logo
logo

Om Namah Shivaya in Marathi - ॐ नमः शिवाय हा मंत्र आपल्या प्रणालीचे शुद्धीकरण करतो आणि ध्यानधारणा करण्यास मदत करतो.

ॐ नमः शिवाय हा मंत्र आपल्या प्रणालीचे शुद्धीकरण करतो आणि ध्यानधारणा करण्यास मदत करतो. सद्गुरू या मंत्राचा जप करण्याचा अर्थ काय आहे आणि हा मंत्र 'ओम नमः शिवाय' असा नव्हे तर 'आउम नमः शिवाय' असा का म्हटला पाहिजे याबद्दल बोलतात.

मंत्र म्हणजे काय?

सद्गुरू: योगशास्त्रात आम्ही म्हणतो की, संपूर्ण अस्तित्व हे नादांचे एक जटिल मिश्रण आहे. त्यामध्ये, आम्ही काही विशिष्ट नाद ओळखले आहेत जे वेगवेगळ्या आयामांना उघडण्याची क्षमता बाळगतात. विशिष्ट नादांचा वापर विशिष्ट उद्देशाने केला जातो - या महत्त्वाच्या नादांना सामान्यतः मंत्र म्हणतात. वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र आहेत. विजय मिळवण्यासाठी आणि प्राप्तीसाठी मंत्र आहेत. आनंद आणि प्रेम निर्माण करण्यासाठी मंत्र आहेत. अनुभवाचे इतर आयाम उघडण्यासाठीही मंत्र आहेत.

जगातील बहुतेक आध्यात्मिक मार्गांमध्ये योग्य प्रकारच्या जागरूकतेने मंत्राची पुनरावृत्ती करणे ही नेहमीच मूलभूत साधना राहिली आहे. मंत्राचा वापर न करता बहुतेक लोक स्वतःच्या आत ऊर्जेच्या योग्य पातळीपर्यंत पोहोचण्यास असमर्थ असतात. मला असे आढळून आले की नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना स्वतःला सक्रिय करण्यासाठी नेहमीच मंत्राची गरज असते. त्याशिवाय, ते टिकून राहू शकत नाहीत.

योगिक संस्कृतीत महामंत्र म्हणून मानला जाणारा मूलभूत मंत्र म्हणजे "आउम नमः शिवाय."

आउम नमः शिवाय की ओम नमः शिवाय?

'आउम' हा नाद "ओम" असा उच्चारला जाऊ नये. तो तोंड उघडून उच्चारला पाहिजे - "आ," आणि जसे तुम्ही हळूहळू तोंड बंद करता, तो "उ" होतो, आणि "म" होतो. हे नैसर्गिकपणे घडून येते. हे असे काही नाही की जे तुम्ही करत आहात. जर तुम्ही फक्त तोंड उघडून श्वास सोडला, तर तो "आ" होईल. जसे तुम्ही तोंड बंद करता, तो हळूहळू "उ" होतो, आणि जेव्हा तुम्ही ते बंद करता, तेव्हा तो "म" होतो. "आ," "उ," आणि "म" हे अस्तित्वाचे मूलभूत नाद म्हणून ओळखले जातात. जर तुम्ही हे तीनही नाद एकत्र उच्चारले, तर काय मिळेल? "आउम." म्हणून आम्ही म्हणतो "आउम" हा सर्वात मूलभूत मंत्र आहे. म्हणून मंत्र "ओम नमः शिवाय" असा नव्हे तर "आउम नमः शिवाय" असा उच्चारला पाहिजे.

या मंत्राची निर्मिती तुमच्या कर्माची जाळी साफ करण्यासाठी केली आहे जेणेकरून तुमचे आकलन विकसित होऊन तुम्ही अस्तित्वाच्या मोठ्या आयामासाठी उपलब्ध व्हावे.

हा शिवाचा, जो विनाशकाचा आहे, त्याचा मंत्र आहे. तो तुमचा विनाश करत नाही, तर तुमच्या आणि जीवनाच्या मोठ्या संधींमध्ये अडथळा म्हणून उभ्या असलेल्या गोष्टींचा विनाश करतो.

आउम नमः शिवायची पंचाक्षरे

"न-म शि-वा-य" यांना पंचाक्षरे किंवा पाच अक्षरे म्हणतात. हा मंत्र फक्त पाच अक्षरांची एक विलक्षण रचना आहे, जी अद्भुत गोष्टी करते. काळाच्या इतिहासात, कदाचित सर्वाधिक लोकांनी या पाच अक्षरांद्वारे त्यांची अंतिम क्षमता ओळखली आहे.

ही पंचाक्षरे मानवी प्रणालीतील पाच मुख्य केंद्रांशी संबंधित आहेत आणि त्यांना सक्रिय करण्याचा एक मार्ग आहेत. आपण या मंत्राचा वापर शुद्धीकरण प्रक्रिया म्हणून, आणि त्याचवेळी आपण प्राप्त करू शकणाऱ्या सर्व ध्यानधारणेसाठी पाया म्हणून करू शकतो. अन्यथा, बहुतेक लोक स्वतःच्या आत मंत्रांचे पर्याप्त कंपन निर्माण न झाल्यामुळे त्यांची ध्यानधारणा टिकवू शकत नाहीत. तुमच्या मानसिक वृत्ती आणि शारीरिक ऊर्जा एका विशिष्ट पातळीपेक्षा खाली जाण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक असलेले मूलभूत कंपन तुमच्या आयुष्यात निर्माण करण्याबाबतीत मंत्र हे एक अत्यंत महत्त्वाचे मोजमाप आहे.

ही पंचाक्षरे निसर्गातील पाच तत्त्वांचेही प्रतिनिधित्व करतात. न म्हणजे पृथ्वी, म म्हणजे पाणी, शि म्हणजे अग्नी, वा म्हणजे वायू, आणि य म्हणजे आकाश. जर तुम्हाला पंचाक्षरांवर प्रभुत्व मिळवता आले, तर ते तुमच्या चेतनेत पाच तत्त्वांपासून बनलेल्या प्रत्येक गोष्टीचे विसर्जन करू शकतील.

पाच तत्त्वांचा स्वामी, जीवनाचा स्वामी

शिवाचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे तो भूतेश्वर आहे - ज्याचे पाच तत्त्वांवर प्रभुत्व आहे. संपूर्ण सृष्टी ही या पाच तत्त्वांचा खेळ आहे. फक्त पाच घटकांसह अशी भव्य निर्मिती! जर तुम्हाला या पाच तत्त्वांवर थोडेसे प्रभुत्व मिळाले, तर तुम्हाला जीवन आणि मृत्यू आणि तुमच्या आसपासच्या सर्व गोष्टींवर प्रभुत्व मिळते कारण प्रत्येक गोष्ट या पाच तत्त्वांपासून बनलेली आहे. योगाचा सर्वात मूलभूत सराव म्हणजे भूत शुद्धी, किंवा तुमच्या प्रणालीतील पाच तत्त्वांचे शुद्धीकरण करणे आणि त्यांचा ताबा घेणे.

जर तुम्ही पाच तत्त्वांवर प्रभुत्व मिळवले, तर तुम्ही तुमच्या भौतिक स्वरूपावर पूर्णपणे प्रभुत्व मिळवले आहे कारण तुमचे संपूर्ण भौतिक स्वरूप हे या पाच घटकांचा खेळ आहे. जर ही पाच तत्त्वे, ती कशी कार्य करतात, याबद्दल तुमच्याकडून सूचना घेत असतील, तर आरोग्य, सुखसमृद्धी, यश आणि जीवनावरील प्रभुत्व हे नैसर्गिक परिणाम म्हणून घडून येतात.

    Share

Related Tags

Get latest blogs on Shiva