प्रश्न: सद्गुरू, मी साधना करताना, आसक्तीपूर्ण गोष्टी उफाळून वर येण्यामुळे मी अस्वस्थ आहे.

सद्गुरू: तुम्ही तुमच्या आसक्तींसोबत आनंदी राहायला शिकले पाहिजे. तुम्हाला आधीच आसक्ती आहेत. जर तुम्ही त्याबद्दल दुःखी असाल, तर आता तुमच्याजवळ दोन समस्या असतील - आसक्ती आणि दुःख! आधीच तुमच्याकडे एक समस्या आहे, दुसरी निर्माण करू नका. किमान एक समस्या असेल तर तिला हाताळणे सोपे असते.

दुःख म्हणजे अप्रिय स्थिती. आपण नेहमी आनंद आणि प्रेमाबद्दल का बोलतो, कारण आपलं मन आणि भावना प्रसन्न असल्या पाहिजेत. जेव्हा या गोष्टी प्रसन्न असतात, तेव्हा तुम्ही लवचिक असता आणि तुमच्याबरोबर अनेक गोष्टी करता येतात. जेव्हा तुमचं मन आणि तुमच्या भावना अप्रिय असतात, तेव्हा तुम्ही कठोर बनता; मग तुमच्यासोबत काहीही करता येत नाही. जर तुम्ही आनंदी स्थितीत असाल, तर तुम्ही वेगळ्या आकारात घडवले जायला तयार असता. जेव्हा तुम्ही अप्रिय स्थितीत असता, तेव्हा तुम्हाला स्पर्शही सहन होत नाही.

तुमच्या आसक्तींकडे आनंदाने पहा

तुमच्याकडे असलेल्या कुठल्याही आसक्तीपेक्षा दुःखी असणे ही मोठी समस्या आहे. ही खूप मोठी समस्या आहे, कारण आता तुम्हाला स्पर्श करता येत नाही, घडवता येत नाही किंवा मदतही करता येत नाही. तुम्ही कोणत्याही प्रकारचे मूर्ख असलात तरी, पहिली गोष्ट म्हणजे आनंदी आणि प्रेमळ राहायला शिका. तुम्हाला तुमच्या आसक्ती आहेत - त्यांच्याकडे आनंदानं पाहायला शिका. मग तुमच्यावर काम करणे, तुम्हाला मदत करणे, तुमच्यापर्यंत पोहोचणे - तुमच्या आवडी-निवडींपलीकडे जाऊन गोष्टी करणे सोपे होईल. तुमच्या आवडी-निवडी या सर्वात मूलभूत आसक्ती आहेत; जर तुम्हाला यातून बाहेर काढायचे असेल, तर आम्हाला हवे आहे की, तुम्ही आनंदी स्थितीत असले पाहिजे. जर तुम्ही अप्रिय स्थितीत असाल, तर तुम्हाला न आवडणारी गोष्ट आम्ही तुमच्याकडून करून घेऊ शकत नाही; तुम्ही फक्त तुम्हाला आवडेल तेच कराल. लोक जितके दुःखी असतात, तितकेच ते जास्त आग्रही असतील, "मी फक्त हेच करेन. मी असाच आहे!" आनंदी लोक लवचिक असतात - तुम्ही त्यांना नाचायला लावू शकता, रडायला लावू शकता, उड्या मारायला लावू शकता, विनोदी गोष्टी करायला लावू शकता, त्यांना सरपटत जायला सांगू शकता; जेव्हा ते आनंदी असतात तेव्हा ते सर्व काही करतील. ते लवचिक असतात.

तुमची लवचिकता गमावू नका. ती सर्वात महत्त्वची आहे. मनात किंवा भावनेत कोणत्याही प्रकारची अप्रिय स्थिती असताना लवचिकता शक्य नाही. आनंदी, प्रेमळ आणि शांत राहणे हे याच कारणासाठी महत्त्वाचे आहे - कारण तुमच्याकडे अनेक आसक्ती आहेत.

कर्माचे बटाटे 

कर्म बटाट्याच्या पोत्यासारखे आहे. या आसक्ती तुम्ही जितक्या खोलवर पुरता, तितक्या त्या बाहेर येतील. साधना म्हणजे त्यांना बाहेर काढणे आणि अशा प्रकारे सुकवणे की त्या पुन्हा वाढू शकणार नाहीत. जर तुम्ही स्वतःला तीव्र साधनेसाठी समर्पित केले, तर तुम्हाला जाणवेल, की जेव्हा तुम्ही जगात बाहेर जाल, तेव्हा तुमच्या अनेक साध्या साध्या आसक्ती नाहीशा झालेल्या आहेत. पण तरीही बाहेर काढण्यासाठी अजूनही खूप बटाटे आहेत. दररोज तुम्हाला ते बाहेर काढावे लागतील आणि अशा टप्प्यापर्यंत सुकवावे लागतील, की जिथे ते पुन्हा अंकुरित होऊ शकणार नाहीत.

जर तोच बटाटा लेखनाच्या पटीत वाढला, तर तो एक अतिशयोक्ती बटाटा आहे. समजा तुम्हाला पाच मिनिटांचा तीव्र अनुभव आला - वेदना, भीती, एखादा छळ किंवा तुम्हाला तिरस्कार वाटणारी एखादी गोष्ट. या पाच मिनिटांच्या काळात बटाटे, वाढत जातील, अधिक वाढत जातील आणि तुमचे संपूर्ण आयुष्य नियंत्रित करतील. तुम्ही कुठेही गेलात, तरी तुम्ही त्याबद्दलच बोलाल, त्याबद्दलच विचार कराल. तुम्ही त्यांना पुरले आणि ते वाढत आहेत. ते त्याच तिरस्कारासारखे लाखो बटाटे होतील. आता जर तुम्ही हा बटाटा सुकवला आणि तिथेच ठेवला, तर तो एक चांगला अनुभव आहे. जरी तुम्ही खूप वाईट अनुभवातून गेला असलात, तरी तो एक चांगला अनुभव आहे कारण तुमच्या आयुष्यातील अप्रिय क्षणांमधून तुम्ही जे शिकता ते अमूल्य आहे. फक्त मूर्खच तो विसरण्याचा प्रयत्न करेल. जर तुम्ही हुशार असाल, तर तुम्हाला मिळालेला प्रत्येक अप्रिय अनुभव - राग किंवा द्वेष न बाळगता - तुम्ही नेहमी लक्षात ठेवला पाहिजे, जेणेकरून तुम्ही कधीही पुन्हा त्याच परिस्थितींमध्ये जाणार नाही.

आपल्याला बटाटे काढून फेकायचे नाहीत; आपल्याला फक्त बटाटे बाहेर काढायचे आहेत आणि त्यांना अशा प्रकारे सुकवायचे आहे, की ते अंकुरित होऊ शकणार नाहीत. आपल्याला बटाटे जतन करायचे आहेत; अन्यथा आपण पुन्हा त्याच गोष्टी करणारे अज्ञानी मूर्ख ठरू. जीवनानुभवाचे मूल्य टाकून देता येत नाही. पण जर तुम्ही त्याला तुमच्या आत वाढू दिले, तर ते तुमचे संपूर्ण आयुष्य विषारी करते. कर्म, किंवा अनुभवाची स्मृती, ही एकमेव गोष्ट आहे जी तुम्हाला शहाणपण देऊ शकते, पण तीच एकमेव गोष्ट आहे जी तुम्हाला बांधू शकते - तुमचे आयुष्य इतके विषारी बनवू शकते, की ते तुमचा नाश करू शकते. म्हणून, कर्म ही समस्या नाही आहे; तुम्ही ते कशा प्रकारे वाहून नेता हीच एकमेव समस्या आहे.

ईशा क्रिया ही सद्गुरूंनी निर्माण केलेली एक योगिक पद्धत आहे. ऑनलाइन मार्गदर्शित ध्यानाच्या स्वरूपात आणि लिखित सूचनांसह मोफत उपलब्ध असलेली ही पद्धत, जो कोणी दिवसातून फक्त काही मिनिटे देण्यास तयार आहे, त्याच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता बाळगते.