आज जीवशास्त्राची एक शाखा, एपिजेनेटिक्स, या गोष्टीचा अभ्यास करते की मनुष्याचे वर्तन आणि त्याचे जीवनाचे अनुभव त्याच्या डीएनएवर कसे परिणाम करतात, आणि कशाप्रकारे ते पिढ्यानपिढ्या पुढे जाऊ शकतात. परंतु योगाच्या दृष्टीकोनातून, भूतकाळातला प्रभाव फक्त आमच्या पूर्वजांपर्यंतच मर्यादित नाही, तर पृथ्वीवरील पहिल्या जीवापर्यंत जातो. या लेखात, सद्गुरू कर्माचा अर्थ समजावून सांगतात, ज्या शब्दाचा विविध संदर्भांमध्ये वापर आणि गैरवापर केला जातो. कर्माच्या प्रभावाची मुळे किती खोलवर रूजलेली असतात याचे वर्णन करताना, ते या जटिल संरचनेवर नियंत्रण मिळवण्याच्या दिशेने मार्ग देखील दाखवतात.

सद्गुरू : कर्माचा अर्थ आपल्या आत उमटणारी एखादी कृती किंवा कृतीचा ठसा. तुमच्या वडिलांनी केलेल्या कृती तुमच्या मनात आणि शरीराच्या प्रत्येक पेशीत काम करत असतात. तुमच्या पालकांपासून सुटका करून घेणे इतके सोपे नाही! तुम्ही पाहिले असेल की, जेव्हा तुम्ही अठरा किंवा वीस वर्षांचे होता, तेव्हा तुम्ही तुमच्या आई-वडिलांविरुद्ध बंड केले होते, पण जेव्हा तुम्ही चाळीस-पंचेचाळीस वर्षांचे होता, तेव्हा तुम्ही सुद्धा त्यांच्यासारखेच बोलू लागता, त्यांच्यासारखेच वागू लागता, आणि त्यांच्यासारखेच दिसूही लागता. हा जीवनाचा एक निराशाजनक मार्ग आहे, कारण जर सध्याची पिढी मागच्या पिढीप्रमाणेच वागणार, त्यांच्यासारखीच कामे करणार, जगणार आणि जीवनाचा अनुभव घेणार असेल, तर ही एक वाया गेलेली पिढी ठरेल. या पिढीने जीवनाचा अनुभव अशा रीतीने घ्यायचा आहे ज्याची मागच्या पिढीने कधी कल्पनाही केली नसेल. मी म्हणत नाही की, तुम्ही रस्त्यावर काही वेडे चाळे करत सुटा. मी म्हणतोय की, तुम्ही जीवनाचा ज्या प्रकारे अनुभव घेताय, तो पूर्णपणे बदलू शकता. तो अनुभव पुढच्या पातळीवर नेला जाऊ शकतो.

आदिम किंकाळी

पण कर्म फक्त तुमचे, तुमच्या वडिलांचे किंवा तुमच्या आजोबांचे नसते. पहिल्या जीवसृष्टीचे - त्या बॅक्टेरिया किंवा व्हायरसचे, त्या एकपेशीय प्राण्याचे कर्म सुद्धा तुमच्यामध्ये काम करत असते, अगदी आजही. तुमच्या शरीरातील बॅक्टेरियाचा प्रकारही तुमच्या पालकांमध्ये किंवा आजी-आजोबांमध्ये कोणत्या प्रकारचा बॅक्टेरिया होता हे बहुधा त्यावर अवलंबून असतो. म्हणून, तुमच्या स्वतःबद्दल असलेल्या सर्व महान कल्पना खूपच खोट्या आहेत. हेच आम्ही सांगत होतो की, सर्व काही माया आहे, कारण तुमच्या आत घडणाऱ्या गोष्टींचा प्रकार असा आहे की, तुम्ही जे काही करता ते जवळजवळ सर्वच पूर्वीच्या माहितीद्वारे नियंत्रित केले जाते.

जर मी तुम्हाला सांगितले, "तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही, आम्ही तुमची काळजी घेऊ. फक्त बसून बारा तास ध्यान करा," तर सुरुवातीला हे एक मोठे वरदान वाटेल, पण एक महिन्यानंतर तुम्ही ठार वेडे होऊन जाल. जर तुम्ही तो वेडेपणा पार केलात, तर तुम्ही सर्व काही पार कराल, पण बहुतेक लोक जेव्हा त्यांच्या आत वेडेपणा येतो तेव्हा हार मानतात. ते घाबरतात आणि पळून जाण्याचा प्रयत्न करतात कारण हे सोपे नाही. ही तुमच्या वडिलांची, आजोबांची, पूर्वजांची आणि त्या नालायक बॅक्टेरियाची आदिम किंकाळी आहे. अनेक लक्ष जीव अभिव्यक्ती शोधण्यासाठी ओरडतील. त्यांना स्वतःचे मत मांडायचे आहे. ते तुम्हाला इतक्या सहजपणे मुक्त करणार नाहीत. तुम्हीही त्यांना दुर्लक्षित करू शकत नाही, कारण ते तुमच्या प्रत्येक पेशीत स्पंदित होत असतात.

"याचा अर्थ मी पूर्णपणे अडकलो आहे का?" हो, अडकला आहात, पण निराशाजनकपणे नाही. एका पशुपताच्या अवस्थेतून- एकपेशीय प्राण्यापासून ते आतापर्यंतच्या प्राणिस्वभावाच्या अवस्थेला, मागे टाकून - पशुपतीच्या अवस्थेत जाण्याची संधी आहे. "पशु" म्हणजे जीवन, "पती" म्हणजे प्रभु - एखादा या सर्वांना मागे टाकू शकतो आणि वर जाऊ शकतो.

गोष्टींवर नियंत्रण ठेवा

हे समजून घ्या, कर्म तुमचा शत्रू नाही. कशाला काय समजावे याबद्दलची तुमची अजाणता हीच तुमचा शत्रू आहे. कर्म ही जीवनाची स्मृती आहे. तुम्ही हे शरीर आता जसे आहे तसे तयार करण्यास सक्षम आहात, कारण एकपेशीय प्राण्यापासून ते सर्व जीवसृष्टीपर्यंतच्या स्मृतीचा वारसा तुमच्या आत आहे. तुमचे वर्तमान शारीरिक अस्तित्व तुमच्या कर्मावर आधारित आहे. जर तुमचे सर्व कर्म काढले गेले, तर तात्काळ तुम्ही स्वतःचे शरीर सोडून जाल. हे पिन काढून घेण्यासारखे आहे. कर्म हा चिकटवणारा पदार्थ आहे, जो तुम्हाला शरीराशी जोडून ठेवतो.

तुम्हाला तुमचे शरीर किंवा मन बदलण्याची गरज नाही, तुम्हाला फक्त कळ शोधायची आहे. आता जेव्हा तुम्ही कारमध्ये बसता, तुम्ही सीट बेल्ट लावता. सीट बेल्ट चांगला असतो, तो तुमचे प्राण वाचवू शकतो. पण जर तुम्ही सीट बेल्ट अशा प्रकारे बांधला की तो तुम्ही नंतर उघडू शकणार नाही, तर मग तो तुमच्या कैदेत बदलतो. जेव्हा तुम्ही कारमध्ये बसता, दार बंद करता. तेव्हा ते चांगले असते. पण समजा जर तुम्ही कारमध्ये बसलात आणि दार उघडूच शकला नाहीत, तर ते भयानक ठरते. तुम्हाला फक्त कळ माहीत असायला हवी. मग दुर्दैवाने, जरी तुमचे कर्म डोंगराएवढे असले तरी काहीच समस्या नसेल.

समस्या कर्मामुळे नाही, तर तुम्ही त्यात अडकल्यामुळे आली आहे. जर तुमचे शरीर आणि तुम्ही, तुमचे मन आणि तुम्ही यांच्यात थोडे अंतर राखले, तर कोणत्याही कर्माचा तुमच्यावर फरक पडणार नाही. तुम्ही अजूनही त्याचा वापर करून जिवंत राहू शकता, तुमची वैयक्तिक ओळख राखू शकता, पण ते तुम्हाला बांधून ठेवणार नाही, ते तुमच्यासाठी एक पायरी ठरेल.