!सद्गुरु: चाणाक्ष असणे आणि बुद्धीमान असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पंचवीस वर्षांपूर्वी तुम्ही कोणालातरी बुद्धिमान असे संबोधत असाल. पण सध्या त्याचा अर्थ वेगळा आहे. पण आज तुम्ही बुद्धिमान आहात का नाही, याची कोणालाही फिकीर नाही. तुम्ही फक्त चाणाक्ष आहात का याचीच त्यांना काळजी असते. तुम्ही जर चाणाक्ष असाल, तर तुमचा या जगात निभाव लागू शकतो – आजच्या अर्थव्यवस्थेत उत्तमरीत्या प्राप्ती होईल.!

जर तुम्ही आणि मी असे दोघेजण असू, तेव्हा तुमच्यापेक्षा मी चाणाक्ष असलेले उत्तम. पण जर फक्त मी आणि मीच असेन, तर माझ्यापेक्षा मी चाणाक्ष असणे वेडेपणाचे ठरेल.

परंतु बुद्धिचे स्वरूप वेगळे आहे. बुद्धि नेहेमी स्पर्धा जिंकण्यासाठी सक्षम बनवत नाही. खरे पाहता, तुम्ही इतरांपेक्षा कदाचित मागेच असाल कारण तुम्ही इतरांपेक्षा पुष्कळ गोष्टी पहात असता. जे चाणाक्ष असतात आणि आयुष्यात एखादे छोटे लक्ष्य साध्य करण्याचा प्रयत्न करतात ते कदाचित त्या ठिकाणी खूप लवकर पोहोचतीलही – आणि प्रत्येकजण त्यांच्यासाठी टाळ्या सुद्धा वाजवतीलही. पण तुमची बुद्धिमत्ता अनेक गोष्टींचे आकलन करण्यात इतकी मग्न असल्यामुळे तुम्हाला कदाचित एक पाऊल उचलणे देखील अशक्य असेल.

तुम्ही जर चाणाक्ष म्हणजे, तर त्याचा अर्थ असा आहे, की तुम्ही काहीही करून परिस्थिती स्वतःसाठी फायदेशीर करून घेतली आहे. तुम्ही कोणत्या प्रकारच्या समाजात राहता, काळ कोणता आहे, परिस्थिती कशी आहे, कोणत्या प्रकारची माणसांमध्ये तुम्ही वावरता, त्यानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तींना चाणाक्ष समजले जाते. आज जे लोक प्रामाणिकपणा दाखवतात त्यांना मूर्ख समजले जाते. आणि अप्रामाणिक लोक चाणाक्ष समजली जातात कारण त्यांना एखाद्या परिस्थितीचा फायदा कसा करून घ्यायचा हे माहिती असते.

चाणाक्ष कुत्रा

मला एक गोष्ट आठवते. एकदा एक अगदी चाणाक्ष कुत्रा होता. तो येवढा चाणाक्ष होता, की त्या गावातील इतर कोणत्याही कुत्र्यांपेक्षा तो चांगला कुत्रा आहे असे समजले जात असे. एकदा त्याने थोडे धाडस केले. गावातील कुत्री कधीही जंगलात जात नाहीत हे तुम्हाला माहिती असेलच. कधी कधी कदाचित एखाद्या सश्याची शिकार करायला ते जंगलाच्या सीमेवर जात असतील, परंतु ते जंगलात मात्र कधीही
जाणार नाहीत कारण त्यांना माहिती असते की त्यांचापेक्षा मोठे प्राणी तेथे आहेत, आणि ते प्राणी त्या कुत्र्यां सहजपणे खाऊन टाकतील.

परंतु हा मात्र एक अति-हुशार कुत्रा निघाला, आणि तो घनदाट जंगलात शिरला, आणि एका वाघाने त्याला पाहिले. वाघाने असा प्राणी या आधी कधीही पाहिला नव्हता. त्याने विचार केला, “याची शिकार केली तर दुपारच्या भोजनाची चांगली सोय होऊ शकेल.” त्याने एक डरकाळी फोडली आणि तो कुत्र्याच्या दिशेने येऊ लागला. पण हा कुत्रा खूप चाणाक्ष होता. त्याची तेथून पळून जाण्याची इच्छा होती, पण त्याला माहिती होते, की त्याने जर पळायचा प्रयत्न केला, तर वाघ त्याला अगदी सहजपणे गाठेल आणि खाऊन टाकेल. त्याने जवळच पडलेला एक हाडांचा ढीग पहिला आणि तो म्हणायला लागला, “अरे वा! वाघाचे मास नक्कीच अगदी चवदार असणार. वाघ थोडासा भांबावला आणि मागे
फिरत म्हणाला. “अरे बापरे, हा तर कोणीतरी वाघाला खाणारा प्राणी दिसतो आहे. आणि येवढा मोठा हाडांचा ढीग.” तो मागे फिरला आणि पळून गेला. ते पाहताच तो चाणाक्ष कुत्रा हळूच मागे फिरला.

जवळच्याच झाडावर बसलेल्या माकडाने हा संपूर्ण प्रसंग पाहिला आणि वाघाची चेष्टा केल्याशिवाय त्याला राहवेना. ते वाघाला म्हणाले, “तो तुला मूर्ख बनवून पळून गेला. तो एक लहानसा कुत्रा होता. मी खेड्यात जातो. तो तुला काहीही करू शकणार नाही. तुझ्या एका पंजात असेल येवढीसुद्धा ताकद त्याच्या अंगात नाही.” वाघ ओशाळला. “काय? त्या मूर्खांने मला फसवले? चल, त्याला पकडून आणू.” मग माकड उडी मारून वाघाच्या पाठीवर बसले आणि त्यांनी कुत्र्याचा पाठलाग करायला सुरुवात केली.

कुत्र्याने वाघाच्या पाठीवर बसून येणारे माकड पाहिले. काय घडले असेल हे त्याला समजले, पण तो एक चाणाक्ष कुत्रा होता. त्याने एक जांभई दिली आणि म्हणाला, “कुठे आहे ते मूर्ख माकड? मी आणखी एक वाघ घेऊन ये असे सांगून आता एका तास होऊन गेला. कुठे आहे ते?”

तुम्ही अशा प्रकारे जगाला हाताळू शकता. परंतु जेव्हा तुमच्या आंतरिक स्वरूपाचा प्रश्न उद्भवतो, तेव्हा तुम्हाला त्याचा काहीही फायदा होणार नाही कारण सृष्टीतील निर्मित व्यक्त गोष्टी हाताळणे ही एक गोष्ट आहे, पण निर्मितीच्या स्त्रोताला हाताळणे ही पूर्णतः वेगळी गोष्ट आहे. या ठिकाणी तुमच्या चाणाक्षपणाचा काहीही उपयोग होणार नाही. जेंव्हा तुम्ही आणि दुसरा अशा दोन व्यक्ती असतात, तेंव्हाच चाणाक्षपणाचा उपयोग होतो. जेव्हा फक्त तुम्ही आणि केवळ तुम्हीच असता, तेंव्हा तुम्ही जितके अधिक चाणाक्ष आहात असे तुम्हाला वाटायला लागेल, तितकेच तुम्ही मूर्ख बनाल.

आपल्या मूर्खपणाची जाणीव 

आत्मज्ञान म्हणजे काही मोठा पराक्रम नाही. ज्ञानप्राप्ती म्हणजे आपण आपल्या अज्ञानाला भेदले आहे. तो एक साक्षात्कार आहे – म्हणजे तुम्ही किती मूर्ख आहात याची तुम्हाला जाणीव झालेली आहे. जे नेहेमीच उपस्थित होते, ते तुम्ही आज पाहिलेत. आपण किती मूर्ख आहोत याची जाणीव होण्यासाठी खूप मोठी बुद्धि लागते. बहुतांश व्यक्ती ते पाहू शकत नाहीत. इतर व्यक्तींपेक्षा चाणाक्ष आणि विशेष असण्याची, इतर व्यक्तींपेक्षा चांगले असण्याची इच्छा तुमच्या मनातून संपूर्णपणे नाहीशी झाली, तरच तुम्ही ते पाहू शकता. आणि तेंव्हाच तुम्हाला तुमच्या अज्ञानाचा भेद करण्याची बुद्धि प्राप्त होते. आध्यात्मिक प्रक्रियेनी तुम्ही जर चाणाक्ष होत असाल, तर तुमचे अज्ञान केवळ अनेक प्रकारची सोंगं घेत राहील. तो फक्त अज्ञानाचा एका पातळीवरून दुसर्‍या पातळीवर जाण्याचा एक अंतहीन प्रवास बनेल.

चाणाक्ष असण्यात काही गैर आहे असे मी म्हणत नाही. आपण इतर कोणापेक्षा अधिक उत्तम कार्य करण्यासाठी स्वतःला प्रशिक्षित करू शकता पण त्याचा वापर अगदी मर्यादित स्वरुपात आहे. तुम्ही तो तुमच्या आत घेऊन जाऊन अधिक चाणाक्ष बनू शकत नाही कारण असे करून तुम्ही केवळ स्वतःलाच फसवाल. जर तुम्ही आणि मी असे दोघेजण असतील, तेव्हा तुमच्यापेक्षा मी चाणाक्ष असलेले फायद्याचे असते. पण जर फक्त मी आणि मीच असेन, तर माझ्यापेक्षा मी चाणाक्ष असणे वेडेपणाचे ठरेल.

Editor's Note: “Mystic’s Musings” includes more of Sadhguru’s insights on a seeker's predicament. Read the free sample  or purchase the ebook.