प्रश्नकर्ता : बऱ्याच वर्षांची साधना करूनही मला असे वाटते की कदाचित मी कुठेही पोहोचत नाहीये. अशावेळी काय करावे?

सद्गुरू: तुम्ही कितीही वर्षे साधना केली तरी तुम्ही कुठेच पोहोचणार नाही. कदाचित कुठे पोचणार नाही असं नाही, तुम्ही खरंच कुठेच पोचणार नाही. कारण साधनेचा हेतूच मुळात कुठेतरी पोहोचणे, हा नाहीये. साधनेचा हेतू हा अशा अवस्थेला येणे जिथे तुम्ही केवळ अगदी सहज असू शकता - हे समजणे की जे इथे आहे ते सर्वत्र आहे आणि जे इथे नाही ते कुठेही नाही. कुठेतरी पोहोचण्याच्या गरजेच्या पलीकडे जाणे म्हणजेच साधना, कारण मुळात कुठेच जाता येत नाही. फक्त इथे आणि फक्त या चालू क्षणात तुमची असू शकता. बाकीचं सारं तुमच्या डोक्यात आहे. साधना तुम्हाला अशा ठिकाणी आणण्यासाठी आहे जिथे दिवसातून निदान काही काळ तरी फक्त सहज बसणे पुरेसे असते. जर तुम्ही जिवंत असाल, तर हे इथे आणि आत्ता; जर तुम्ही मेलात, तरीही ते इथेच आणि आत्ता. हे सोडून कुठे जाण्यासाठी काहीच जागा नाहीये.

"साधना म्हणजे एक साधन"

साधना हे एक साधन आहे. तुमची कुठेतरी जाण्याची आवश्यकता संपली आहे, अशा परिपक्वतेच्या एका विशिष्ट स्तरावर स्वतःला आणण्याची ही एक पद्धत आहे. म्हणूनच साधनेत चिंब भिजलेले लोक कुठेही जात नाही. तुम्ही जगभर प्रवास केला, तरी पृथ्वी गोल आहे की सपाट आहे हे तुम्हाला समजणार नाही; मग जीवनाची रहस्य जाणून घेण्याचं तर विसराच. पण तुम्ही खरोखर इथे हजर असाल, तर जे काही जाणून घेण्यासारखे आहे ते इथेच उपस्थित आहे, कारण आपण बाह्यजगतात काहीही जाणू शकत नाही. मग तुम्ही इथे बसता किंवा हिमालयात बसता किंवा आफ्रिकेत किंवा अमेरिकेत किंवा दक्षिण ध्रुवावर अथवा उत्तर ध्रुवावर, त्याने काही फरक पडणार नाही. कदाचित विशिष्ट वातावरण पोषक असेल, इतर कुठलं वातावरण पोषक नसेल, ती निराळी गोष्ट आहे - पण मुळात, तुमच्या आत जे घडतंय तेच तुम्ही अनुभवता.

साधना ही अशी धन्य प्रक्रिया आहे ज्यातून तुम्ही जाणू शकता की मुळात कुठेही पोहोचायचे नाहीये. जेव्हा कुठे जाण्याची गरज भासत नाही, तेव्हा तुमची साधना फलद्रूप होते. मग तुम्ही नुसते स्वस्थ बसता.

त्यामुळे तुम्ही कोठेही जा, फक्त 'हे'च सोबत असेल. तुम्हाला माहितीये, या पर्वतरांगांना 'वेल्लीयंगिरी' म्हणतात.  याचा अर्थ 'श्वेत पर्वत'. तुम्ही त्याला हिमालय बनवू शकता - असा त्याचा अर्थ. आम्ही त्याला 'दक्षिणेचा कैलास' असंही संबोधतो. जर तुम्ही इथे दीर्घकाळ किंवा पुरेसे समरस होऊन बसलात, तर हेच पर्वत तुमच्यासाठी कैलास होतील; तुम्हाला कुठलाही प्रवास करण्याची गरज नाही. तुम्ही तेच अनुभवू शकता जे तुमच्या आत घडते आहे. जे पर्वतावर घडते ते तुम्ही अनुभवू शकत नाहीत, जे आकाशात घडते ते तुम्ही अनुभवू शकत नाहीत, कुठेही इतरत्र जे काही घडते ते तुम्ही अनुभवू शकत नाहीत.

तुम्ही इथे बसू शकता, कोणाकडेतरी पाहून प्रेम अनुभवू शकता. तुम्ही डोळे मिटून, कोणाचातरी विचार करता, आणि प्रेम अनुभवू शकता, नाही का? तुम्ही एकतर हे बाहेरून उत्तेजित होऊ शकता किंवा आतून उत्तेजित करू शकता, दोन्ही शक्य आहे. तुम्ही एकतर ढकलचाल आहात किंवा स्वतःहून सुरू होणारे आहात. तुम्ही चंद्राकडे पाहता, तुम्ही पृथ्वीकडे पाहता, तुम्ही डोळे बंद करता, तुम्ही डोळे उघडता - तरीही जे काही तुमच्या आत घडत आहे एवढंच तुमच्यासोबत घडत आहे – याहून जास्त नाही किंवा कमी नाही. 

साधना स्वत: ला एका परिपक्वतेच्या पातळीवर आणण्यासाठी आहे जिथे तुम्हाला अगदी सहज दिसतं की तुम्ही काय करता याने काही फरक पडत नाही, जरी तुम्ही डोंगराच्या शिखरावर चढत गेला किंवा दरीत बसून राहिलात याने काही फरक पडत नाही, जगात तुम्ही यशस्वी आहात किंवा नाही, याने काही फरक पडत नाही , तुम्ही सुप्रसिद्ध आहात की नाही याने काही फरक पडत नाही, तुम्हाला तुमच्या आवडतीचा पदार्थ खायला मिळतोय की नाही याने काही फरक पडत नाही, कारण हे सारे तुम्ही कसे अनुभवता यावर अवलंबून आहे. हा काही तुम्हाला अडकवणारा सापळा नाहीये. यामुळेच तर आयुष्य सुंदर आहे. तुम्हाला जाण्यासाठी खरंतर कुठलीच जागा नाही. तुम्ही इथे बसून आनंदी, परमानंदी होऊ शकता, किंवा तुम्ही इथे बसून दुःखी-कष्टी होऊ शकता. तुमच्याजवळ निवडीची ही पूर्ण मुभा आहे. तुम्ही इथे बसून विचार करू शकता,"हा माझ्या आयुष्यातील अत्यंत कृपावंत, पवित्र क्षण आहे." किंवा तुम्ही इथे बसून विचार करू शकता,"हा माझ्या आयुष्यातील अत्यंत त्रासदायक, क्लेशदायक क्षण आहे." आयुष्याने तुमच्यावर कोणतेही बंधन लादलेले नाहीये. सारी बंधनं तुम्हीच लादलेली आहेत. अस्तित्वाने तुम्हाला मुक्त सोडलेले आहे, एकदम मुक्त. काहीही घडण्याची आवश्यकता नाहीये, आणि तरीही तुम्ही तुमच्या आतमध्ये जे काही करता त्यामुळे तुम्ही आयुष्यातून अत्यंत विलक्षणरित्या जाऊ शकता, किंवा तुम्ही सगळीकडे जाऊन आणि काय हव्या-नको त्या गोष्टी करून, तरीही आयुष्यातून अत्यंत दुःखी होऊन जाऊ शकता. हे दोन्हीही तुम्हीच घडवत असता.

"सतत काहीतरी करण्याच्या प्रवृत्तीपासून सुटका"

साधना ही अशी धन्य प्रक्रिया आहे ज्यातून तुम्ही जाणू शकता की मुळात कुठेही पोहोचायचे नाहीये. जेव्हा कुठे जाण्याची गरज भासत नाही, तेव्हा तुमची साधना फलद्रूप होते. मग तुम्ही नुसते स्वस्थ बसता. नुसते बसणे म्हणजे असं नाही की आपण एकाच ठिकाणी बसले पाहिजे. सांगण्याचा उद्देश असा की इकडे-तिकडे जाण्याची इच्छा निघून जाते. जर तुम्ही इथे बसलात, तरी तुम्ही ठीक असता, तुम्ही पळालात, तरी तुम्ही ठीक असता, तुम्ही उडलात , तरी तुम्ही ठीक असता, तुम्ही चाललात, तरीसुद्धा तुम्ही ठीक असता. एकदा का ती कुठीतरी जाण्याच्या प्रवृत्ती निघून गेली की मग तुम्ही अगदी सहज बनता. एकदा का तुम्ही पूर्ण सहज झालात, की मग तुम्हाला काही करण्याची गरज नाही. थोडीशी प्रतिक्षा, बस्स. फक्त जर तुम्ही प्रेमात असाल तरच तुम्ही वाट पाहू शकता. कारण जेव्हा तुम्ही कोणाच्यातरी प्रेमात असता, तेव्हा तुम्ही भावनिकरित्या सुखी असता. प्रेमामुळे बर्‍याच मानसिक चिंता निर्माण होतात कारण सध्या तीच तुमची दुसऱ्या व्यक्तीची काळजी करण्याची कल्पना आहे. त्यामुळे तुमचं मन दुःखी-कष्टी होतं, पण भावना सुखदायक असतात - आणि तरीही हे कल्याणकारी असते.

जर तुम्ही त्रासलेले असाल, वैतागलेले असाल, निराश असाल किंवा रागावलेले असाल, तेव्हा तुम्ही वाट पाहू शकत नाही, कारण तुम्ही दुःखी असता. ज्या प्रकारचे तुमचे कर्म असतील आणि बाहेरून मिळणाऱ्या प्रतिसाद, यांवर तुमचा वाट बघण्याचा काळ बदलू शकतो. ते काही क्षण असू शकतात, किंवा काही वर्षं... फक्त बसणे आणि वाट पाहणे. जेव्हा तुमचे अंतरंग आनंदमयी असते, काही वर्षं वाट पाहणे ही काही मोठी समस्या वाटत नाहीये. तुम्हाला फक्त वाट पहायची आहे.