लोक अध्यात्मिक शक्यतेला मुकण्याचे कारण म्हणजे ते चुकीच्या गोष्टींना ‘मी’ समजत आहेत. त्यांनी आपली ओळख, मालमत्ता, घरदार, वस्तू, व्यक्तीं, त्याचे शरीर, धर्म, सांकेतिक प्रतीके, देव देवता; अशा अगणित गोष्टींनी निर्माण केली आहे. मानवजात अध्यात्मिक दिशेला न वळण्याचे हे एकमात्र कारण आहे. तुम्ही मुळात जे नाही आहात, त्याला ‘मी’ समजता, हीच मुख्य अडचण आहे.

जर तुम्ही खरोखर एका अध्यात्मिक प्रक्रियेच्या शोधात असाल, तर हे लक्षात घ्यायला हवे की जो पर्यंत तुमची मुलभूत ओळख कुठल्यातरी एका गोष्टीशी निगडीत आहे तो पर्यंत अध्यात्मिक प्रक्रिया घडूच शकत नाही. पण बऱ्याच वेळा, अध्यात्माच्या नावाखाली लोक आपली एक नवीन ओळख निर्माण करतात. जुन्या ओळखी बदलून नव्या ओळखी निर्माण करतात. कुठल्या एका गोष्टीशी आपली ओळख निगडीत करून मिळालेली पूर्णतेची कल्पना तुम्हाला जन्म मरणाच्या फेऱ्यांतून सोडवणार नाही. फारतर ती तुम्हाला जीवनाच्या लहान सहान दुःखातून तरुन नेईल. या क्षणी जर तुमची ओळख एखाद्या समूहाशी किंवा कुठल्याही गोष्टीशी निगडीत असेल, तर ती तुम्हाला दैनंदिन जीवनातील चढ-उतार पार करण्यास मदत करू शकेल. पण जर तुम्ही मुक्तीच्या शोधात असाल, तर तुमच्या बंधनांचे मूळ काय आहे याकडे लक्ष द्यायला हवे.

जे तुम्ही नाही आहात, त्याला तुम्ही ‘मी’ समजत आहात आणि हेच तुमचे एकमेव बंधन आहे. तुमचे शरीर, तुमची विचार करण्याची पद्धत, तुमच्या भावना, आणि यातून निर्माण झालेले सर्व काही, या सगळ्यांतून तुम्ही आपली ओळख निर्माण केली आहे. एक कापडाचा तुकडा जर तुमचा असेल आणि जर मी तो फाडला तर तुम्हाला दुःख होतं. जर एखादी भिंत तुमची असेल, आणि तिच्यावर मी जरासं ओरखडलं, तर तुम्हाला वेदना होतात. खरं पाहता, तुमच्या दैनंदिन व्यवहारात जसे तुमचे यश आणि तुमची कार्यक्षमता वाढत जाते तसे तुमचे दुःखही वाढत जाते कारण तुमचे म्हणून जे काही आहे, त्या सर्व गोष्टी अनेक वेळा लोक पायदळी तुडवतात. तसेच तुमचे मनसुद्धा कोणीही पायदळी तुडवू शकतो. नाही का?

रस्त्यावरून चालणारी एक अनोळखी व्यक्तीसुद्धा, केवळ एका शब्दाने तुमचे मन आणि भावना पायदळी तुडवू शकते. म्हणून एकदा का तुमची ओळख, तुमचे मन आणि शरीराशी निर्माण झाली, की हे एक प्रचंड आणि न संपणारे बंधन होऊन बसते. आणि ते तसेच चालत राहते. तर अध्यात्मिक प्रक्रियेचे मुलभूत तत्व म्हणजे, आयुष्यातील या सर्व भक्कम झालेल्या रचनांना धक्का देऊन अस्थिर करणे. आणि तरीही आपली अशी एक व्यवस्था निर्माण करणे, की या अगदी अस्थिर परिस्थितीत सुद्धा तुमचा आंतरीक तोल ढळता कामा नये; जेणेकरून नरकात जरी गेलात तरी तिथेही दुःख तुमच्यापर्यंत पोचू शकणार नाही. आयुष्यात संकटे यायची तुम्ही वाट पाहत नाही आहात, तर येऊ शकणारी सर्व संकटे तुम्हीच तुमच्या आतच निर्माण करीत आहात आणि तरी सुद्धा तुमचा तोल सांभाळून आहात.