रणवीर सिंग: मला वाटतं, टेकनॅालॅाजी ही कायम विकसित होत असते, आणि मोबाईल फोन जसे होते त्यापासून आता फार बदलेले
आहेत. यानं, सगळ्याच गोष्टींवर फार परिणाम पडला आहे. मला कधी कधी वाटतं, माणसं अश्या प्रकारची संवांद साधण्यासाठी क्षमता
हाताळण्यासाठी बनली आहेत का? मी आफ्रिकेतल्या एखाद्या जंगलात राहून आणि मी उत्तर ध्रुवावर असलेल्या कुणाशीतरी बोलू शकतो.
मला त्यांचा चेहेरा सुद्धा दिसतो.

आणि त्याचबरोबर, आता सोशियल मिडियाही आहे. यानं खरोखर गोष्टी बदलत आहेत. आठरा, एकोणीस वर्षांची मुलांना तर याची जास्त
सवय आहे. त्यांना या गोष्टी कश्या वापरायच्या हे अधिक चांगलं कळतं. माझा जन्म लॅन्ड लाईन्सच्या वेळेस झाला होता, म्हणून फेसटाईम
सारख्या गोष्टी माझ्यासाठी चमत्कार आहेत. हेच मानवाच्या उत्क्रांतीचं पुढचं पाउल आहे का? हा मोबाईल फोन आपल्याला मिळालेलं
अतिरिक्त अंगच आहे का?

सद्गुरू: आपण निर्माण केलेलं प्रत्येक यंत्र, हे आपल्या अंगीभूत असलेल्या क्षमताच विस्तारित करण्याचा प्रयत्न आहे. आपल्याकडे दृष्टी
आहे, म्हणून आपण टेलिस्कोप आणि मायक्रोस्कोप तयार केला. आपण बोलू शकतो, म्हणून आता आपल्याकडे मायक्रोफोन आणि टेलीफोन
आहे. जेव्हा मी लॅन्ड लाईन वापरून बोललो त्यांत काही गैर नव्हतं. पण आता मोबाईल फोन आहे, जो की कितीतरी अधिक सोयीचा आहे,
पण आता हे ठीक आहे की नाही या प्रश्न येतोय. नाही, हे अगदी ठीकच आहे. 

आपल्यातली सक्तीपूर्ण सवय आपल्याला हाताळायला हवी. टेकनॅालॅाजी आपल्याला प्रचंड सक्षम करणारी गोष्ट
आहे – तिच्याबदल कुणीच तक्रार करता कामा नये.

साधारण पस्तीस वर्षांपूर्वी, मी सतत फिरतीवर असायचो, एका गावातून दुसऱ्या गावात, एका शहरापासून दुसऱ्या शहरात प्रवास करत
असायचो, ईशा फौंडेशनची निर्मिती करण्यासाठी. मला माहित नाही तुमच्यापैकी किती जणांनी पाहिले असतील, पण त्या वेळेस अगदी
विचित्र दिसणारे निळे टेलिफोन बूथ असायचे. लोकल, एस.टी.डी आणि आय.एस.डी! हायवेवर मी एखाद्या असल्या निळ्या खोक्यापाशी
थांबायचो. तो माझा फोनवर बोलण्याचा दिवस असायचा. 

मी कधीच टेलेफोन डायरी घेऊन फिरलो नाही. पण मला आठशे ते नऊशे फोन नंबर आणि नावं अगदी सहज लक्षात राहायची. तर मी
तिथं पोहोचून लगेच, त्या माणसाला पाचशे रुपये काढून द्यायचो. त्याला कळायचं नाही की काय चालू आहे. पण मी त्याला म्हणायचो,
‘असू देत. अॅडव्हांस पेमेंट समज.”. साधारणतः, एका कॅालचे पाच ते दहा रुपये व्हायचे. मी त्याला पाचशे रुपये द्यायचो. त्यावेळेस त्याला
पुढे काय बघायला मिळणार आहे याचा अंदाज नसायचा.

मी त्या बूथ मधे जायचो. तिथं तो अगदी भयानक वास येणारा काळाकुट्ट फोन ठेवलेला असायचा. कुणीतरी त्यावर थोडं परफ्युम मारलेलं
असायचं पण तरीही आधी बोलून गेलेल्यांच्या तोंडाची दुर्गंधी अजूनही रंगाळत असायची. मग मी कॅाल करायला सुरवात करायचो. चार,
पाच, सहा तास. मी महिन्याभरासाठीचे सर्व कॅाल संपवून मगच उठायचो. 

बाकीचे लोक थांबून राहायचे. ते मला बाहेर यायला खाणाखुणा करायचे. पण मी मालकाला पाचशे रुपये आधीच दिलेले असायचे, त्यामुळे
तो त्यांना शांत करायचा. मी माझे सर्व कॅाल संपवून बाहेर यायचो आणि गाडीत बसून निघायचो. नंबर फिरवून फिरुवून माझी बोटं दुखून
यायची.

पण आज, जर मी कुणाचं नाव जरी उच्चारलं, तरी माझा फोन आपोआप त्या माणसाला कॅाल लावतो.

रणवीर सिंग: हो! ते खरंय.

सद्गुरू: यात काहीच वाद नाही. मला या टेकनॅालॅाजीचं खरंच कौतुक वाटतं. पण काही लोक तक्रार करत आहेत, पण त्यांची तक्रार
टेकनॅालॅाजीबद्दल नाहीये. त्यांची तक्रार त्यांच्या स्वतःच्या सक्तीपूर्ण सवयींबद्दल आहे.

सवयीचा गुलाम बनून फोनचा वापर करत राहणं, यात फोनचा काही दोष नाही. जर त्यांनी खायला सुरु केलं, तर त्यांना कुठं थांबावं
माहित नसतं. जर त्यांनी प्यायला सुरु केलं, तर त्यांना कुठं थांबावं कळत नाही. सक्तीपूर्ण सवय ही त्यांच्या आयुष्याच्या सर्वच पैलूंत दिसून
येते. आज यंत्राचं व्यसन जडलंय. पण यानं, पुष्कळ लोक दारूच्या व्यसनापासून तरी लांब ठेवलं आहे.

रणवीर सिंग: चला, काहीतरी चांगलं घडतंय यातून.

सद्गुरू: सक्तीपूर्ण सवयीची समस्या कशी हाताळायची हे आपल्याला कळलं पाहिजे. टेकनॅालॅाजी हे आपल्याला सक्षम करणारं प्रचंड
वरदान आहे – त्याबद्दल कुणीच तक्रार करू नये. नाहीतर मग आपण तुम्हाला काळाकुट्ट फोन असलेल्या त्या निळ्या खोक्यात बंद करायला
हवं. मग तुम्हाला समजेल.

संपादकीय टीप: कुठल्या वादग्रस्त मुद्द्याबाबत जर तुमच्या मनात वादळ उठत असेल, कुणीच ज्या बाबत बोलत नाही अश्या कुठल्या गोष्टीबद्दल जर तुम्ही गोंधळलेले असाल, किंवा असा कुठला प्रश्न तुमच्या मनाला सतावत आहे ज्याचं उत्तर कुणाकडेही नाही, तर हीच संधी आहे! सद्गुरूंना आपले प्रश्न विचारा, UnplugwithSadhguru.org वर.

Youth and Truth Banner Image