तुमच्या कर्माचा कारखाना बंद करा - भाग २
सद्गुरू, कर्म कसे अनेक लोकांसाठी माया आहे याकडे पाहतात, आणि कसे क्रिया व प्राणायाम हे सूक्ष्म शरीर मजबूत करण्याची आणि कर्मापासून स्वतःला दूर करण्याची प्रक्रिया आहे त्याबद्दल सांगतात.

दोन भागांपैकी या दुसऱ्या भागात, सद्गुरू सांगतात, की कसे कर्म ही अनेक लोकांसाठी माया आहे, आणि क्रिया व प्राणायाम हे सूक्ष्म शरीर मजबूत करण्याची आणि कर्मापासून स्वतःला दूर करण्याची प्रक्रिया आहे.
सद्गुरू: कर्म हे मुख्यतः अनेक लोकांसाठी माया आहे. सामान्यतः "माया" शब्दाचा अर्थ "भ्रम" असा समजला जातो, तरीही या शब्दातून त्याचा परिपूर्ण अर्थ व्यक्त होत नाही. पण आपण असे म्हणू, की माया म्हणजे भ्रम. अनेकांसाठी भ्रम हा कर्माच्या रचनेचा पाया आहे. जोपर्यंत तुम्ही "हा मी आहे, तो तू आहेस" यात प्रस्थापित आहात, तोपर्यंत कर्म ही एक उत्तमरित्या प्रस्थापित झालेली वास्तविकता आहे. ते एका घट्ट, खऱ्याखुऱ्या, स्टीलच्या संरचनेसारखे आहे.
परंतु, जर तुम्ही स्वतःला "कोणता मी आहे आणि कोणता मी नाही?" याबाबतीत गोंधळात टाकले, तर अचानक कर्म त्याचा पाया गमावते. जर तुम्ही सभोवती पाहता आणि तुम्हाला कोणते तुम्ही आहात आणि कोणते तुम्ही नाही हे कळत नाही, या गोंधळात कर्माचा पाया टिकून राहू शकत नाही आणि सहज कोसळतो. एका गोंधळलेल्या क्षणी, अचानक, कर्माच्या संपूर्ण रचना कोसळतात. तुम्हाला जाणवले आहे का, तुम्ही जर कधी कुणाच्या प्रेमात पडलात, तर तुमची पसंत-नापसंत, तुम्ही कोण आहात, तुम्हाला काय आवडते, काय आवडत नाही, या सगळ्याची थोडी गुंतागुंत होते - किमान काही दिवसांसाठी तरी, त्यानंतर ते पुन्हा पूर्ववत झाले असेल! तुम्ही असे काही करू लागता जे तुम्ही करू शकता असे तुम्हाला वाटले नव्हते, कारण तुम्ही कोण आहात याबद्दल तुमचा थोडा गोंधळ झाला आहे. अनेकत्वाची माया गोंधळून गेली, कारण दोन लोकांमध्ये थोडे एकत्व आले, आणि अचानक कर्माने त्याचा पाया गमावला आणि ते कोसळले.
अनेकत्त्वाची समस्या
एकदा असे झाले - १९४४ दरम्यान, हिटलरच्या आठ हुबेहूब प्रतिरूपांना एका सुरक्षित घरात ठेवले होते. इतर सगळ्या लोकांमध्ये त्यांना सर्वोत्तम खाऊ घातले जात होते, सर्वोत्तम ठेवले जात होते आणि त्यांना एखादा दिवस वगळता क्वचितच काही करावे लागत होते. त्यांना हिटलरसारखे बनण्यासाठी प्रशिक्षित केले होते. ते त्याच्यासारखे कपडे घालत, त्याच्यासारखे खात - त्यांना तेच करावे लागत होते जे तो करत होता, कारण भूमिका करायची वेळ आली तर, ती अशा पद्धतीने व्हावी की ती कुणालाही कळू नये. म्हणून, या लोकांचे खरंच चांगले चालले होते.
नंतर हाइनरिख हिमलर, हिटलरच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक आला. जेव्हा कुणी येई, तेव्हा त्यांनी प्रतिरूपांना अगदी हिटलरला सलाम करतात तसाच सलाम करावा हा नित्यक्रम होता, कारण त्यांना त्याची सवय होणे आवश्यक होते. तर, हिमलर आला आणि म्हणाला "हैल हिटलर!" मग तो म्हणाला, "माझ्याकडे चांगली आणि वाईट बातमी आहे."
सर्वांनी एकत्र म्हटले, "आधी चांगली बातमी."
"आपला फ्युहरर (जर्मनमध्ये लीडर) जिवंत आणि स्वस्थ आहे."
"वाईट बातमी...?"
"दुर्दैवाने, त्यांनी त्यांचा डावा डोळा गमावला आहे," आणि त्याने एक कॉर्क स्क्रू बाहेर काढला.
कर्म असेच आहे. ती अनेकत्वाची समस्या आहे. म्हणून, पहिली गोष्ट म्हणजे नव्याने काही तयार करणे थांबवणे - जीवन स्वतःहूनच संपत जात असते. किंवा जर तुम्हाला एकाच वेळी तुमचे सर्व कर्म सोडायचे असेल, तर ते देखील केले जाऊ शकते. पण तुम्ही हे समजून घेणे गरजेचे आहे, की कर्म हे केवळ बंधन नाही हे, ते संरक्षणही आहे. तो एक जोड आहे, जो तुम्हाला शरीराशी बांधून ठेवते. जर सर्व कर्म विरघळले, तर तुम्ही तुमच्या शरीराला धरून ठेवू शकणार नाही - तुम्ही ते सोडून द्याल. जर तुम्हाला याची जाणीव नसेल, तर बहुतेक जणांसाठी ज्ञानप्राप्तीचा क्षण आणि शरीर सोडण्याचा क्षण एकच असतो. केवळ असे लोक जे क्रियेच्या मार्गावर आहेत, ज्यांना शरीराची यंत्रणा आणि बारकाव्यांची जाण असते, ते शरीराला धरून ठेवतात.
सूक्ष्म शरीराचा वापर
योगामधे, आपण मानवाकडे पाच आवरणे किंवा शरीराचे थर म्हणून पाहतो. अन्नमय, मनोमय आणि प्राणमय शरीर या तीन भौतिक वास्तविकता आहेत; थोड्या सूक्ष्म पण तरीही भौतिक. इतर दोन - विज्ञानमय आणि आनंदमय - वेगळ्या स्तरात आहेत. विज्ञानमय शरीर हे भौतिकातून अभौतिकामधील संक्रमण आहे. आनंदमय शरीर पूर्णपणे अभौतिक आहे. अन्नमय शरीर, मनोमय शरीर आणि प्राणमय शरीर कर्म वाहतात. पण विज्ञानमय शरीर आणि आनंदमय शरीर यांच्यात कोणतीही कर्माची रचना नसते, कारण ते अभौतिक आहेत. अस्तित्वाचा भौतिक आयाम ‘कारण आणि परिणाम’ यामधे घडत असतो . पण जे भौतिकापलीकडे आहे ते ‘कारण आणि परिणाम’ यामधे बसत नाही. म्हणून, तुम्ही देवत्वाचा आस्वाद घेऊ लागता क्षणी, अचानक, तुमच्याकडे कितीही कर्माचे ढीग असलेत तरी, त्याचा तुमच्यावर कोणताही प्रभाव पडत नाही कारण तुम्ही अभौतिक क्षेत्रात पाऊल टाकायला सुरवात करता, जिथे कर्माची संरचना नाही.
जेव्हा तुम्ही क्रिया आणि प्राणायाम सारख्या कोणत्याही जाणीवपूर्वक श्वासाच्या प्रक्रिया करता, तेव्हा तुम्ही विज्ञानमय शरीराचा वापर करण्याचा प्रयत्न करता - तुमच्या आतील असा भाग ज्यात भौतिकाचा अंश आहे, पण तरीही तो भौतिक नाही. तुम्ही त्याला मजबूत करण्याचा प्रयत्न करता, कारण तुम्हाला त्याला तुमच्या आतील अभौतिक आयामामधील अडथळा नाही, तर एक मार्ग बनवायचा असतो. याला शारीरिक आणि मानसिक फायद्यांच्या दृष्टीने आणि आध्यात्मिक आयामाच्या दृष्टीने इतर विविध पैलू आहेत, पण एक साधा पैलू असा आहे की, जर हा सृष्टीचा मूळ स्रोत असलेला आयाम, जो भौतिक शरीर आणि अभौतिक आयाम यांच्यातील दुवा आहे, तो स्वतःच एक मजबूत शक्ती बनला, तर तुम्ही जे भौतिक आहात, जी मानसिक संरचना आहात, ज्याला तुम्ही "मी" म्हणता, आणि तो आयाम जो या सर्वांचा स्रोत आहे, ते नैसर्गिकरीत्या नेहमीच जोडलेले राहतील. कल्पना अशी आहे, की देवत्व ही तुमच्या जीवनातील एक कल्पना किंवा विश्वास नाही, तर देवत्व ही तुमच्या जीवनातील एक जिवंत उपस्थिती आहे. साधनेचे मूळ हेच आहे या तिनही गोष्टी क्षणोक्षणी चांगल्या प्रकारे एकसंघ आणि जोडलेल्या असतात. आपण उच्च अनुभव किंवा एकदा-कधीतरी येणारा अनुभव शोधत नाही, तर आपल्याला त्या आयामाशी सततचा संपर्क हवा आहे, केवळ तेव्हाच ते तुमच्या जगण्याच्या शेेलीत, ज्या पद्धतीने तुम्ही अस्तित्वात असता, तुमच्या कार्य करण्याच्या क्षमतेमध्ये - अशा सर्व बाबतीत अभिव्यक्त होते.