आरोग्य संपन्नता हीच मूलभूत परिपूर्णता

आज वैद्यकीय शास्त्र स्थूल मानवीय शरीर जाणण्या पर्यंत मर्यादित आहे. त्या पलीकडे काहीही घडल्यास, तो एक चमत्कार आहे असे तुम्हाला वाटते.
जेंव्हा कोणी म्हणतो मी आरोग्य संपन्न आहे, शारीरिक दृष्ट्या ते संपूर्ण असल्याची जाणीव अनुभवतात. मूलभूततः आरोग्य (Health) हा शब्द संपूर्णत्व (Whole) या शब्दाशी निगडित आहे. केवळ वैद्यकीय दृष्ट्या निरोगी असणं म्हणजे आरोग्य नव्हे. जेव्हा आपण शारीरिक, मानसिक व प्राण शक्ती; जीवनाच्या या तिन्ही पातळींवर सहज संपुर्णत्वाची स्थिती (जाणीव) अनुभवतो; तीच संपूर्ण आरोग्याची खरी सूचक आहे.
वैद्यकीय दृष्ट्या पुष्कळ व्यक्ती निरोगी आहेत पण आपण आरोग्य संपूर्ण असल्याचा त्यांचा आतून अनुभव असेलच असं नाही. हि पूर्णत्वाची व एकात्मतेची जाणीव ज्यांना अनुभवायची असेल; त्यांचे शरीर, मन आणी या दोन्हींपेक्षा त्यांची आंतरिक ऊर्जा (प्राण शक्ती); जीवनाचे हे तिन्ही पैलू त्यांच्यामधे उत्तम स्तरावर तीव्रतेने कृतीशील असणे फार महत्वाचे आहे.
वैद्यकीय प्रमाणानुसार कोणी व्यक्ती शारीरिक दृष्ट्या निरोगी असेल पण त्यांची आंतरिक प्राण शक्ती सुस्तावलेली असेल. म्हणून कित्येकदा असा अनुभव येतो; कि भरपूर प्रयत्न करून सुद्धा; आंतरिक आणी सांसारिक सफलता/ सार्थकता मिळत नाही, याचे मुख्य कारण आपण आपली आंतरिक प्राण शक्ती उत्तम स्थितीत ठेवण्याची दक्षता घेत नाही.
तुम्ही ज्या ज्या शारीरिक व मानसिक स्थिती अनुभवता, त्या प्रत्येक स्थितीला आपल्यातील प्राण शक्ती कारणीभूत असते, आणी हीच प्राण शक्ती मग शरीरात रासायनिक प्रक्रियेला कारणीभूत ठरते. जेंव्हा शरीराला कोणतीही बाधा होते, तेंव्हा तुम्ही कांही औषधें (रसायन) घेता आणी शरीराला एक प्रकारे रासायनिक संतुलनात आणण्याचा प्रयत्न करता.
बाधित शरीर स्वस्थ करण्यासाठी आपण औषध रूपानं एक रसायन घेऊन शरीरातील इतर रसायनांचं संतुलन कमी जास्त करायचा प्रयत्न करतो. पण या औषधांचे स्वाभाविक पणे शरीरावर कांही ना कांही दुष्परिणाम (side effects) होतात. मग त्या दुष्परिणामांना बरे करण्यासाठी आणखीन औषधें (उतारा) घ्यावी लागतात; आणी मग आपण एक न संपणाऱ्या साखळीत अडकतो. तुमच्या शरीरात रासायनिक प्रक्रियेच्या स्तरावर जे कांही घडतं त्याचं नियंत्रण ज्याप्रकारे तुमची प्राण शक्ती कार्य करते त्यावर अवलंबून असते.
शरीरात जेंव्हा आंम्लाची (acids) पातळी वाढते; ती संतुलित करण्यासाठी तुम्ही अल्कली (विम्ल) औषधें घेता; पण शरीरात आंम्ल का वाढलं? याचं मुख्य कारण म्हणजे या व्यक्तीचं मन, शरीर आणी याही पेक्षा महत्वाचं त्यांची प्राण शक्ती कशा प्रकारे कार्य करते यावर अवलंबून असते.
म्हणून योगशास्त्रात जेव्हा आपण आरोग्याकडे पाहतो, तेंव्हा आपण मन किंवा शरीराकडे न पाहता, केवळ प्राणशक्ती कशी कार्यरत आहे याकडे बारकाईने लक्ष दिलं जातं. जर तुमची प्राणशक्ती पूर्णतः संतुलित आणी मुक्तपणे प्रवाहित असेल तर तुमचे शरीर आणी मन दोन्ही आरोग्याने परिपूर्ण असतील; यात मुळीच शंका नाही.
प्राणशक्ती मुक्तपणे प्रवाहित ठेवणे म्हणजे हिलिंग (healing) किंवा या सारखा प्रकार नव्हे.
इथं योग शास्त्रानुसार, प्राणशक्ती प्रणालीच्या आधारभूत पायाशी जाऊन, त्या शक्तीला योग्य प्रकारे जागृत केली जाते. आणी मग ती प्राणशक्ती प्रस्थापित आणी मुक्तपणे प्रवाहित ठेवण्यासाठी त्याला आधारभूत योग साधना उभारली कि मग तुमचं शरीर आणी मन हे दोन्ही पैलू सहज स्वाभाविकपणे आरोग्य संपन्न असतील.
अलीकडे माणसांचं संघर्षमय जीवन पाहिलं कि कोणालाही परिपूर्ण आरोग्यसंपन्न जीवन जगणे कठीण झाले आहे. जीवनाची नित्याची ओढाताण (stress), आपण खात असलेले अन्न, श्वसनासाठी वापरत असलेली हवा, आपण पिणारे पाणी; हे सर्व अनेक प्रकारे आपल्यावर परिणाम करत असतात. बाह्य जगात आपल्या कार्याचा विस्तार जितका जास्त, तितक्या अनेक गोष्टींच्या संपर्कात आपण येत असतो, यामुळे आपल्या शरीराच्या रासायनिक प्रक्रियेचं संतुलन बिघडतं आणि मग आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात.
पण आपली प्राण शक्ती जर दक्षतेने जोपासली आणि जागृत ठेवली असेल तर या सर्व गोष्टींचा आपल्यावर कांहीही परिणाम होणार नाही, आपलं शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त राहतील यात मुळीच शंका नाही.
जीवन हे अनेक तऱ्हेनी व्यक्त होत असतं. कल्पना करा कि विद्युतशक्ती (electricity) विषयी तुम्हाला कांही माहित नाही आणि पाहिलंही नाही, विद्युतशक्ती म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला माहित नाही. आणि हि कोठडी (Hall) जिथे आम्ही आहोत; पूर्ण अंधारात आहे, आणि मी तुम्हाला म्हणालो हे बटण (switch) दाबताच हि कोठडी लक्ख प्रकाशाने उजळून जाईल - तुमचा विश्वास बसेल का माझ्या म्हणण्यावर? नाही ना? पण मी बटण दाबलं आणि कोठडी प्रकाशाने भरली; तुम्ही म्हणाल हा तर एक अदभूत चमत्कारच. हो ना? याचं कारण काय? तर विद्युतशक्ती कशी कार्य करते याविषयी तुम्हाला काहीच माहित नाही. त्याच प्रमाणे जीवन सुद्धा सतत अनेक तऱ्हेनी व्यक्त होत असतं; पण तुमचा जगण्याचा अनुभव तुम्ही फक्त भौतिक (Physical) आणि तर्कसंगत (Logical) वैचारिक पातळीवर मर्यादित ठेवलाय. आज वैद्यकीय शास्त्र फक्त स्थूल शरीर समजून घेण्यापर्यंत मर्यादित राहिलंय.
स्थूल शरीरापलीकडे जे कांही घटित होतं; ते तुम्हाला चमत्कारिक वाटतं. मी त्याला एक वेगळ्या प्रकारचं वैज्ञानिक शास्त्र (Science) म्हणतो. खरोखर एक वेगळ्या प्रकारचं शास्त्र. तुमच्यातील प्राण शक्तीनेच तुमच्या परिपूर्ण शरीराची निर्मिती केलेली आहे. शरीरातील हाडे, मांस, हृदय, मूत्रपिंडे आणि इतर सर्व कांही ही प्राणशक्तीच यांच्या निर्मितीस कारणीभूत आहे. मग हीच प्राण शक्ती शरीरात आरोग्य संपन्नता निर्माण करू शकणार नाही का? तुमची हि प्राणशक्ती तुम्ही जर मुक्तपणे प्रवाहित आणि योग्य प्रकारे संतुलित ठेवलीत तर आरोग्या व्यतिरिक्त इतर आणखी बरंच कांही करण्याचं यात सामर्थ्य आहे.