साधकाच्या प्रवासात कर्मयोगाचा हेतू
सद्गुरू, एखाद्या साधकाच्या प्रगतीच्या विशिष्ट टप्प्यावर कृती का आवश्यक असू शकते, आणि शासन करण्याचा किंवा सेवा करण्याचा पर्याय आपल्याला कसा उपलब्ध असतो याकडे पाहतात.

प्रश्न: सद्गुरू, मी कर्म किंवा कर्मयोगापलीकडे कसा जाऊ? वैयक्तिकरित्या, माझ्यात काहीही करण्याची इच्छा नाही. मला असे वाटते, की मी काहीही न करण्याच्या अवस्थेकडे जात आहे.
सद्गुरू: जेव्हा एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनात परम सत्याला ध्येय बनवलेले असते, तेव्हा कृती निरर्थक होते. एकदा का कृती निरर्थक झाली, तर कोणत्याही प्रकारच्या आत्मप्रतिमेला फार महत्त्व नसते; पण सध्या ज्या स्थितीत तुम्ही आहात, तिथे अजूनही कृतीची गरज आहे. तुम्ही अजून त्या टप्प्यापर्यंत पोहोचला नाहीत, की जिथे तुम्ही कृतीच्या पलीकडे पोहोचलेले आहात. तुम्ही कृतीशिवाय राहू शकत नाही. म्हणून, तुम्हाला सध्या जी कृती सर्वोत्तम वाटत आहे, ती करा आणि परिस्थितीनुसार आवश्यक असेल ते करा.असा माणूस, ज्याला कृती करणे माहीत नाही – खरोखर प्रखर कृती – तो कधीही निष्क्रिय होऊ शकत नाही. जर तुम्ही प्रयत्न केलात, तर निष्क्रियता फक्त आळस बनेल. जे लोक स्वतःच्या जीवनात नेहमी आराम करत असतात, ते आरामात असण्याच्या बाबतीत तज्ञ असले, पण ते सत्य नाही. ज्या लोकांनी कधी आगीची दाहकता जाणली नाही, ते पाण्याचा गारवा जाणू शकणार नाहीत. जे लोक केवळ निरुत्साही मनाने, मंदपणे जगले, त्यांना दुसरी बाजू कधीही कळणार नाहीत.
म्हणून, प्रखर कृती, निदान काही कालावधीसाठी, तुमच्या ऊर्जेला उत्कलन बिंदूपर्यंत नेऊन गतीमान करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. त्यानंतर, तिला वेगळ्या गोष्टींमध्ये परिवर्तित करणे खूप सोपे असते. कर्म किंवा कृतीचा हाच मूळ हेतू आहे. एक साधक याच कारणासाठी कृती निवडतो. तसेही आपण कृती करणारच असतो. पण आपली कृती करण्याची पद्धत ही अडॉल्फ हिटलरसारखी की महात्मा गांधींसारखी असावी ही निवड आपल्याकडे असते. बस्स इतकेच आहे. तसेही आपणाला कृती करावी लागते, तर ती आपण मनापासून करू या आणि ती करण्याची पद्धत निवडूया.
शासन किंवा सेवा - तुम्ही काय निवडाल?
तुम्हाला जगावर राज्य करायचे आहे की जगाची सेवा करायची आहे? शेवटी, निवड याचीच आहे. सामान्यतः, प्रत्येकाला जगावर राज्य करायची इच्छा असते. बहुतेक लोक निरुत्साही असतात, त्यामुळे ते फक्त आपल्या कुटुंबावर राज्य करू शकतात! पण त्याना खरंतर जगावर राज्य करण्याची इच्छा असते. त्यांच्याकडे ते करण्याची क्षमता किंवा तीव्रता नसते. अन्यथा, ते एक संभाव्य हिटलर बनले असते.
तर, निवड ही राज्य करायचे की सेवा करायची यामध्ये आहे. कोणत्या प्रकारची कृती तुम्हाला सर्वात अधिक सुसंगत आणि देवत्व आणि आत्मज्ञानाच्या जवळची वाटते, ती निवडा. प्रत्येक क्षणी ती अतिशय तीव्रतेने, एक क्षणाचाही विराम न देता करा. मग एक दिवस येईल जेव्हा कृती करण्याची आवश्यकता राहणार नाही. जर तुम्हाला या "न करण्या" बाबत खरोखर जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही प्रथम ‘करणे’ म्हणजे काय हे जाणले पाहिजे. तुम्ही अजूनही ते केलले नाही. माझ्या प्रत्येक जागृत क्षणात आणि माझ्या झोपेतही, मी सतत स्वतःला शारीरिक आणि मानसिकरित्या अर्पण करण्याचे काम करत असतो. केवळ त्यातूनच माझ्या जीवनात हे सर्व घडले आहे. हे इतके शक्तिशाली बनले आहे, कारण माझ्यासाठी त्याचे काहीही महत्व नाही, परंतु मी चोवीस तास त्यात असतो. यात एक वेगळ्या प्रकारची ताकद असते. हाच त्यागाचा संपूर्ण अर्थ आहे. केवळ त्यातूनच काहीतरी वेगळे घडते - आत आणि बाहेर या दोन्ही ठिकाणी - ज्याला कधीही शब्दांत मांडता येणार नाही.
गामध्ये प्रत्येक सामर्थ्यवान व्यक्ती अशाच प्रकारे घडत असतो. हे खऱ्या अर्थाने एक सामर्थ्यवान व्यक्ती निर्माण करण्याचे विज्ञान आहे. हे सत्ता गाजवण्याचे सामर्थ्य नाही. हे क्षणात हिरावून घेतले जाणारे सामर्थ्य नाही. कोणीही ते काढून घेऊ शकत नाही, कारण तुम्हाला कुठेही ठेवले, तरी तुम्ही तेच कराल. तुम्हाला सत्ता गाजवायची असेल तर तुम्हाला सिंहासनावर बसावे लागेल. कोणी तुम्हाला सिंहासनावरून खाली खेचले तर तुम्ही दुःखी व्हाल. हे तसे नाही. तुम्हाला जिथे ठेवले जाते - मग तो स्वर्ग असो किंवा नरक - तुम्ही फक्त तुमचे काम करता. हे तुम्हाला कर्माच्या फळातून मुक्त करते. एकदा का तुम्ही कर्माच्या फळापासून मुक्त झालात, की कृती आपोआप घडेल. तुम्हाला कर्मापासून मुक्त होण्यासाठी काम थांबवण्याची गरज नाही. ते आपोआपच विरघळेल, वितळेल आणि नाहीसे होईल. एकदा कर्माच्या फळाची अपेक्षा तुमच्या जीवनातून पूर्णपणे निघून गेली की, कृती आपोआप घडून येते. तुम्हाला त्याबाबत काहीही करण्याची गरज नाही.
"काम नाही, अन्न नाही"
एका जैन मठात, ऐंशी वर्षांपेक्षा जास्त वयाचे एक वृद्ध गुरू होते. प्रत्येक दिवशी, ते बागेत मनापासून काम करत असत. जैन मठांमध्ये, बागकाम हे साधनेचा एक महत्त्वाचा भाग आहे. दिवसेंदिवस, लोक बागेत वेळ घालवतात. हे गुरू वर्षानुवर्षे असे काम करत होते. आता, ते ऐंशी वर्षांपेक्षा जास्त वयाचे असून, अशक्त झाले असतानाही त्यांनी काम करायचे थांबवले नाही. पूर्ण दिवस, ते बागेत काम करत असत. अनेकदा त्यांच्या शिष्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, "काम करणे थांबवा, आम्ही सर्व इथे आहोत, आम्ही ते करू." पण ते जमेल तितके करत राहिले.त्यांची काम करण्याची शारीरिक क्षमता कमी झाली असली, तरी त्यांची तीव्रता कमी झाली नव्हती.
म्हणून एक दिवस शिष्यांनी त्यांची अवजारे काढून घेतली आणि कुठेतरी लपवून ठेवली, कारण ते फक्त या अवजारांनी काम करीत असत. त्या दिवशी ते जेवले नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा अवजारे नव्हती, म्हणून ते जेवले नाही. तिसऱ्या दिवशीही अवजारे नव्हती; ते जेवले नाही. तेव्हा शिष्य घाबरले, "अरे! आम्ही अवजारे लपवल्यामुळे ते रागावले आहेत. ते जेवत नाहीत ." पुन्हा एकदा, त्यांनी अवजारे नेहमीच्या ठिकाणी ठेवली. चौथ्या दिवशी, गुरुंनी काम केले आणि जेवण केले. त्यानंतर संध्याकाळी, त्यांनी आपला उपदेश दिला: "काम नाही, जेवण नाही," आणि ते निघून गेले आणि त्यांना मृत्यू आला. तो त्यांचा शेवटचा दिवस होता. चार दिवसांचे उपोषण त्यांना खूप जड गेले; पण शेवटच्या दिवशी त्यांनी काम केले, जेवण केले, नंतर त्यांनी त्यांचा देह सोडला, आणि त्यांनी फक्त हाच उपदेश दिला: " काम नाही, जेवण नाही." अशा प्रकारच्या माणसासाठी, कृती अशा प्रकारची असते. नरक, स्वर्ग किंवा पृथ्वी, त्याला जिथे ठेवले जाईल, तो तसाच राहील. एकदा तुम्ही असे झालात, की तुम्ही बाह्य परिस्थितीपासून मुक्त होता.
फक्त डोळे बंद करून तुम्ही मुक्त होऊ शकणार नाही. जेव्हा तुम्ही डोळे उघडाल, तेव्हा सर्वकाही परत येऊन तुम्हाला गुंतवणार. जर तुम्ही पळून जाऊन डोंगरावर बसलात, तरीही तुम्ही मुक्त होणार नाही. ते कृती करूनच संपवले पाहिजे. ते संपवण्याचा हाच मार्ग आहे.