कर्मयोगाच्या प्रक्रियेचे महत्व, आध्यात्मिक मार्गातील त्याची भूमिका, आणि कृतीद्वारे ते आध्यात्मिक विकासासाठी कसे वापरता येऊ शकते या विषयी सद्गुरूंचे  मार्गदर्शन.

प्रश्न  : साधनेमध्ये कर्मयोगाची भूमिका काय आहे?

सद्गुरू: हे खरोखर आवश्यक नाही. योगाला कर्माची गरज नाही. योग म्हणजे कर्माच्या पलीकडे जाणे. यात कर्म योग का आणला गेला आहे; तर, एखाद्या व्यक्तीमध्ये संतुलन आणण्यासाठी. ज्या गोष्टीला आपण आपली जागरूकता, प्रेम, अनुभव किंवा आपल्या वास्तविकतेचे क्षणिक दर्शन असे म्हणतो, त्याला जर टिकवून ठेवायचे असेल, तर अकर्म हा एक अत्यंत सुंदर मार्ग आहे, परंतु तो अतिशय निसरडा आहे. अत्यंत निसरडा. तो सर्वात सोपा आणि सर्वात कठीण मार्ग आहे. तो कठीण नाही परंतु तितका सोपा देखील नाही, कारण तो सोपा आहे - अगदी आत्ता, इथेच आणि आत्ता आहे. परंतु हे ‘इथे आणि आत्ता’ - मिळवायचे कसे? तुम्ही काहीही करा, ते तुमच्या हाती नाही. ते कधीही तुमच्या हाती असणार नाही. परंतु तुमच्या हातांना आता काहीतरी पाहिजे, तुम्हाला काहीतरी धरायचे असते, करायचे असते. आणि म्हणून कर्म योगाचा आधार घेतला जातो. 

आधाराशिवाय, बहुतेक लोक चालू शकणार नाहीत. असेही काही जीव आहेत, जे पहिल्या क्षणापासून या आधाराशिवाय चालू शकतात. ते अत्यंत दुर्मिळ जीव आहेत. इतर सर्वांना आपली जागरूकता नियंत्रणात  ठेवण्यासाठी आधाराची गरज असते. त्याशिवाय, बहुतेक लोक सतत जागरूक राहण्यास असमर्थ आहेत. म्हणून कर्मयोग तुमच्या जीवनात साधनेला योग्य प्रकारच्या कृतीसह संतुलित करण्यासाठी आणला जातो.

क्रिया - मुक्त करणारी किंवा गुंतवणारी  

दुर्दैवाने कर्मयोगाचे वर्णन सेवा असे केले गेले आहे, परंतु ते तसे नाही.

दुर्दैवाने कर्मयोगाचे वर्णन सेवा असे केले गेले आहे, परंतु ते तसे नाही. तुम्ही गोळा केलेले संस्कार पुसून टाकण्याचा तो एक मार्ग आहे. जर तुम्ही कोणत्याही कार्यात आनंदाने सहभागी होत असाल, तर तो  कर्म योग आहे. जर तुम्ही ते कार्य मोठ्या कष्टाने करत असाल, तर ते केवळ कर्म असेल, योग असणार नाही!

सामान्यतः तुम्ही जी विविध कार्ये करता त्यामुळे जीवनात अडकून जाता, गुंतून पडता. परंतु क्रिया जर गुंतवून टाकण्याऐवजी मुक्तीदायक प्रक्रिया बनली, तर तो कर्म योग आहे. मग ते काम असो, रस्त्यावर चालणे असो किंवा कोणाशी बोलणे असो, क्रियेचे स्वरूप प्रकार महत्वाचे नाही. जेव्हा तुम्ही एखादी क्रिया केवळ त्याची आवश्यकता आहे म्हणून करता, खरंतर ती तुमच्यासाठी अगदी अर्थहीन असते, परंतु तरीही तुम्ही स्वतःला अशा रीतीने झोकून देऊ शकता जणू काही ते तुमचे जीवन आहे, तेव्हा ते तुमच्यात परिवर्तन घडवते आणि क्रिया मुक्तिदायक बनते.

जेव्हा आम्ही ध्यानलिंग बांधत होतो, तेव्हा लोकांना वाटले, "हे करायचे आहे! त्यांना हे घडवायचे आहे. चला हे करूया! हे झाल्यावर आपण विश्रांती घेऊ." त्यांनी अशा तऱ्हेने काम केले जणू काही त्यांचे जीवन त्यावर अवलंबून आहे. ते घरोघरी फिरले, निधी जमा करत आणि आवश्यक पाठबळ मिळवत त्यांनी ते घडवून आणले. जेव्हा ते पूर्ण झाले, त्यांनी "हुश्श..." म्हणण्याआधी मी दहा वेगवेगळे प्रकल्प जाहीर केले. मी नेहमीच असे करत राहीन, कारण लोकांना अशा प्रकारच्या कृतीची गरज असते. त्यांना, जे आवश्यक आहे ते करावे लागते, स्वतःच्या समाधानाबद्दल किंवा आवडी-निवडींबद्दल चिंता न करता. नाहीतरी आपण आपल्या प्रगतीसाठी काहीतरी करत आहोत, तर चला असे काहीतरी करूया जे सर्वांसाठी उपयुक्त असेल. चला समंजस कृती करूया. 

संपूर्ण सहभाग

तुमच्यासाठी काहीही अर्थ नसलेले परंतु संपूर्ण सहभागाने काहीतरी करणे हे कर्माची रचना मोडून टाकते.

असे अनेक गुरु आहेत ज्यांनी अशा प्रकारची कृती निर्माण केली. जेव्हा गुर्डजीफने युरोपमध्ये स्वतःची केंद्रे स्थापन केली, तेव्हा युरोपीय उच्च वर्गातील लोक त्याच्याकडे आले. सकाळी तो त्यांना फावडा आणि कुदळ देऊन म्हणे, "चर खणा ." तापत्या उन्हात ते उभे राहून खणत असत. हे असे लोक होते ज्यांना कोणत्याही श्रमाची  सवय नव्हती. काही तासांच्या कामानंतर त्यांच्या हातावर फोड आले. तो तिथे उभा राहून त्यांना कामास उद्युक्त करत असे. उशिरा संध्याकाळी ते लोक भुकेले असूनही सतत खणत  राहत. नंतर तो घड्याळाकडे पाहून म्हणे, "ठीक आहे, सात वाजले. जेवणाची वेळ झाली. जेवायला जाण्याआधी तुम्ही सर्वांनी हे चर परत भरून टाका." एक संपूर्ण दिवसाचे काम!

तुमच्यासाठी काहीही अर्थ नसलेले काम पूर्ण समरसतेने  करणे हेच कर्माच्या संरचनेला मोडून काढते. कर्म म्हणजे कृती. जर कृतीला योग बनवायचे असेल, तर ती मुक्तिदायक असली पाहिजे. जर तुमची कृती तुम्हाला बांधून ठेवण्याची प्रक्रिया बनली असेल, तर ते कर्म आहे. म्हणून प्रश्न हा नाही की, तुम्ही किती कार्य करता. तुम्ही कार्य कसे करत आहात याने  फरक पडतो. जर तुम्ही रेंगाळत काम करत असाल, तर ते कर्म आहे. जर तुम्ही हसत खेळत काम करत असाल, तर तो कर्मयोग आहे.