सद्‌गुरु: एक संस्कृती म्हणून, एक आध्यात्मिक प्रक्रिया म्हणून तिबेट ही अनेक गोष्टींचं मिश्रण आहे. या संस्कृतीमधील सर्वकालीन महान असणार्‍या काही व्यक्ती आध्यात्मिक प्रक्रिया आणि गूढ विद्या किंवा तंत्रविद्या यांचे मिश्रण आहे. मला असे वाटते की तिबेटी संस्कृतीमध्ये, मिलरेपा सर्वात उठून दिसतात. मिलरेपा तरुण असताना त्यांचे वडील वारले. त्यांचा वडिलांकडे खूप जमीनजुमला, मालमत्ता आणि घर होते. पण ते वारल्यानंतर मिलरेपांच्या काकांनी सर्व मालमत्ता आपल्या ताब्यात घेतली तो, त्याची तरुण आई आणि लहान बहीण यांना घरात गुलामाप्रमाणे वागवायला सुरुवात केली. त्यांचा अनेक प्रकारे छळ करून आणि अपमानास्पद वागणूक देऊन त्याने सर्व मालमत्ता आपल्या ताब्यात घेतली. यामुळे मिलरेपा मनातल्या मनात स्वतःवर सतत चिडलेला आणि रागावलेला असे. त्याने जेव्हा किशोर वयात पदार्पण केले, तेंव्हा तो कुटुंब सोडून दूर निघून गेला. त्याची लहान बहीण आणि आईला मागे सोडून तो निघून गेला. आता त्याला त्याच्या काकांचा आणि काकुचा सुड घेण्याची इच्छा होती.... ज्यांनी त्याच्या जवळच्या माणसांचा असह्य अपमान आणि छळ केला होता.

म्हणून मग तो गूढविद्या शिकण्यासाठी बाहेर पडला आणि काही गुढविद्यांवर त्याने प्रभुत्व प्राप्त केले. अनेक वर्षांनी जेंव्हा तो परत आला, तेंव्हा त्याची आई आणि बहीण दोघीही मरण पावल्या होत्या. हे समजल्यावर त्याला अधिकच राग आला आणि तो योग्य त्या संधीची वाट पहात थांबला. त्याच्या चुलत भावाच्या लग्नाच्या निमित्ताने सर्व मित्रमंडळी आणि नातेवाईक यांना आमंत्रित केलेले असताना तशी संधी त्याला मिळाली. त्या दिवशी त्याने त्याच्या गूढशक्तीचा वापर केला आणि घरावर प्रचंड मोठ्या गारांचा पाऊस पाडला आणि असे म्हणतात की त्या गारांच्या वादळामुळे त्याचे काका आणि काकू यांच्यासह घरातील 80 – 85 लोक मृत्यूमुखी पडले. त्या ठिकाणी सर्वत्र गारांचा ढीग रचला गेला होता. त्याने केलेल्या कृत्याबद्दल त्याला अतिशय आनंद झाला आणि त्याने केलेले कृती वाजवीच होते अशी त्याची भावना होती. पण काही काळानंतर त्याला त्याने केलेल्या कृत्यांचा पश्चात्ताप होऊ लागला. कोणी व्यक्ती जर संवेदनशील असेल, तर ज्या क्षणी ती एखाद्या गोष्टीचा गैरवापर करते तेंव्हा तिला त्याचा स्वतःच्या मनात त्रास होऊ लागतो. अशा प्रकारची कृती करण्यासाठी तुम्हाला मनाच्या एका विशिष्ट अवस्थेत जाणे आवश्यक असते, अन्यथा तुम्ही तसे करूच शकत नाही कारण जीवनाचे स्वरूपच असे आहे की जेव्हा अगदी मूलभूत पातळीवर एखाद्या गोष्टीचा गैरवापर होतो, तेव्हा ती गोष्ट आपल्या मनात सतत सलते. हे काही सदसदविवेकबुद्धी बद्दल नाहीये, मी काही सामाजिक संवेदनशीलतेबद्दल बोलत नाहीये, मी नैतिकतेविषयी बोलत नाहीये – त्यापेक्षा अधिक गहन असं काहीतरी विचलित होतं.

म्हणून, त्याचप्रमाणे मिलरेपाच्या हातून ते कृत्य घडल्यानंतर त्याच्या अंतर्मनात कोठेतरी त्याला सतत सलत होतं. म्हणून त्याने असे ठरवले की आपली या पापामधून मुक्ती होणे आवश्यक आहे. आपण आपल्या जीवनाचा वापर अतिशय मूलभूतपणे चुकीच्या रीतीने केला आहे असे त्याला वाटू लागले. कारण काहीही असू दे, त्याने त्याच्या जीवनाचा वापर अतिशय मूलभूतपणे चुकीच्या रीतीने केला होता म्हणून तो आध्यात्मिक प्रक्रियेच्या शोधार्थ बाहेर पडला. ज्यामुळे त्याला या जीवनात मुक्ती मिळेल अशी एखादी गोष्ट त्याला हवी होती. म्हणून मग तो गुरुच्या शोधार्थ बाहेर पडला. तो अनेक लोकांकडे गेला आणि त्या सर्वांनी प्रामाणिकपणे असे कबुल केले की या आयुष्यात आत्मसाक्षात्कार कसा करून घ्यावा याविषयी त्यांना काही माहिती नव्हती. ते म्हणाले, “ज्याने तू विकसित होशील असे काही आम्ही तुला शिकवू शकतो. करुणामयी हो, दयाळू बनण्याचा प्रयत्न कर, प्रेमळ बनण्याचा प्रयत्न कर, आणि हळुहळू एका जीवनातून दुसर्‍या जीवनात तु उत्क्रांत होत जाशील. त्यांच्या बोलण्याने त्याचे फारसे समाधान झाले नाही आणि त्याच्या मनात अजूनही काहीसा राग धुमसत होता. थोडासा खेद, थोडे नैराश्य, थोडा राग, अशा अनेक भावना त्याच्या मनात होत्या. म्हणून, जेंव्हा अखेर त्याला कोणीतरी असे सांगितले की “मार्पा ही एकमेव अशी व्यक्ती आहे जी तुला यात मदत करू शकेल.” मग तो त्याच्या शोधात निघाला. जेंव्हा तो मार्पा रहात असलेल्या गावात पोहोचला तेंव्हा त्याला तिथे लहान मुले खेळताना दिसली आणि त्याने त्यांच्याकडे मार्पाविषयी चौकशी केली. मार्पा एक अनुवादक म्हणून ओळखले जात होते कारण त्यांनी भारतातील सर्व महान तांत्रिक शब्दांचा तिबेटी भाषेत अनुवाद केला होता. त्यामुळे एक अनुवादक म्हणून आणि हे ज्ञान तेथे घेऊन आल्यामुळे त्यांना तेथे अतिशय मान होता.

त्यांने तीन वेळा भारताला भेट देऊन काही गुरूंना भेटून त्यांच्याकडून ही विद्या, हे मंत्र आणि पद्धती शिकून घेतल्या आहेत आणि त्या स्थानिक भाषेत अनुवादीत केल्या आहेत अशी त्यांची ख्याती होती. म्हणून त्यांनी जेंव्हा असे विचारले, “अनुवादक मार्पा कोठे आहेत?” तेंव्हा एका मुलाने उत्तर दिले, “ते कोठे आहेत मला माहिती आहे.” आणि मार्पा एक शेत नांगरत होते त्या ठिकाणी तो त्यांना घेऊन गेला. जेंव्हा त्या मुलाने त्यांना तेथे आणले, तेंव्हा मार्पांनी नांगरणी बाजूला ठेवली आणि त्यांच्या हातात बियरचा पेला देऊन त्यांचे स्वागत केले. ती त्याच ठिकाणी बनवलेली बियर होती. बियरचा पेला हातात देऊन ते त्याला म्हणाले, “हे पी आणि नांगर हे शेत.” मिलरेपा ती बियर पिऊन टाकली आणि शेत नांगरायला सुरुवात केली. मार्पा निघून गेले आणि तो मुलगा मात्र तेथेच थांबला. शेत नांगरून झाल्यानंतर काय करावे हे त्याला सुचेना म्हणून तो तेथेच उभा राहिला. मग तो मुलगा पुढे आला आणि म्हणाला, आता माझ्यासोबत चला. तो मुलगा त्यांना घरी घेऊन गेला तेंव्हा त्यांना समजले की तो मार्पांचा स्वतःचाच मुलगा आहे. त्यानंतर मार्पांनी त्याला शारीरिक कष्टाची अनेक कामे करायला लावली. मिलेरपाने त्यांना वाकून नमस्कार केला आणि म्हणाले, “मला आपल्याकडून धम्मा हवा आहे... धम्मा म्हणजे एक प्रक्रिया किंवा पद्धत... अशी प्रक्रिया जी मला आत्मसाक्षात्कार घडवेल आणि मी या जीवनातून मुक्त होऊ शकेन. मला पुन्हा जन्म नको आहे, आपण कृपया मला अन्न आणि निवारा द्या. मग मार्पा म्हणाले, “तू निवड कर. तुला हवे असल्यास मी तुला अन्न आणि निवारा देईन. पण धम्मा मिळवण्यासाठी तू इतर कोणाकडे तरी जा. धम्मा मिळवण्यासाठी तू इतर ठिकाणी जा. किंवा मी तुला धम्मा शिकवेन, पण तू इतर ठिकाणी अन्न आणि निवारा शोध. तुझ्यासमोर हा पर्याय आहे. मग मिलरेपा म्हणाले, मला आपण धम्माची शिकवण द्या, मी अन्न आणि निवाऱ्याचा मी बंदोबस्त करेन. आणि तो भिक्षा मागण्यासाठी बाहेर गेला. तो एक अतिशय उत्साही मनुष्य होता. तो जे काही करत असे, जरा जास्तच करत असे. तर तो भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडला आणि खूप दूर दूर जाऊन त्याने अनेक पोती भरून गहू जमा केले. पूर्ण वर्षभर पुरतील येवढे गहू त्याने जमा केले त्यामुळे तो आता एकाच ठिकाणी बसून धर्माची शिकवण घेऊ शकणार होता. तर त्याने खूप भिक्षा गोळा केली, त्यामधील काही गहू विकला आणि कडेला चार हात असलेले एक तांब्याचे भांडे विकत घेतले. अन्न शिजवायचे ते एक पारंपरिक भांडे आहे.

मग तो ते अतिशय अवजड असलेले भिक्षेचे ओझे उचलून दूर अंतर चालत पार करून आला, मार्पाच्या घरात ते आणले आणि दाणकन खाली आपटले! मार्पा आपले भोजन घेत होता. जेवण अर्धवट सोडून ताटावरून उठले, बाहेर आले आणि म्हणाले, “तू खूपच रागावला आहेस असे दिसते. आत्ता तुझ्या या गव्हाने आणि भांड्याने तू माझे सर्व घरच हादरवून टाकलेस. मला असे वाटते की तू तुझ्या काकांच्या घराचा जसा विनाश केलास, त्याच प्रमाणे तु या घराचा देखील विनाश करायला आला आहेस. तू आता इथून निघून जा! झाले तेवढे खूप झाले!” मग मिलरेपाने त्यांची क्षमा मागितली, “कृपा करा, आपण मला माझ्या अन्नाची सोय करायला सांगितली, त्याप्रमाणे मी ते मिळवून आणले आहे. ते खूपच जड होते, म्हणून मी ते खाली ठेवले. मार्पा म्हणाले, “अजिबात नाही, तू ते पोते योग्य प्रकारे खाली ठेवले नाहीस, त्यामुळे तुला इथून निघून जावेच लागेल. तू ते खाली आपटलेस. तू सक्षम नाहीस, तर तू बाहेर निघून जा. कामे कर. माझे शेत नांगरुन ठेव. माझ्या घराची स्वच्छता कर. तुला हवे ते कर.” अनेक वर्षे त्याने तसे केले. कालांतराने अनेक विद्यार्थी आले आणि ज्ञानप्राप्ती करून निघून गेले पण मिलरेपाला मात्र एकही दीक्षा, कोणतीही शिकवण मिळाली नाही. तो फक्त कष्टच करत राहिला.

कोणत्याही प्रकारची शिकवण किंवा दीक्षा न मिळता तो आठ वर्षांपेक्षा अधिक काळ तो ही कामे करत राहिला. इतर प्रत्येकजण येत होते, दीक्षा घेत होते आणि परत जात होते, पण तो मात्र सर्व प्रकारची कष्टाची कामे करत वाट पहात राहिला. मग एके दिवशी त्याने बसणे अपेक्षित नव्हते अशा ठिकाणी एका सत्संगात तो गपचूप जाऊन बसला. मार्पा आपले डोळे मिटून बसले होते, त्यामुळे इतर विद्यार्थ्यांबरोबर आपल्याला देखील दीक्षा मिळेल या आशेने तो गपचूप त्यांच्यामध्ये जाऊन बसला. तर मार्पा डोळे बंद करू बसले होते, त्यांनी काठी उचलली आणि डोळे बंद ठेवूनच चालत आले आणि त्यांनी मार्पाला चोप दिला. तो गर्दीतच बसला होता. ते तेथे आले आणि त्याला मारून तेथून बाहेर काढले आणि त्या ठिकाणावरून हाकलून लावले. असे पुन्हा पुन्हा घडत राहिले. तो काही काळ जाऊ देत होता, आणि जेंव्हा दीक्षा देण्याचा कार्यक्रम असेल, तेंव्हा आता आपल्याला संधी मिळेल या आशेने तो पुन्हा त्या ठिकाणी जाऊन बसत असे. 13 वर्षांपेक्षा अधिक काळ उलटून गेला पण त्याला काहीही शिकायला मिळाले नाही. मग एके दिवशी त्याने मार्पाच्या पत्नीला विनंती केली. तिला त्याच्याविषयी सहानभूती वाटत होती. त्याला ती त्याच्या आईप्रमाणेच होती. तो तिच्याकडे गेला आणि तिला विनवणी केली, की “कृपा करून मला एक तरी शिकवण द्या असे त्यांना सांगा. एक छोटीशी ध्यान धारणा. मला काहीही माहिती नाही. मी अनेक वर्षांपासून येथे राहिलो आहे.” मग तिने तिच्या पतीला तशी विनंती केली आणि मार्पांनी ती मान्य केली. ते म्हणाले, “ठीक आहे, त्याला आधी माझ्या मुलासाठी घर बांधून दे म्हणावं. त्याने एकट्याने एक घर बांधले पाहिजे. मला तीन कोपरे असणारे घर हवे आहे.” म्हणून मग त्याने तीन कोपरे असणारे घर बांधले. त्यासाठी दोन वर्षे लागली. मग त्याच्याकडे पाहून ते त्याला म्हणाले, “तीन कोपरे असणारे घर माझ्या मुलासाठी योग्य नाही, आता तू चार कोपरे असणारे घर बांध.” त्याने चार कोपरे असणारे घर बांधले. मग ते म्हणाले, “हे चांगले नाही, आता तू पाच कोपरे असणारे घर बांध.”

अशा प्रकारे अनेक वर्षे लोटली. त्याने त्या ठिकाणी एकट्याने सर्वत्र इमारती उभ्या केल्या. मग ते म्हणाले, “हे ठीक आहे, पण मला माझ्या मुलाच्या घरासाठी 60 फुट उंच मनोरा हवा आहे. मग त्याने घराच्या चारही कोपर्‍यात 60 फुट उंचीचे चार मनोरे बांधले. तोपर्यंत तो वृद्ध होत चालला होता. मग एक दिवस त्याने त्याच्या आईच्या पायावर लोळण घेतली आणि म्हणाला, “कृपा करून काहीतरी कर, माझे आयुष्य संपत आले आहे. मला आजवर एकही शिकवण दिलेली नाही. हा काय प्रकार आहे? मला माहिती आहे, मी माझ्या आयुष्यात अनेक भयंकर गोष्टी केलेल्या आहेत, मी गूढविद्येचा गैरवापर केलेला आहे, पण मी पुरेसे कष्ट घेतले नाहीत का? मग थोडी सहानभूती दाखवून तिने मार्पाच्या नावाने त्याच्या नावाची मोहोर उमटवून आणखी एका साधूला पत्र लिहिले जो सुद्धा दीक्षा देण्यासाठी अधिकृत व्यक्ती होता. तर तिने ते पत्र मिलरेपाला दिले, मिलरेपा ते पत्र घेऊन त्या साधूकडे गेला आणि त्याने त्यांच्याकडून दीक्षा प्राप्त केली. पण त्यानंतर काहीच घडले नाही. त्या साधूला धक्काच बसला. “मी जेंव्हा दीक्षा देतो, तेंव्हा काहीतरी घडतेच. पण दीक्षेत तर काहीच घडत नाहीये, आता मी काय करू?” त्यानंतर मार्पाना याबद्दल समजले आणि त्यांनी त्याला परत बोलावून घेतले, तसेच त्या साधूचा दीक्षा देण्याचा अधिकार सुद्धा रद्द केला. मग अतिशय निराश होऊन आत्महत्या करण्याच्या विचारात मिलेरपा असतानाच मार्पांनी त्याला बोलावले आणि ते म्हणाले, “ठीक आहे. खाली बस.” आणि त्यांनी त्याला शिकवण दिली. ते म्हणाले, तू भूतकाळात ज्या गोष्टी केल्या आहेस, त्यावर योग्य मार्ग काढण्याचे उपाय मी तुला देत होतो, पण तू तुझा वेळ अनावश्यकपणे घालवत होतास. जर तू फक्त मी सांगितल्याप्रमाणे काटेकोरपणे पालन केलं असतास, तर फार पूर्वीच तुला साक्षात्कार झाला असता. पण तू सर्व काही करतोस आणि त्यामधून एक पळवाट काढतोस. त्या एका पळवाटेमुळे, तू सारे काही अनेक वर्षे पुढे ढकलत होतास. आज तुला होणारा पश्चाताप मात्र खरोखर तुझ्या अंतर्मनाला भिडला आहे. तू त्यासाठी मरण सुद्धा स्वीकारायला तयार झाला आहेस. आता तू तयार आहेस. आणि मग त्यांनी त्याला दीक्षा दिली आणि त्यानंतर दिसर्‍या दिवशीच मिलरेपाला दाकिनिचे दर्शन झाले. तुम्ही दाकिनिबद्दल ऐकले आहे का?

तंत्र विद्येत केल्याजाणाऱ्या कृतींमध्ये, प्रत्येक चक्रासाठी त्यांनी एका देवतेची निर्मिती केली आहे – एक स्त्री रूप जे प्राण-प्रतिष्ठित करून आणि जीवंत केले गेले आहे ज्याला इच्छित गोष्टी घडवण्यासाठी बोलावले जाऊ शकते. या शक्तींच्या मदतीशिवाय कोणीही कोणतेही महत्वाचे कार्य साध्य करू शकत नाही. तर दाकिनि त्याच्यासमोर प्रकट झाली आणि ती म्हणाली, “मार्पाने तुला शिक्षण दिले आहे पण एका मूलभूत पैलूशिवाय, जो त्याला स्वतःलाच माहिती नाही. तू त्याच्याकडे तो मागून पहा, त्याला तो माहिती आहे का ते विचार. मग मिलरेपा मार्पाकडे गेला. मार्पाने त्याच्याकडे पाहिले आणि ते म्हणाले, “तू इथे का आला आहेस?” मग त्याने उत्तर दिले, “दाकिनि माझ्या स्वप्नात आली होती आणि ती असे म्हणाली, आणि हे खरे आहे का ही माझी कल्पना आहे हे मला माहित नाही, पण असे घडले आहे आणि म्हणून मी आपल्याकडे ते विचारण्यासाठी आलो. मग मिलरेपा नतमस्तक झाले… मार्पा मिलरेपांसमोर नतमस्तक झाले आणि म्हणाले, “मलासुद्धा हे ज्ञान नाहीये, म्हणून आपण दोघे पुन्हा भारतात जाऊ.” दोघेजण पुन्हा भारतात नेपाळ आणि बिहारच्या सीमेवर राहत असलेल्या मार्पांच्या गुरूंकडे आले. संपूर्ण अंतर पायी चालून तेथपर्यंत पोहोचले आणि मार्पांनी जेंव्हा ही गोष्ट त्यांच्या गुरूंना सांगितली, की अशी एक दाकिनि आली होती आणि असे म्हणाली की आपण मला एक विशिष्ट शिकवण दिलेली नाही. गुरूंनी त्यांच्याकडे पाहिले आणि ते म्हणाले, “हे तुझ्या बाबतीत घडलेले नाही. तुला ते कसे समजले?” मग मार्पांनी उत्तर दिले, “मी नाही तर माझ्या एका शिष्याला तिने असे सांगितले. मग गुरूं तिबेटच्या दिशेने वळले आणि त्यांनी खाली वाकून नमस्कार केला, आणि ते म्हणाले, “अखेर उत्तर दिशेला असणार्‍या गडद अंधारात प्रकाशाचा एक किरण पडला आहे.”

मग त्यांनी मिलरेपा आणि मार्पा यांना जवळ बोलावून एखाद्या व्यक्तीने या जीवनात संपूर्ण, परिपूर्ण ज्ञानप्राप्ती कशी करावी याची विस्तृत शिकवण दिली आणि ते पुन्हा परतले, आणि मार्पा, जे गुरु होते, ते मिलरेपाचे शिष्य असल्यासारखे झाले. मिलेरेपा हे तिबेटी संस्कृतीत एक चमकणारा तारा बनले. अनेक गोष्टी…. तिबेटी संस्कृतीत मागील 300 ते 400 वर्षात केल्या गेलेल्या अनेक गोष्टी निश्चितपणे मिलेरेपांनी रचलेल्या पायावर उभ्या केलेला आहेत.