक राहून जन्म घेऊ शकता. एखादा माणूस, स्त्री, जीवाणू, विषाणू किंवा तुमच्या स्वतःच्या पेशी तुम्हाला मारतील का हे आपल्याला माहित नाही. काहीतरी तर आपल्याला संपवेलच. प्रत्येकाला आठवण करून देण्याच्या नरकाच्या इच्छेचा उपयोग करून घेणंच उत्तम - “मी स्वतःला काहीतरी बनवू शकलो असतो पण मी वाईट गोष्टी जमवल्या आणि असा बनलो."

आपण सर्व एकाच गोष्टीपासून बनवलेले आहोत पण प्रत्येकजण किती वेगळा आहे हे पहा. प्रश्न फक्त एवढाच आहे की तुम्ही दररोज काय गोळा करताय? तुम्ही तुमच्या आत विष जमा करताय किंवा बनवताय की दैवत्वाचा सुगंध तुम्हाला तुमच्या आत बनवायचाय? ही निवड आहे. नरक जन्माने चांगला असूनही तो वाईटच झाला ही दंतकथा महत्त्वपूर्ण आहे. मृत्यूच्या क्षणी नरकाला समजलं की कृष्ण आणि त्याच्यात फक्त एवढाच फरक आहे की त्या दोघांनी स्वतःला कसं घडवलंय. कृष्णाने स्वत:ला देवरूप बनवलं, तर नरकाने स्वत:ला राक्षस बनवलं. आपल्या प्रत्येकाकडे ही निवड आहे. जर आपल्याला ही निवड करताच येणार नसेल तर मग अश्या उदाहरणांचा काय उपयोग? असं नाही की एखादी व्यक्ती भाग्यवान आहे किंवा किंवा जन्मतःच तशी आहे. एका विशिष्ट पद्धतीने स्वत:ला घडवण्यासाठी खूप काही यातना सोसाव्या लागतात.

एकतर आयुष्याने तुम्हाला धडा शिकवेपर्यंत वाट बघा किंवा स्वतःच स्वत: ला धडा द्या - ही निवड आहे. म्हणूनच कृष्णाने येऊन धडा द्यावा अशी निवड नरकाने केली. कृष्णाने स्वत:लाच धडे दिले. हा एक मोठा फरक आहे. एखाद्याची देवता म्हणून उपासना केली जाते, दुसऱ्याची राक्षस म्हणून निंदा होते - यात हेच तर आहे. एकतर तुम्हीच स्वतःला घडवा किंवा आयुष्य एक दिवस तुम्हाला घडवेल किंवा मोडकळीला आणेल. दिवाळी ही त्याची आठवण आहे. चला यात उजळून निघूया.

Love & Grace

Krishna Battles the Armies of the Demon Naraka, Wikipedia