logo
logo

शिव आणि शक्ती : ५४ शक्तिस्थळांचा उगम कसा झाला

Sadhguru narrates the story of how Sati burnt herself up in the ceremonial fire after her father insulted Shiva...

सदगुरु : जेव्हा आपण म्हणतो शिव हा विनाशक आहे, त्याचा अर्थ जगाचा विनाश करणे नाही, तर तुमच्या जगाचा नाश करणे असा आहे. मुळात तुमचे जग म्हणजे भूतकाळातील अनुभव आणि परिणाम यांचा साठा आहे. तुमचे जग हे भूतकाळाने बनलेले आहे. जे मरण पावले ते म्हणजे भूतकाळ. तो केवळ एक भ्रम म्हणून अस्तित्वात आहे जो तुमच्या विचार प्रक्रियेमुळे वर्तमानात डोकावत आहे, आणि तो तुमच्या इच्छांद्वारे भविष्यात त्याचे प्रतिबिंब पाडत आहे.

जर विचारच नसेल, तर भूतकाळाचे वर्तमानात अस्तित्वच राहणार नाही. विचार हा एक भ्रम आहे आणि इच्छा हा दुहेरी भ्रम आहे, कारण इच्छा सतत भूतकाळातुन भविष्यकाळात छाप टाकत असतात. तुम्हाला भूतकाळात जे काही माहिती आहे, त्याही पेक्ष्या चांगल्या वाटणाऱ्या गोष्टीची तुम्ही इच्छा बाळगता. तुम्हाला सृष्टीची भव्यता जाणून घ्यायची इच्छा असेल, तर ते वर्तमानातल्या क्षणाद्वारेच हे शक्य आहे, म्हणजे आत्ताच. हा एकमेव दरवाजा आहे. जर तुम्ही भूतकाळ मध्ये आणलात तर तुम्ही भ्रमक व्हाल. तुम्ही जे अस्तित्वात नाही त्याचा वापर करून, भविष्याची खोटी प्रतिमा तयार केल्यास, आता ती प्रतिमा एवढी परिपूर्ण झाली आहे कि, तुमच्या जगण्याच्या अनुभवाची वास्तविकता नष्ट झाली आहे.

परिपुर्ण स्तब्धतेत, भूतकाळ नसतो. परिपूर्ण गतीमध्ये असतानाही भूतकाळ नसतो. हे दोन मूलभूत मार्ग आहेत शिवाने शोधले सृष्टीची निर्मिती आणि त्या निर्मितीचा स्रोत यामध्ये जाण्यासाठी. म्हणूनच त्याला सतत एकतर उत्साही नर्तक किंवा एक पूर्णपणे तपस्वी म्हणून चित्रित केले जाते.

 

शिवाचे सतीशी लग्न घडवून आणण्याचे षडयंत्र

योगशास्त्रामध्ये अशी कहाणी आहे की, शिव स्थिरतेपासून नृत्याकडे आणि नृत्याकडून स्थिरतेकडे जाऊ लागले. सर्वानाचं म्हणजे, गंधर्व, यक्ष आणि तिन्ही लोकाचे देवांना शिवाचे ते मोहित रूप बघून जिज्ञासा निर्माण झाली. सगळ्यांनी या परिपूर्ण गतीचा आणि स्थिरतेच आनंद घेतला, परंतु त्याच्या अनुभवाच्या स्वरूपाविषयीची त्यांना काहीच कल्पना नव्हती. त्यांना याची चव घ्यावीशी वाटली.

जिज्ञासेचे रूपांतर कुतूहलामध्ये झाले. आणि कुतूहलापासून त्यांनी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या नृत्याची किंवा स्थिरतेची तीव्रता त्यांना सहन करणे शक्य झाले नाही.

तो अनुभवत असलेल्या गोष्टींना, ते कसे हाताळू शकणार ह्या बद्दल त्यांनी प्लॅनींग करण्यास सुरवात केली. त्यांनी एक परिषद बोलावली, जीचे हळूहळू कारस्थानात रूपांतर झाले. त्यांनी कसेतरी करून त्याचे लग्न लावण्याचा निर्णय घेतला. “आपल्याकडे असा एखादा माणूस असावा जो अशा अत्यंत आनंददायी अनुभवाचा, अशा उत्तेजनेचा आणि त्याच वेळी मृत्यूसारखा शांतपणाचा आधार काय आहे हे सांगू शकेल. तो दोघांचा आनंद घेत असल्याचे दिसते. आपल्याला एखाद्या आतल्या व्यक्तीची गरज आहे”.

बर्‍याच गोष्टी घडल्या – मी षड्यंत्रांच्या संपूर्ण तपशीलात जाणार नाही, कारण तो एक खूप मोठा कट आहे. जर तुम्हाला शिवाचे अंतःरंग बघायचे असेल तर त्यासाठी त्यांनी प्रचंड कटकारस्थान रचले पाहिजे, ज्याची त्यांनी रचना आखली आणि ती अंमलात आणली. म्हणून त्यांनी शिवाचे सतीशी लग्न घडवून आणले. तो पूर्णपणे तिच्या स्वाधीन व समाविष्ट झाला आणि तिच्याबद्दल त्याच्या मध्ये पूर्णतः उत्कंठता निर्माण झाली.

सतीचे पिता शिव यांचा अपमान करतात

त्याने सतीला आपल्या आयुष्याचा भाग बनू दिले. पण सतीचे वडील दक्ष हे शिव यांचा द्वेष करीत, त्यांचा जावई म्हणजे शिव हा कुठलाही राजा नाही, तो चांगला पोशाख घालत नाही, तो नेहमी भस्म लावून फिरतो, तो मानवी कवटीतून खातो, त्याचे सर्व मित्र हे सर्व प्रकारचे राक्षस, भूत आणि विकृत आहेत. तो नेहमी ध्यान किंवा नशेमध्ये असतो. एकतर तो डोळे मिटून असतो किंवा तो वेड्यासारखे नृत्य करीत असतो. असा जावई ज्याचा अजिबात अभिमान वाटणार नाही किंवा तो आजूबाजूला असावा असेही वाटणार नाही.

काही काळानंतर, दक्षाला एक मोठा विधी करण्याची इच्छा झाली, ज्यासाठी त्याने प्रत्येक राजा, प्रत्येक देव आणि प्रत्येक यक्ष यांना आमंत्रित केले. पण त्याने शिवाला आमंत्रण दिले नाही. शिव आणि सती जंगलात बसले होते आणि तिच्या प्रेमापोटी सती त्याला जंगलातील फळं खायला घालत होती कारण एवढेच त्यांनी खाल्ले होते. त्यांच्याकडे घर किंवा स्वयंपाकासाठी योग्य व्यवस्था नव्हती, म्हणून ते फळे खाऊन राहायचे आणि जे काही अर्पणाच्या स्वरूपात मिळायचे ते खायचे.

मग तिला बरीच गर्दी दिसली, उत्तम रथ, सर्व राजे, देवी-देवता सजून कुठेतरी जाताना तिने पहिले. मग तिने शिवाला विचारले, “हे काय आहे? प्रत्येकजण कोठे जात आहे? ” शिव म्हणाले, “काही फरक पडत नाही. जेथे ते जात आहेत तेथे जाण्याची आपल्याला गरज नाही. ” पण ती खूप उत्साही झाली. “प्रत्येकजण कुठे जात आहे? ते कसे छान सजले आहेत ते पहा. काय होत आहे? ” तो म्हणाला, “काळजी करू नकोस, आपण येथे ठीक आहोत. तू दुखी आहेस का ? नाही. तू आनंदीत आहेस. त्यांच्याबद्दल काळजी करू नकोस. ” कारण काय घडत आहे हे त्याला माहित होते.

पण तिची उत्सुकता आणि स्त्री उत्तेजन तिला फक्त तिथे बसून झाडाच्या फळांचा आनंद कसे घेऊ देईल. ती चालत निघाली आणि एका रथाला थांबून तिने त्यांना विचारले, “तुम्ही सर्व कोठे जात आहात?” ते म्हणाले, “तुम्हाला माहिती नाही? तुमच्या वडिलांनी यज्ञ आयोजित केला आहे – यज्ञ – आणि त्यांनी आम्हा सर्वांना आमंत्रित केले आहे. तुम्ही नाही येणार का ? ” जेव्हा तिला कळले की तिला आणि तिच्या पतीला आमंत्रित केलेले नाही, तेव्हा ती पूर्णपणे निराश झाली. तिला यात अपमान वाटला. तिला असे वाटले की हा शिवावर अन्याय आहे. तिने शिवाला सांगितले, “मी माझ्या वडिलांकडे जात आहे. त्यांनी असे का केले? ” शिव म्हणाले, “मला काही फरक पडत नाही. तू का त्रास करून घेत आहेस? आपण येथे ठीक आहोत. आपण त्यांच्या यज्ञाला का जावे? ”

पण आमंत्रित न केल्याच्या या अपमानाने ती इतकी चिडली होती. ती म्हणाली, “नाही, मला जायलाच पाहिजे. काहीतरी चूक झाली असावी. कदाचित आमंत्रण हरवले असेल. असे होऊच शकत नाही. ते तुम्हाला आणि मला आमंत्रित करायला कसे विसरू शकतात? मी त्यांची मुलगी आहे. नक्कीच काहीतरी चूक झाली असावी. मला खात्री आहे की ते असे करणार नाही. माझे वडील तसे नाहीत. ” शिव म्हणाले, “जाऊ नकोस.” पण तीने ऐकली नाही आणि ती गेली.

सतीने यज्ञाच्या अग्निमध्ये स्वतःला जाळून घेतले

जेव्हा ती विधी होत असलेल्या जागेवर पोहोचली, तेव्हा तिकडे तिला तिचे सर्व भाऊ, बहिणी आणि नातेवाईक पूर्ण सजलेल्या वेशात दिसले. पण ती मात्र तिच्या जंगलात राहत असलेल्या साध्या कपड्यांमध्ये आली होती. म्हणून लोक तिची टिंगल करत हसले. त्यांनी विचारले, “तुझा भस्मधारी नवरा कोठे आहे? कुठे आहे तो माणूस, ज्याने स्वतःच्या केसांचा किती तरी दिवस झाले अजून भांग देखील नाही पडला ?

तिने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या वडिलांची काहीतरी चूक झाली असावी या विश्वासाने ती त्यांना भेटायला गेली. जेव्हा तिला ते भेटले, तेव्हा दक्ष चिडले. पण तिने विचारले, “तुम्ही शिवाला आमंत्रण का नाही दिले?” तेव्हा दक्षाने प्रत्येक संभाव्य मार्गाने शिवाला शिवीगाळ केली आणि ते म्हणाले, “मी माझ्या घरात कधीही त्याला प्रवेश करू देणार नाही. ”

तिचा चेहरा एकदम उताराला. यज्ञ अग्नि चालू होता. ती त्यामध्ये चालत गेली आणि स्वतः ला जाळून घेतले. नंदी आणि इतर सहकारी जे तिच्या मागोमाग आले होते, जेव्हा हे घडले तेव्हा ते घाबरून गेले आणि ते शिवा कडे धावत आले आणि त्यांनी सांगितले की दक्षाने केलेल्या अपमानामुळे सतीने यज्ञाच्या अग्नीत स्वत: ला जाळून घेतले.

शिव वीरभद्र निर्माण करतो

शिव थोडावेळ शांततेत बसतात. मग त्यांचे अग्नी मध्ये रूपांतर झाले. आणि त्याच रागात ते उठले. शिवाने आपल्या जटांमधला एक केस काढला आणि शेजारी असलेल्या खडकावर मारला आणि वीरभद्र नावाचा एक शक्तिशाली जीव निर्माण केला. त्याने वीरभद्रला सांगितले, “जा आणि यज्ञ नष्ट कर. दक्षा सहित कोणालाही ह्या यज्ञमधून काहीही प्राप्त व्हायला नाही पाहिजे. या यज्ञात सामील झालेल्या सगळ्यांचा नाश कर. ” वीरभद्र संपूर्ण क्रोधाने गेला आणि यज्ञ उध्वस्त केला, आणि जे कोणी त्याच्या मार्गामध्ये आले त्या सगळ्यांची कत्तल केली आणि मुख्य म्हणजे दक्षा चा वध केला.

शक्ती स्थळांचा जन्म

मग शिव आला आणि सतीचे अर्धे जळालेला शरीर उचलले आणि त्याचे दु: ख शब्दांपलीकडचे होते. त्याने तिला आपल्या खांद्यावर ठेवले आणि चालू लागला. तो मोठ्या क्रोधात व शोकात चालत होता. तो शरीर खाली ठेवणार नव्हता किंवा ज्वालांना तिचे शरीर जाळू देणार नव्हता किंवा दफन करायला देणार नाही. तो तसाच पुढे चालताच राहिला. तो चालत असतानाच सतीचे शरीर सडायला सुरवात झाली आणि जसजसे ते सडत गेले, तसे त्याचे तुकडे झाले आणि ५४ वेगवेगळ्या ठिकाणी खाली पडले. ही ५४ ठिकाणे भारतातील शक्तीस्थान म्हणून ओळखली गेली. तिच्या शरीराचा प्रत्येक भाग पडताच तेथे शक्तीची एक गुणवत्ता स्थापित झाली. ही भारतातील मुख्य देवी मंदिरे आहेत.

त्यापैकी तीन ठिकाणे गुप्त आहेत आणि काही लोकांव्यतिरिक्त ती कोठे आहेत हे कोणालाही माहिती नाही, परंतु ५१ ठिकाणे लोकांना माहिती आहेत.

    Share

Related Tags

शिव आणि पार्वतीशिव आणि त्याचे कुटुंब

Get latest blogs on Shiva

Related Content

Embrace Shiva, Embrace Life