अध्यात्मिक प्रक्रिया म्हणजे वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या गोष्टी असतात. बर्‍याच लोकांना असे वाटते की आध्यात्मिक प्रक्रियेचा अर्थ नेहमी प्रेमळ असणे, नेहमी हसणे, नेहमी हळूवारपणे चालणे असा होय. इतरांना वाटते की अध्यात्म हे एक प्रकारचे अपंगत्व आहे. आणखी एक सामान्य समज असा आहे की अध्यात्म म्हणजे काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करणे. काही लोकांना असे वाटते की अध्यात्म म्हणजे काहीतरी विचित्र करणे - धुंद असणे, वेडा होणे आणि बेजबाबदार राहणे. इतरांकरिता आध्यात्मिक असण्याचा अर्थ आनंदी, शांततामय किंवा चैतन्यमय असणे आहे. अध्यात्मिक असणे हे यांपैकी काहीही नाही. अध्यात्मिक असण्याचा खरा अर्थ कोणत्या न कोणत्या प्रकारे आत्मस्वरूप अधिक आणि शरीरभाव कमी होणे आहे.

तुम्हाला शरीराहून अधिक आत्मरूप बनविण्यासाठी कोणता मुख्य अडथळा दूर करणे आवश्यक आहे ते ओळखा.

काही अडथळे असू शकतात जे तुम्हाला आत्ता हा अनुभव घेऊ देत नाहीत. तुमची कमतरता तुम्हाला माहीत असली पाहिजे. कदाचित तुम्ही इतके चांगले आहात की तुम्हाला सभोवतालच्या जीवनाबद्दल काहीच माहिती नाहीये. किंवा तुम्ही इतके वेडे आहात की तुमच्या आतल्या आणि बाहेरच्या जीवनाबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही. किंवा तुम्ही इतके नियंत्रित आहात की तुमच्यासोबत कधीच काही घडून येत नाही. तुमच्या आयुष्यातील अशी एक कमतरता कोणती आहे जी तुम्हाला अधिक अध्यात्मिक होऊ देत नाही, जी तुम्हाला या मार्गावर सहज आणि सुलभतेने चालू देत नाही? तर याबद्दल तुम्ही असे करू शकता : तुमचे डोळे बंद करा, तुमच्या आत डोकावून पहा, अध्यात्माची तुमची संकल्पना काय आहे ते पहा आणि तुम्ही थोडे अधिक आध्यात्मिक बनण्यासाठी, तुमच्या आतल्या जीवनाबद्दल थोडे अधिक संवेदनशील होण्यासाठी, काय घडणे आवश्यक आहे ते बघा. तुम्हाला शरीराहून अधिक आत्मरूप बनविण्यासाठी कोणता मुख्य अडथळा दूर करणे आवश्यक आहे ते ओळखा. जर तुम्ही ते खरोखर शोधून काढले तर ते दूर करणं मी बघून घेईन.

तर आता काही सामान्य अडथळे पाहूया. जर तुम्हाला असे वाटत असेल की शरीरात जडत्व किंवा संघर्ष आहे, तर तुम्ही सकाळी हठ योग करून ते दूर करू शकता. हे शरीर एक यंत्र आहे जे वापरामुळे अधिक चांगले होते. शरीरात जडत्व किंवा संघर्ष, याचा अर्थ असा होतो की, रिगॉर मॉर्टिसचा ( मृत्यू नंतर देह हळूहळू ताठर बनण्याची क्रिया )  हळूहळू आत प्रवेश होत आहे. हठ योग त्याला शरीरामध्ये स्थायिक होऊ देत नाही. आपण जिवीत असताना संपूर्णपणे जिवंत असलं पाहिजे. जिवंत राहण्याचा एक पैलू म्हणजे ताठरपणा निर्माण होऊ देणे. आपले शरीर, मन आणि शक्ती शक्य तितक्या लवचिक असाव्यात. तरच तुम्हाला जीवन एका सखोल पातळीवर जाणवू शकेल.

इतरांचा साधना करण्याची इच्छा असू शकते परंतु नंतर ते खूप आळशी होतात. प्रत्येकाची तीव्रतेची पातळी समान नसते, परंतु जे घडले पाहिजे ते घडलेच पाहिजे. फक्त एक गोष्ट पक्की करा : "आज शांभवी नाही झाली -  तर जेवण नाही." हे खूप कठोर आहे असे समजू नका. योगमार्गावर चालणाऱ्या साधकांनी याहून कितीतरी जास्त टोकाची पावले उचलली आहेत. दिवसभरात चोवीस तास ध्यान करत असलेले योगी जागरूक राहण्यासाठी स्वतःला विंचवाचा दंश करून घेतात, किंवा स्वतःचे बोट कापतात आणि त्यावर लिंबू ठेवतात. तुमच्यासाठी शांभवी फक्त एकवीस मिनिटांची आहे. तुमच्याकडे पुरेशी वचनबद्धता असणे आवश्यक आहे. हे अध्यात्माचा विचार करण्याबद्दल किंवा बोलण्याबद्दल नाहीये. हे अध्यात्म अंगिकारण्याबद्दल आणि जगण्याबद्दल आहे.

हे शरीर एक यंत्र आहे जे वापरामुळे अधिक चांगले होते.

तुम्हाला शारीरिक आजार असल्यास थोडी अधिक मेहनत घ्यावी लागू शकते. कारण जर शरीराची समस्या उद्भवली तर ते आपले संपूर्ण आयुष्याचे लक्ष वेधून घेईल. जर तुम्हाला दम्याची लागण झाली आणि तुम्ही श्वास घेऊ शकत नसाल - तर तुम्हाला फक्त श्वास घेण्याची इच्छा असेल; आणि तुमचं बाकी कशाशीही काहीही घेणंदेणं नसेल. हे कोणत्याही प्रकारच्या वेदना किंवा रोगास लागू होते. जेव्हा शरीराची योग्य प्रकारे काळजी घेतली जात नाही तेव्हा आपले संपूर्ण लक्ष वेधून घेईल. तुमची सगळी शक्ती शरीराची देखभाल करण्यात जाईल. हा शरीराचा स्वभाव आहे. ते व्यवस्थित ठेवणे हे सौंदर्याबद्दल किंवा दुसर्‍यासमोर फुशारकी मारण्याबद्दल नाहीये. मुद्दा असा आहे की हे शरीर आपल्या जीवनात अडथळा बनू नये. ती एक वर नेणारी पायरी बनली पाहिजे. जर शरीर अडथळा ठरला तर त्यास पार करणे कठीण होईल. त्याउपरही आपण आध्यात्मिक होऊ शकता, परंतु यासाठी अजून बरेच प्रयत्न करावे लागतात. त्याच वेळी, एकदा का आपल्याला हे पक्के समजले की शरीर आपल्याला कधीही त्रास देऊ शकते, तर मग शरीराच्या पलीकडे जाण्याची इच्छा अधिक तीव्रतेने वाढेल.

मुख्य अडथळा तुमचे  मन देखील असू शकते. उत्क्रांतीच्या संपूर्ण प्रक्रियेला कोट्यावधी वर्षे लागली. पण वानरापासून मानवाकडे संक्रमण खूपच पटकन झाले. शाररिकदृष्ट्या, असं म्हणतात की चिंपांझीच्या आणि मनुष्याच्या डीएनएमध्ये केवळ १.२३ टक्के फरक आहे. परंतु आपल्या बुद्धी आणि जागरूकताच्या दृष्टीने मनुष्य, चिंपांझीच्या तुलनेत कितीतरी युगे आधुनिक आहे. बुद्धीची ही पातळी आपल्यासाठी अजूनही तशी नवीन आहे. अडचण ही आहे की आपल्याकडे अशी बुद्धी आहे ज्यासाठी आपल्याकडे पुरेसा स्थिर पाया नाही. म्हणूनच योग - एक स्थिर आधार तयार करण्यासाठी; जेणेकरून आपली बुद्धी आपल्यासाठी काम करेल, आपल्याला पाहिजे त्या मार्गाने काम करेल. आपला हात जेव्हा आपल्याला पाहिजे तेथे जाईल तेव्हाच त्याचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे आपले मन आपल्याला पाहिजे असलेल्या ठिकाणी जाईल तेव्हाच उपयुक्त ठरेल. जेव्हा हे इतरत्र ठिकाणी जाते, तेव्हा मग त्याचा त्रास होतो.

आणखी एक अडथळा तुमचे कर्म असू शकते. कर्म ही अशी गोष्ट नसते जी योगायोगाने घडून येते. कर्म म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्याचा पूर्ण ताबा घेण्याबद्दल आहे. जेव्हा तुम्हाला हे समजते की तुम्हीच तुमचे आयुष्य घडवत आहात, तेव्हाच तुम्ही तुमची नियती तुमच्या हातात घेऊ शकता. तरीही, क्षमतेचे प्रश्न असू शकतात - मग आम्ही त्यात तुम्हाला काही मदत करू शकतो. मी त्या उद्देशाने येथे आहे. पण जर तुम्ही तुमचे जीवन आपल्या हातात घेतले नाही तर मी ते माझ्या हातात का घ्यावे? असं करून चालणार नाही. जर तुम्ही ते तुमच्या हातात घेतले असेल आणि तुम्ही जे करणे आवश्यक आहे ते करायला सक्षम नसाल, तर मी काहीतरी लक्ष घालून बघू शकतो, आणि तुमच्यासाठी काहीतरी करू शकतो.

असे बरेच लोक आहेत जे नेहमीच स्वतःचे रक्षण करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना भीती वाटते की कोणीतरी त्यांचा गैरफायदा घेऊ शकेल. त्यांना फायदा घेऊ द्या. माझ्या आजूबाजूला असे स्वयं-नियुक्त सल्लागार आहेत जे मला सावधगिरी बाळगण्यास सांगत असतात, जेणेकरून कोणी मला वापरेल किंवा काहीतरी करेल. मी म्हणतो, त्यांना माझा उपयोग करु द्या ना. त्यासाठीच तर मी येथे आहे. मग त्याविषयी काळजी करू नकात. जीवनाला “होय” म्हणा. “होय” म्हणून तुम्ही काही हरणार नाहीत. “नाही” म्हणून मात्र तुम्ही हराल. “नाही” म्हणजे हा एक बंद दरवाजा आहे. कोणत्याही कारणास्तव दरवाजा बंद करू नका. हे एक अतिशय संक्षिप्त जीवन आहे - त्यात दरवाजा बंद ठेवणे आणि उघडणे याला वेळ नाही.

हे अध्यात्माचा विचार करण्याबद्दल किंवा बोलण्याबद्दल नाहीये. हे अध्यात्म अंगिकारण्याबद्दल आणि जगण्याबद्दल आहे.

केवळ शरीराला संरक्षणाची आवश्यकता आहे. आणि कधीकधी काही गोष्टी शक्य नसतात. अन्यथा, सर्वकाही "होय" असावे. विश्वामध्ये असा एक अणूही नाही जो आपल्यासाठी संभाव्य द्वार नाहीये. माझे म्हणणे आहे की  “होय” ही वृत्ती म्हणून नाही तर अस्तित्वाचे प्रतिबिंब म्हणून असावे. अस्तित्व नेहमीच सगळ्याला 'होंय म्हणत असते. जर तुम्ही स्वतःला त्याचाच एक भाग असल्याचे समजले तर तुम्ही देखील एक 'होय' असाल. जर तुम्ही श्वास घेतलेली हवा तुम्हाला “नाही” म्हणाली तर तुमचे जीवन संपेल. जर तुमच्या सभोवतालचे जीवन तुम्हाला “नाही” म्हणत असेल तर तुम्ही संपून जाल. जर तुमच्या शरीरात प्रवेश करणारे अन्न तुम्हाला “नाही” म्हणायला लागले तर तुम्ही नष्ट व्हाल. अस्तित्व आपल्याला "होय" म्हणत आहे. मग तुम्ही "होय किंवा नाही" असा हिशोब का करीत आहात? जीवनाला शंभर टक्के "हो" म्हणायची वेळ आली आहे.

काही लोकांसाठी सर्वात मोठा अडथळा म्हणजे कुणीतरी त्यांची टिंगल, चेष्टा किंवा उपहास करेल याची भीती. सर्वप्रथम, इतर लोक तुम्ही काय करत आहात यात खरोखर रस घेतात का आणि तुमच्याबद्दल मत बनविण्यास त्यांच्याकडे वेळ आहे का? दुसर्‍याच्या विचारांबद्दल काळजी करू नका. त्यांच्या मनात काय होते ही त्यांची समस्या आहे. तुम्ही तुमच्या मनाच्या गुणवत्तेशी संबंधित असावे. त्यानेच तुमचे जीवन सुधारेल. इतर लोकांच्या मनात काय चालले आहे याबद्दल चिंता करू नका. जर तुम्ही इतरांच्या मतांबद्दल चिंता करत असाल तर तुम्ही वेडे व्हाल, कारण हे सर्व तुमचे केवळ अंदाज आहेत. जर तुम्हाला काही करणे गरजेचे वाटत असेल , तर ते सरळ करून टाका,  इतर कुणी काहीही विचार करो. आणि जर एखादी व्यक्ती तुमच्यावर हसते तर तुम्हीही त्यांच्याबरोबर हसू शकता. कदाचित ते तुम्ही एखादी चूक सुधारण्यात मदत करतील. पण असं असलं तरी, बहुतेक लोक तुमच्याबद्दल विचार करत नाहीत. ते त्यांच्या स्वत:च्याच गोष्टींमध्ये व्यस्त आहेत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही एक स्थिर पाया तयार करणे आवश्यक आहे. जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संतुलन. जर संतुलन नसेल तर तुमचे शरीर आणि मन तुमच्या विरुद्ध काम करेल. स्थिर-भक्कम पाया म्हणजे असं शरीर आणि मन जे तुमच्याकडून सूचना घेतात. तुमच्या संपूर्ण यंत्रणेत योग्य प्रकारची केमिस्टरी निर्माण करायला तुम्ही सक्षम होणे गरजेचे आहे. हे तुम्हाला आरोग्यासाठी आणि स्वास्थ्यासाठी महत्वाचे आहे. स्वतःच्या संपूर्ण यंत्रणेचे व्यवस्थापन करण्यासाठी लागणारे कौशल्य तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. आणि म्हणूनच योग. शरीर वाकवणे आणि फिरविणे ही सोपी प्रक्रिया आपल्या स्नायूंना ताणून काढण्याविषयी नाही - ती आपल्याबद्दलच्या काही मूलभूत गोष्टींमध्ये बदल घडविण्याबद्दल आहे. किमान एकवीस मिनिटांच्या शांभवी महामुद्रेचा सराव सुरू करा.

Love & Grace