प्रश्न: सद्‌गुरू, आमची पिढी सतत इतरांचं लक्ष वेधून घेण्याच्या प्रयत्नात असते. मला वाटतं आपल्यापैकी बहुतेक जण ह्याच्याशी सहमत असतील. आम्ही आमचा आनंद, दुःख, आज काय काय केलं, काय खाल्लं, आणि कोणाला भेटलो हे सगळं व्हाट्सअप, फेसबुक, स्नॅपचॅट,
इन्स्टाग्राम इत्यादींवर पोस्ट करतो. विशेष करून आमच्या समस्यांचं निराकरण न करता किंवा कोणत्या मित्राशी त्याबद्दल न बोलता, आम्ही त्या पोस्ट करतो आणि सगळ्या जगाला मोठ्ठ्याने ओरडून सांगतो की आम्ही दुःखात आहोत. हे असं सोशल मिडियावर व्यक्त होणं किंवा लक्ष आकर्षून घेणं चुकीचं आहे का? 

सद्‌गुरू: चूक की बरोबर हा प्रश्न नाही. आयुष्याच्या ह्या टप्प्यात तुम्ही चांगलं वाईट जे काही बोलता ते आज एवढं महत्वाचं नाही. ते चुकीचं आहे का बरोबर हे देखील आपण ठरवणार नाही आहोत. ते खाजगी आहे. तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की विशेष म्हणजे डिजिटल मीडियावर सगळ्या गोष्टी आयुष्यभर रहातात. तुम्ही जरी फेसबुक वरून काढून टाकल्या तरी कोणीतरी, कुठेतरी त्या साठवत असतो. आणि हे सगळं भलत्या वेळी तुमच्या समोर येऊन तुम्हाला भलत्या प्रसंगांना सामोरं जावं लागू शकतं. हो. आज आपण जसे
आहोत ते कदाचित १० वर्षांनंतर लाजिरवाणं होऊ शकतं. 

 

आपल्या आयुष्यात सोशल मीडिया हे एक विलक्षण साधन म्हणावं लागेल. माणसांना ह्याआधी कधीच अशाप्रकारे संवाद साधणं शक्य नव्हतं. पण हे आता उपलब्ध झाल्यावर आपण त्यावर बोलतोय तरी काय? मला वाटतं थोड्या वैचारिक परिपक्वतेची गरज आहे. तुम्ही आईस्क्रीमबरोबर सेल्फी काढता आणि वेगवेगळ्या पोजेस देता. मी ह्याला चुकीचं किंवा बरोबर म्हणत नाही - पण असं वागणं थोडं लहरी वाटतं. उद्या तुम्हाला हे वागणं थोडं विचित्र वाटू शकेल. जर तुम्हाला तसं वाटणार नसेल तर ठीक आहे. मी तुम्हाला हे केलंच पाहिजे किंवा नाहीच करायचं असं सांगत नाही. आज जे तुम्ही करता ते नंतर समोर येऊन नसती समस्या निर्माण होऊ नये याकरिता आज समंजसपणे वागायला हवं कारण तो समंजसपणा पुढच्या आयुष्यात उपयोगी ठरेल.  

संपादकीय टीप: कुठल्या वादग्रस्त मुद्द्याबाबत जर तुमच्या मनात वादळ उठत असेल, कुणीच ज्या बाबत बोलत नाही अश्या कुठल्या गोष्टीबद्दल जर तुम्ही गोंधळलेले असाल, किंवा असा कुठला प्रश्न तुमच्या मनाला सतावत आहे ज्याचं उत्तर कुणाकडेही नाही, तर हीच संधी आहे! सद्गुरूंना आपले प्रश्न विचारा, UnplugWithSadhguru.org वर.

Youth and Truth Banner Image